मी : मग एका ब्राम्हण जातीतील मंडळी सार्वजनिक जीवनातल्या सर्वच क्षेत्रात अग्रणी असतात तर आपण फारच मागे पडले आहोत, हे कसे झाले ? बुद्धी किंवा कला ही जात पाहुन जन्म घेत नाही असे असतानाही ११४ साहित्यिक ब्राम्हणात आणि फक्त १४च बहुजनात असे होण्यामागे काही कारण असेल का ?
देशमुख : निश्चितच असले पाहीजे.
मी : मी तुम्हाला हेच समजवतोय. ह्यामागचे कारण आहे समाजात कार्यरत असणारी ब्राम्हणी व्यवस्था वा वर्णव्यवस्था. जेव्हा मी आपण शुद्रवर्णीय आहो असे म्हणतोय, तेव्हा मी तुम्हास डिवचत नाही. आज आम्ही शुद्रवर्णीय आहो हे मानु नका, पण भुतकाळात असणारी ब्राम्हणी व्यवस्था आम्हास शुद्र मानत होती हे जाणून घेण्याचा फक्त प्रयत्न करा. आम्ही आमचे शुद्रत्व विसरलेले असलो तरी ब्राम्हण आपली ब्राम्हण ही ओळख आजही जपून आहेत. जर ते स्वत:स ब्राम्हण मानीत आहेत तर इतरास निश्चितच अब्राम्हण मानत असतील. ब्राम्हणत्व मनुष्यात श्रेष्ठीचा वा अहंभावाची मानसिकता निर्माण करते व ती मानसिकता त्याच्या आचरणातून व कृतीतून समाजात उमटते व अब्राम्हणांच्या विकासाचा मार्ग रोखते. ह्याच मानसिकतेतून मग मंडल आयोगाला विरोध होतो वा लाखोच्या संख्येत अनुसूचित जाती-जमातीच्या नोकऱ्यात बॅकलॉग निर्माण करतो. २६ जाने.१९५० ला जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय राज्यघटना ह्या देशात लागू झाली त्याक्षणीच लिखीत स्वरुपात आमची शुद्र म्हणून असणारी ओळख संपुष्टात आली. 'भारतीय नागरीक' ही नविन ओळख आम्हास मिळाली. भारतीय राज्यघटनेने हिंदु धर्माचा सर्वेसर्वा समजणाऱ्या शंकराचार्याच्या मताची किंमत आणि हजारो वर्षापासून ब्राम्हणी व्यवस्थेच्या नावाखाली झाडू मारणाऱ्या भंग्याच्या मताची किंमत माणूस म्हणून एकच केली. एक व्यक्ती-एक मत. त्यात व्यक्तीस्वातंत्र्याचा समावेश केला. प्रत्येक व्यक्तीला आपले स्वतंत्र मत भाषणाच्या वा लेखनीच्या साहाय्याने मांडण्याचा अधिकार मिळाला. आपले मत लोकांसमोर मांडून प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या लोकांना आपल्या मताचा करून घेऊ शकतो. पण निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेससुद्धा गुप्त मतदान पद्धती असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपले मत स्वतंत्रपणे देऊ शकतो. “ऐकावे जनाचे करावे मनाचे' हा अधिकार प्रत्येक व्यक्तीस मिळाला आहे. कालपर्यंत आदेश देऊन व्यवस्था राबविणाऱ्या शंकराचार्यालासुद्धा जर आपली ब्राम्हणी व्यवस्था राबवायची असेल तर मठ सोडून जनतेसमोर येऊन ती पटवावी लागेल आणि मग जनताजनार्दन निर्णय करेल, ह्याची व्यवस्था टिकवायची की उखडवायची. टीव्हीच्या विविध चॅनेलवर आम्ही बघतो आहो की साधु, संत व महंत हे राम मंदिर बनावे ह्या मागणीसाठी एखाद्या देवाची वा रामाची प्रार्थना करीत नाहीत तर संसदेत बसलेल्या भारत सरकारच्या प्रमुखांना व पंतप्रधानांना भेटून विनंती करतात की आम्हास मंदिर बांधू द्यावे. आदेशाची व्यवस्था नष्ट होऊन संवादाची नवी व्यवस्था ह्या देशात कार्यरत झाली आहे. 'आदेशाची व्यवस्था' ही गुलामीची व रानटी व्यवस्था आहे तर 'संवादाची व्यवस्था' ही सहकाराची व लोकशाहीवादी व्यवस्था आहे. आज मानायचेच झाल्यास हिंदु ही आपली भौगोलीक ओळख आहे धर्म नव्हे. आणि धर्म म्हणून तो आम्हाला मानायचा असेल तर आम्हाला स्वतः प्रश्न करावा लागेल की काय शुद्रवर्णीय म्हणून जगायची आमची पुन्हा तयारी आहे? आणि ह्याचे निश्चित उत्तर - नाही! नाही! नाही! हेच आहे. आता जर आम्ही कुठे चुकलो तर आमच्या येणाऱ्या भावी पिढ्या आम्हाला कधीही माफ करणार नाही.
देशमुख : ओबीसी हे शुद्रवर्णीय होते ह्यासाठी आपण अजून काही दाखले देऊ शकता का ?
मी : होय. तम्ही गळयात जाणव घालता का ?
देशमुख : नाही.
मी : कारण ?
देशमुख : माझा उपनयन संस्कार झाला नाही.
मी : तुमचा उपनयन संस्कार झाला नाही कारण तुमच्या वडिलांचा झाला नाही. त्यांचा झाला नाही कारण आजोबांचाही झाला नव्हता. ह्याप्रमाणे वंशावळीने तुम्ही इतिहासात डोकावले तर लक्षात येईल की तसा अधिकार आपल्या बापदाद्यांना वा पूर्वजांना नव्हता आणि तो का नव्हता ह्यासाठी मनुस्मृतीतील ह्या श्लोकाचा मी दाखला देतो.
ब्राम्हणः क्षत्रियो वैश्यस्त्रयो वर्णा द्विजातयः ।
चतर्थ एकजातिस्त शद्रो नास्ति त पंचमः ।।
म्हणजेच ब्राम्हण, क्षत्रिय व वैश्य हे तीन वर्ण द्विजाती आहेत. म्हणजेच ह्या वर्णातल्या लोकांना दोनदा जन्म मिळतो. एकदा आईच्या गर्भातन बाहेर आल्यावर व दुसऱ्यांदा मुंज होते तेव्हा. पण चौथा शुद्रांचा जन्म एकदाच होतो कारण त्यांना उपनयन संस्काराचा अधिकार नाही. आणि पाचवा तर वर्णच नाही तरी गांधीजी अस्पृश्यांना पंचम वर्ण म्हणायचे. ह्या व्यतिरिक्त मनुस्मृतीतील हा दुसरा श्लोक बघा.
र्ग्भाष्टेऽब्दे कुर्वीत ब्राम्हणस्योपनायनम ।
र्ग्भादेकादशे राज्ञो गर्भात्तु द्वादशे विशः । ।
म्हणजेच गर्भ म्हणून आईच्या पोटात जन्मल्यापासून आठव्यावर्षी ब्राम्हणावर, अकराव्या वर्षी क्षत्रियावर तर बाराव्यावर्षी वैश्यावर उपनयन संस्कार करावा. ह्या श्लोकानुसार उपनयनाचा संस्कार फक्त ब्राम्हण, क्षत्रिय व वैश्य ह्या तीन वर्णीयांना आहे. उरलेला चौथा वर्ण म्हणजेच शुद्र. शुद्रांना उपनयन संस्काराचा अधिकार नाही. जाणव घालण्याचा अधिकार नाही. मग आपल्या गळ्यात जाणव नाही ह्याचा अर्थच आम्ही शुद्र आहोत.
देशमुख : ढोबळेसाहेब आपण जानवे घालत नाही. पण सोनार, लोहार वगैरे उपनयन संस्कार करतात. उपनयन संस्काराचा अधिकार असल्यामुळे ते शुद्र कसे ?