जोशी : ह्या देशात मुसलमानाचे लाड पुरविले जातात अस नाही का तुम्हाला वाटत?
मी : मुळीच नाही. आणि १३-१४ टक्के लोकसंख्येने असलेले मुसलमानांचे नोकऱ्यातील प्रमाण २ टक्यापेक्षाही कमी आहे. राजकीय स्तरावर त्यांचे प्रतिनिधित्व व प्रभाव नगण्यच आहे, हे मी तुम्हाला आधीच पटविले आहे. आणि प्रशासनात २ टक्के हिस्सेदारी असणारा वर्ग काय प्रभाव समाजात पाडत असेल.
जोशी : बाबर फक्त १२०० सैन्य घेउन भारतात आला होता पण आज मुसलमानांची लोकसंख्या १३–१४ कोटी आहे, कारण मुसलमानांना चार बायका करता येतात. त्यांच्या लोकसंख्येत अतिशय तीव्र गतीने वाढ होत आहे. उद्या जर ते बहुसंख्याक झाले तर पुन्हा ते राज्यकर्ते होतील असे नाही का तुम्हाला वाटतं ?
मी : पुन्हा ते राज्यकर्ते होतील म्हणजे ते आधी राज्यकर्ते होते हेच तुम्ही म्हणत आहा. पण जेव्हा ते राज्यकर्ते होते तेव्हा तर ते निश्चितच बहुसंख्यांक नव्हते. बाबर फक्त १२०० सैन्य घेउन भारतात आला होता असे तुम्हीच म्हणता व तरीही त्याने मोगल साम्राज्याचा पाया घातला ह्याचे कारण मुसलमान बहुसंख्याक होते हा नव्हे तर आम्हीच हिंदु बहुसंख्यांक असूनही जाती व्यवस्थेने विभागलेले होतो, आणि आजही आहोत. आमच्या जातीजातीत उच्चनिच्चता होती. हिंदुतील सर्वात वरचा वर्ग मंदिरातील देवाची आंघोळ व पूजा करायचा, तर सर्वात खालचा हिंदु म्हणजेच अस्पृश्य ह्यास मंदिरात प्रवेशाचीही परवानगी नव्हती. जेव्हा की मुसलमान मस्जिदीत राजारंक हा फरकही मानत नव्हते. संख्येमुळे नव्हे तर विचारधारणेमुळे ते राज्य करू शकले. त्यात अकबर हा सम्राट झाला तर औरंगजेबाने जेव्हा प्रजेस त्रास द्यायचे धोरण सुरू केले तेव्हा त्या साम्राज्याचा -हासही सुरू झाला. छत्रपती शिवरायांच्या राज्याचा पाया औरंगजेबाच्या काळात मजबूत झाला. अकबर मुसलमान राजा होता तरी त्याचे दर्शन घेतल्याशिवाय बरेच हिंदु पोटात एकही घास टाकत नसत. हे अकबर मुसलमान असल्यामुळे नव्हे तर तो आदर्श राजा होता म्हणून घडत होते. आज सध्यातरी मुसलमान बहुसंख्याक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण भारतीय नागरिक ह्या नात्याने मुस्लीम व्यक्ती ह्या देशात कोणत्याही पदावर आरूढ होऊ शकतो. तुमच्या ओळखीच्या कुठल्याही ५ मुसलमानांचे नाव सांगा आणि त्यांना किती बायका आहेत हे ही सांगा..
जोशी : माझ्या ओळखीचा एकही मुसलमान नाही.
मी : मग आधी मुसलमानात जा आणि ओळख्या वाढवा. प्रत्यक्ष परिस्थितीचे अवलोकन करा. उगाच अफवा पसरविण्याच्या तंत्राचे व संघटनेचे बळी पडू नका. माझ्या परिचयात ८-१० मुसलमान आहेत. त्यापैकी कुणालाही चार बायका तर सोडा, दोन बायका पण नाही. माझ्या ऑफीसमध्ये अली नावाचे एक मुस्लीम गृहस्थ आहेत. त्यांना एक बायको आणि दोन मुली आहेत. दोन मुली असूनही त्यांनी फॅमिली प्लॅनींग केले.
जोशी : अहो तुमच्या ऑफीसमध्ये म्हणजे ते सुशिक्षित गृहस्थ असणार.
मी : आता तुम्ही माझ्याच प्रश्नाच उत्तर दिल. प्रश्न शिक्षणाचा आहे.
जोशी : मुस्लीम लोकांत गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे हे तरी मानणार की नाही तुम्ही? मी : मी पुन्हा म्हणतोय प्रश्न शिक्षणाचा आहे. मुस्लिमांचे लाड पुरविणारी राजकीय मंडळी मुस्लिमांचा राजकीय व्होट बँक म्हणून सर्रास वापर करीतात हेच मुळी मुसलमांनाना कळत नाही. कारण शिक्षणाचा अभाव. मुसलमानांतील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करायचे असेल तर त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचा शिक्षणाचा, स्वास्थ्याचा, नोकरीचा प्रश्न आपुलकीने आम्ही सोडविला पाहिजे. तुमच्या तथाकथित हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेमुळे जर मुसलमानांच्या डोक्यात ते परके आहेत ही भावना पेटली तर ते मानसिक स्वास्थ्य हरवून गुन्हेगारीचा उघड वापर करतील. गरज आहे की आपण त्यांना आपलेसे करून त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्याची. परकीयत्वाची भावना मनुष्यात फुटीरतावादी प्रवृत्ती निर्माण करते आणि अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करणारी कुठलीही संघटना राष्ट्रनिर्मीतीचे नव्हे तर राष्ट्रविध्वंसाचे काम करीत असते असेच म्हणावे लागेल.
जोशी : सुशिक्षित मुसलमांनाचे असू द्या. पण अशिक्षित मुसलमानात चार बायकांचे प्रमाण आहे हे तर मान्य कराल.
मी : ह्या प्रश्नाचे उत्तर वैज्ञानिक तर्कशास्त्रावर आपण देऊ शकतो. निसर्ग नियमानुसार स्त्री व पुरुषांच्या उत्पत्तीचा रेशिओ साधारणत: १:१ असाच असतो. जगाच्या कुठल्याही भागात; एव्हाना एखाद्या मुस्लीम प्रदेशातही १००० पुरुषांमागे ४००० स्त्रिया असा रेशियो नाही. १००० पुरुषांमागे ९५० ते १०५० स्त्रिया हा जागतिक रेशियो आहे. जी गोष्ट जगाला लागू आहे तीच भारतालाही लागू असणार तुमच्या म्हणण्यानुसार मुसलमानां. संबंधी आपण खालील तीन गृहीतकांचा विचार करू.
१. प्रत्येक मुसलमान पुरुष ४ स्त्रीयांना पत्नी करतो.
२. प्रत्येक मुस्लीम स्त्री फक्त एकाच पुरुषाला पती करू शकते.
३. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीचे लग्न होते.
पुरुष व स्त्रियांची उत्पत्ती संख्या जवळजवळ सारखीच असते. समजा १०००:१०००. जर २५० पुरुषांनी प्रत्येकी चार बायका केल्या असे मानले तर १००० स्त्रियांचे तर लग्न होतील पण उरलेल्या ७५० पुरुषांचे काय ? असे असते तर मुसलमान पुरुषांतील अविवाहितांचे प्रमाण ही आजच्या घडीला एक राष्ट्रीय समस्या म्हणून चर्चेत आली असती. पण असे नाही. आता मुसलमानांच्या लोकसंख्येबद्दल तर्कशास्त्रीय विवेचन करू. एखाद्या भौगोलिक प्रदेशातील स्त्रीची प्रजननशक्ती प्रदेशनिहाय सारखीच असते. भारतातील स्त्री मग ती हिंदु असो वा मुसलमान तिची प्रजननशक्ती सारखीच असणार. निसर्ग तरी सध्या हिंदु स्त्री व मुस्लीम स्त्री असा भेद करीत नाही. जोशीसाहेब ७५ टक्के मुसलमान पुरुष जर अविवाहित राहात असतील तर त्यांचा लोकसंख्या वाढविण्यात मुळीच उपयोग होत नसेल. जेव्हा की हिंदुत १०० टक्के स्त्री व पुरुष हे लोकसंख्यावाढीच्या प्रक्रियेत सहभागी होतात. तेव्हा जर मुसलमानांची लोकसंख्या कमी व्हावी असे तुम्हास वाटत असल्यास तुम्ही त्यांच्यातील बहुपत्नीत्वाचे समर्थन करायला पाहिजे, पण तुम्ही तर विरोध करीत आहात. मला वाटत जोशी तुम्ही चुकताय कुठतरी. सत्य परिस्थिती अशी आहे की हिंदु वा मुसलमानांचे लोकसंख्येचे प्रमाण दर १० वर्षांनी होणाऱ्या जनगणनेच्या आकड्यावरून जाणून घेणे जास्त योग्य राहील. १९७१ ला हिंदु लोकसंख्या ८२ टक्के व १९९१ लाही ८२ टक्के होती. तर मुस्लीम लोकसंख्या १९७१ ला ११ टक्के होती व १९९१ लाही ११ टक्केच होती. आकडे मी पुर्णाकात सांगितले आहेत. यावरून लोकसंख्येचे प्रमाण सुमारे २० वर्ष जवळजवळ स्थिर राहिल्याचेच लक्षात येते.
जोशी : माझ्या माहितीनुसार बाबर जेव्हा ह्या देशात आला तेव्हा तो फक्त १२०० सैनिक घेऊन आला. आज ह्या देशात १३–१४ कोटी मुसलमान राहतात. तरी तुम्ही म्हणता त्यांच्या लोकसंख्येत वाढ झाली नाही.
मी : प्रजनन शक्तीमुळे एवढी वाढ होऊ शकत नाही, हे मी आधीच तर्कशास्त्रीय दृष्टीकोनातून समजाविले. आता तुम्हीच अंदाज बाधा एवढी वाढ कशी झाली असेल.
जोशी : माझ्या मते मुसलमानांनी क्रूरपणे आमच्या हिंदु लोकांना मुस्लीम बनविले असणार. ही मंडळी कन्वर्टेड मुसलमान आहेत.
मी : तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे की मुसलमानांतील बहुसंख्य मंडळी ही कन्वर्टेड मुस्लीम आहेत. पण ही मंडळी मुस्लीम होण्यामागची कारणे अजूनही काही आहेत. याम
१. ह्या देशावर मुसलमानांचे राज्य होते. त्यांच्याजवळ सत्ता होती. त्या सत्तेच्या व शक्तीच्या लोभाने स्वत:हून काही मंडळी मुस्लीम झाली. अशाप्रकारे धर्म परिवर्तन करणारे लोक हिंदुधर्मातील उच्चभ्रू व उच्च जातीय मंडळीच होती. ह्यांची संख्या फार थोडी आहे. उदाहरणार्थ राजा मानसिंग ह्याने आपली बहीण जोधाबाई हीचे लग्न अकबराशी करून दिले.
२. बहुजन समाजातील बहुसंख्य मंडळी स्वत:हून मुस्लीम धर्मीय झाली. हिंदुधर्माने शुद्रांना शिक्षणाचा, शस्त्र धारण करण्याचा व वित्त जमविण्याचा अधिकार नाकारला होता तर अतिशुद्र, अस्पृश्यांना देवाच्या प्रार्थनेचा व मंदिर प्रवेशाचा अधिकार ही नाकारला होता. ज्यावेळेस ह्या मंडळींनी पाहिले की अल्लापुढे मस्जिदीत राजा व रंक असा भेद नाही. दोघही एकाच देवाची लेकरे म्हणून सम पातळीवर मस्जिदीत प्रवेश करू शकतात. तेव्हा बऱ्याच लोकांनी मुस्लीम धर्म स्वीकारला. मुस्लीम धर्म हा हिंदु धर्मापेक्षा जास्त समतावादी, मानवतावादी धर्म त्यांना वाटला म्हणून त्यांनी स्वेच्छेने तो धर्म स्वीकारला.
३. सनातनी चालीरितीतून जर काही चुका घडल्या तर त्या हिंदु व्यक्तीस समाजव्यवस्थेतून बाहेर काढण्यात येत असे. अस्पृश्य घोषीत करण्यात येत असे. एखाद्या स्पृश्य व्यक्तीने अस्पृश्य व्यक्तीस स्पर्श केल्यास त्याला निघृणपणे दगडाने ठेचून ठेचून मारले जात असे. अशावेळेस मृत्यूच्या भितीपायी बरीच मंडळी एखाद्या मुस्लीम नबाबास वा सरदारास शरण जात व धर्म बदलवित. हा प्रकार एकुनच एवढा वाढला होता की हिंदु धर्म संपतोय की काय ? ह्या भितीमुळे संत एकनाथ महाराजांनी हिंदु धर्मात काही सुधारणा सुचविल्या. दाखला म्हणून एकनाथी भागवतातील हे पद उद्धृत करता येइल.
अस्पृश्ये विटाळ ज्यासी । गंगास्नाने शुद्धी त्यासी ।।
म्हणजेच आता अस्पृश्यांचा ज्यांना विटाळ झाला त्यांनी धर्मपरिवर्तन करु नये तर गंगेला जाऊन स्नान करावे व आपली शद्धी करून घ्यावी ह्यामुळे स्पृश्यातील बडी मंडळी काहीही पाप घडल्यास गंगेस स्नान करावयास जाऊ लागली. हा शुद्धीचा कार्यक्रम भट ब्राम्हणच राबवत व ह्यानिमित्ताने भोळ्याभाबड्या शुद्र जणाकडून चांगलीच संपत्ती लूटून घेत. गरीब शुद्र मंडळी एवढ्या दूर गंगेपर्यंत जाण्याच्या स्थितीत नसे. मग ते इथल्याच कुठल्यातरी नदीवर स्नान करीत आणि म्हणूनच १३-१४व्या शतकातच महाराष्ट्रातील बऱ्याचशा नद्याचे नामाधिकरण वैनगंगा, पैनगंगा, दक्षिणगंगा अशाप्रकारे झाले आहे. येथेसुद्धा धर्माच्या नावावर गरीब समाजाला लूटण्याचे काम ब्राम्हण भटांनी केले आहे. आजही असे प्रकार खुले आम सुरू आहे. पंढरपुरात आजही पंडे भोळ्याभाबड्या बहुजन समाजातील स्त्री पुरुषांना लुटण्याचे काम करीत आहे. ४-५ वर्षापूर्वी मी पंढरपूरला विठोबारायाच्या दर्शनासाठी गेलो होतो. माझ्या समोरच एक महिला तिच्या ३-४ वर्षाच्या मुलीसोबत रांगेत उभी होती. रुख्मीणीचे दर्शन घेणाऱ्या त्या महिलेला पंडा म्हणाला, “ए बाई, तुझ्यापाशी जेवढे पैसे आहेत ते येथे टाक. तुझे सौभाग्य धोक्यात आहे. देव तुझ्या सौभाग्याचे रक्षण करील!' त्याबाईने माझ्यासमोर तिच्यापाशी असलेले सर्व पैसे, जवळजवळ दोनशे-तीनशे रुपये असतील, पंड्याच्या स्वाधीन केले आणि बाहेर येताच धाय मोकलून रडावयास लागली. मी त्या बाईस विचारल, 'काय झाल?' ती म्हणाली, 'साहेब सर्व पैसे ब्राम्हणासी दिले. देवा ब्राम्हणाच्या म्हनण्यान एकही पैसा स्वत:पाशी नाही ठेवला. पण म्या कोल्हापूरहून आली आहे. आता गावला कशी परत जाणार. ही पोरगी माझ्यासोबत आहे. इले खायला काय देणार.' मी तिला १००-१०० च्या दोन नोटा देऊ केल्या. तिने त्यातली एकच १०० ची नोट घेतली व म्हणाली, 'साहेब १०० रु. पुरे झाले. तुम्ही देवमाणुस दिसता. विठोबाराया तुमच कल्याण करील. आता मी पहिलीच एस. टी पकडते अन् गावला निघते.' मी म्हणालो, बाई, तुम्ही त्या पुजाऱ्याला तुमच्या जवळचे सर्व पैसे का दिले ?' ती म्हणाली, 'अहो साहेब, त्यानं माझ्या सौभाग्यावर हात टाकला होता. माझ्या कंकवापेक्षा का पैसे महत्वाचे आहे. निघते मी साहेब', आणि ती बाई आपल्या छोट्या पोरीला घेऊन निघून गेली. अंधश्रद्धा आणि अज्ञानाच्या गर्तेतून त्या स्त्रीला श्रद्धा व ज्ञानाच्या क्षेत्रात आणणे हे आपले पहिले कर्तव्य आहे, नाही का जोशी साहेब ? देवाच्या नावावर त्या अज्ञानी स्त्रीला लुबाडणारा तो ठग पंड्या एकीकडे तर दोनशे रुपये देऊ केल्यावर शंभरच घेणारी ती प्रामाणिक बहुजन महिला दुसरीकडे. पण सध्या राज्य ठगांचे सुरू आहे आणि भोळेभाबडे बहुजन लुटले जात आहे. हे सत्र थांबायलाच हवे.