बहुजन नायक कांशीराम - बापू राऊत
24 सप्टेंबर 1944 रोजी मद्रास येथे भाषण करताना बाबासाहेबांनी आपल्या चळवळीचे राजकीय उद्देश घोषित केले. डॉ.बाबासाहेब म्हणाले “Understand our ultimate goal. Our ultimate goal is to become the rulers of this country.Write this goal on the wall of yours houses so that you will never forget.Our struggle is not for the few jobs and concessions but we have a larger goal to achieve. That goal is to become the rulers of the land" 4 ऑक्टोबर 1945 ला शेड्युल्ड कास्ट फेडरेशन च्या वर्किग कमिटीच्या बैठकी मध्ये भाषण करताना बाबासाहेब म्हणाले , "Politcs should be life-blood of the Scheduled Casts". कांग्रेस हा उच्च वर्णीयांचा पक्ष आहे. या पक्षाकडून मागासवर्गीय समाजाची सतत पिळवणक झाली. त्यामुळे बाबासाहेबांना उच्च वर्णीय व्यवस्थेला बळी पडलेल्या सर्व समाज घटकाना सोबत घेऊन राजकारण करायचे होते. त्यासाठी बाबासाहेबांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ऐवजी एका नव्या पक्षाची संकल्पना पुढे आणली. रिपब्लिकन पक्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील पक्ष होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारीक व सैधांतीक विचारधारेची छाप रिपब्लिकन पक्षाच्या संकल्पनेत होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणा नंतर पक्षाच्या नेत्यांनी मात्र पक्षाला बळकट करण्याऐवजी एकेक नेते काॅंग्रेस मध्ये जाऊ लागले होते. तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व काॅंग्रेसचे दिग्गज नेते मा. यशवंतराव चव्हाण हे रिपब्लिकन पक्षाच्या एकेका नेत्याना काॅंग्रेसच्या वळचळणीला लावीत होते. दादासाहेब गायकवाड यानी लोकसभेच्या केवळ एका जागेसाठी काॅंग्रेस सोबत समझोता केला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व ढोल ताशे वाजवून या समझोत्याचे समर्थन केले. हीच रिपब्लिकन पक्षाच्या अस्ताची चाहूल होती. रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांच्या मुलभूत सिध्दांतावरुन हटू लागला व तो कांग्रेस पक्षाचा अनुसूचीत जाती सेल बनू लागला होता.
रिपब्लिकन पक्षाच्या नेत्याविरुध्द एल्गार पुकारत व दलित अत्याचारा विरोधात शासनाला व सवर्ण समाजाला हादरे देणाऱ्या राजा ढाले, नामदेव ढसाळ, गंगाधर गाडे,भाई संगारे, ज.वि.पवार व अविनाश महातेकर या नेत्यांनी सुरु केलेल्या दलित पँथर या क्रांतीकारी चळवळीचेही एकवाक्यतेचा अभाव व दिशाहीन विचार यामुळे पँथरच्या झालेल्या ठिकऱ्या होताना मा. कांशीराम यांनी पाहिले. रिपब्लिकन पक्षाची लाचारी व दलित पँथर चे पतन बघून कांशीराम यांचा मोहभंग झाला. त्यामूळेच कांशीराम यांनी स्वतंत्र आंबेडकरवादी मिशन निर्माण करण्याचा संकल्प केला. रिपब्लिकन पक्षनेत्यांच्या भाटगिरी विरुध्द आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांनी चमचा युग नावाचे पुस्तकही काढले.
रिपब्लिकन पक्षाच्या मोहभंगानंतर राजकीय पटलावर कार्य करण्यासाठी त्यांनी दलित शोषित समाज संघर्ष समिती ( डी. एस. फोर ) ची स्थापना केली. या संघटने मार्फत 24 सप्टेंबर 1982 रोजी पुणे करार धिक्कार परिषद घेतली. पुढे अनेक प्रकारच्या जनसंसदा, अधिवेशने, तीन हजार किलोमीटरचा सायकल मार्च, निश्चय दिवस, अन्याय मुक्ती आंदोलने, आत्मसन्मान रॅली, समता आणि सन्मानासाठी सामाजीक कृती अभियान असे अनेक उपक्रम राबविले. डी. एस. फोर संघटने मार्फतच हरियाना, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश व जम्मु काश्मीर विधानसभेच्या जागा लढविण्यात आल्या. निवडणूकीच्या रिंगणात डी एस फोर फार प्रभाव पाडू शकली नाही म्हणुन कांशीरामजींनी डी. एस. फोर चे पुर्ण पक्षात रुपांतर करण्याचे ठरविले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनी 14 एप्रिल 1984 साली बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. बसपाच्या स्थापनेनंतर पाहिल्यांदा 1984 साली लोकसभेच्या निवडणूकामध्ये भाग घेतला. पहिल्या निवडणूकीत उमेदवार निवडून आले नाहीत परंतू पक्षाचा प्रभाव मात्र दिसून आला. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणूकामध्ये बसपाची मतसंख्या एकसारखी वाढत राहिली व 1989 च्या निवडणूकीत बसपाचा पहिला खासदार म्हणुन सुश्री मायावती उत्तर प्रदेशातील बिजनोर मतदार संघातून निवडून आल्या.