देशाचे दुश्मन, ( भाग 4) लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
कचकावून पावणारा म्हसोबा बनवू पाहत आहेत. सर्व गुणांचे अधिष्ठान, विद्वत्तेचे स्टोअर हाऊस, वेदांताचा किताबखाना म्हणजे बळवंतराव टिळक ! टिळकांच्या चरित्राच्या उद्दाम सद्दीत पेशवाई मस्तवालपणा पूर्णत्वास पोचलेला आढळतो. ज्या सनातनी सोनेरी टोळीचे टिळक-चिपळूणकर पुरस्कर्ते होते. त्या टोळीच्या हातात धार्मिक, सामाजिक सूत्रे होती. आणि इतर अज्ञानी होते म्हणून या बोकेसंन्यासाचा कर्मयोग दहावीस लाखाला फळफळला. देशाची प्रगती खुंटविण्याकरिता अपशकुनच करण्यास पुढे बोडके येणाऱ्या बदअवलादीच्या संस्कृतीचे टिळक चाहते होते, चिपळूणकर प्रणेते होते; म्हणूनच काही काळ यांच्या नाममहिम्याचा महागजर झाला. ज्या सोनेरी टोळीचे टिळक प्रमुख होते त्या टोळीने आजवर काय प्रताप गाजवला आहे, विचारू नका; म्हणजे टिळक-चिपळूणकर देशाचे कैवारी का वैरी याचा वाचकांना उलगडा होईल. 'वर्णश्रेष्ठत्व, शुद्धबीजत्व, ब्राह्मण' या सदराखाली मानवी बुद्धीच्या वाढमस्तकावर लंगरी खिळा ठोकणारी व शास्त्रोक्त गुलामांचा व्यापार करणारी जी व्युत्पन्नपंडितांची अहंमन्य टोळी, त्या टोळीचे टिळक- चिपळूणकर आधारस्तंभ होते. भारतीय बहुजन समाजाच्या मुखातून वेदविद्या हिसकावून अज्ञानाचा शेंदूर पाजून, स्वदेशाला निर्बुद्ध, निर्जीव करणाऱ्या कसाब कंगालांचा जयजयकार करणारे टिळक-चिपळूणकर होते. भरमसाठ भाकडकथांना धर्मग्रंथ ठरवून निव्वळ भटाभिक्षुकांच्या पोटापाण्याची सोय लावून देणारी जी अश्लील, बीभत्स पुराणे, त्या पुराणांची पक्कड बहुजन समाजाच्या मानेला जास्त कशी करकचील हीच चिंता वाहणारे हे ब्रह्मवात्युपन्न टिळक-चिपळूणकर होते ! भगवान बुद्धाच्या मानवी उत्क्रांतीला हाणून पाडून, पुन्हा चार वर्णांच्या नावाखाली चार हजार जातीला प्रसवणारी ब्राह्मणी संस्कृतीची हाडळ टिळक माऊलीची कृपासाऊली होते. 'मन जाणे पापा आणि माय
अशी विचारसरणी मांडणाऱ्या ज्या पैठणी पंडितांनी ज्ञानेश्वर महाराजांना हीनकुल ठरविले. त्या पगडभाई पंडितांच्या अठरा पगड पुराणांचा चोथा चघळणारे टिळक- चिपळूणकर होते. नामदेव, गोराकुंभार, एकनाथ, सेना न्हावी, सजन कसाई, कबीर वगैरे अनेक संत महंतांना घटात जन्मून पटात मारणाऱ्या ज्या चिगलभटांनी त्रास दिला, त्या भटकी उर्फ भिक्षुकशाहीचे टिळक-चिपळूणकर पक्षपाती होते. संतशिरोमणी तुकोबारायांनी ब्राह्मण नरमादीपोटी आलेल्या देवाच्या लाडक्या कारट्याकरिताच राखून ठेवलेले वेद आपल्या अभंगवाणीने जगापुढे मांडले, म्हणून बिचाऱ्या तुकारामांचे ग्रंथ गंगेत तर बुडवलेच पण प्रत्यक्ष तुकारामालाही डोहात बुडवायला ज्या ब्रह्मलाळोत्पन्न लफंग्यानी कमी केले नसेल त्या भटभिक्षुकांच्या आश्रयांचे टिळक-चिपळूणकर आदिनिधान होते ! केवढे ते प्रौढ प्रताप क्षत्रिय कुलवतंस शिवछत्रपती! आजन्म देहाचे रान करून ज्यांनी स्वराज्याकरिता जीविताचा संकल्प सोडला त्या शिवनृपश्रेष्ठाला या कलाच्या दत्तकपुत्रांनी किती त्रास दिला ! ब्राह्मण जातीच्या शेंड्या-मुंड्या यवनी समशेरीच्या पात्यावर आणि ब्राह्मण बहिणीच्या अब्रुचे जीवित यवनी दृष्टीच्या ओझरत्या फिरतीवर अवलंबून होते, अनाथ व नामर्द भटाच्या संरक्षणाकरिता हरहर महादेव अशी मेघ गर्जना ठोकून यवनांवर सिंहासारखा झडप घालणारा मर्दाचा मर्द शिवाजी भोसला या ब्राह्मण नावाच्या कृतघ्न सैतानांनी शुद्र ठरविला आणि राज्याभिषेकाला नालायक म्हणून निकाल दिला. सह्याद्रीच्या कडेकपारींना दाराच्या अंगणाची पोरकट कळा आणणारा नेताजी पालकर, सिंहगडाच्या माथ्यावर पाय देऊन इंद्राचे सिंहासन बळकावण्याकरिता गेलेला तानाजी मालसुरा, हत्तीच्या मस्तीला मुठ्ठीने मारणारा बलभीम जीवा महाल्या, धडापासून शीर तुटले तरी हातापासून पट्टा न काढणारा, महाराष्ट्राला पावन करणारा वीर प्रभू बाजी ! एकजात इमानी हृदयाच्या डोळ्यांनी पोराबाळांचे मुडदे पाहूनही स्वामीचोर न होणारे एकेक रणधुरंधर लेखणीचे मर्द बहाद्दर प्रभू, पहाडाची हाडे कडाकडा फोडून दडलेले स्वातंत्र्य हिसकावून घेणारे हे मराठे-प्रभू जर क्षत्रिय नसते, त्यांच्या अंगात जर क्षात्र तेजाचे शंभर नंबरी वारे संचारत नसते तर घराघरांतून या गोऱ्या गोमट्या टचाचलेल्या