बहुजन नायक कांशीराम - बापू राऊत
स्वातंत्र्यापासून देशाची सत्ता ही मध्यंतरीचा काही काळ वगळता मुख्यत: कांग्रेस पक्षाच्या हातात आहे. कांग्रेसची स्थापना मुख्यत: इथल्या जमीनदार,भांडवलदार व सावकार वर्गाच्या संरक्षणासाठी झाली होती. लोकसहभागामुळे नंतर ती व्यापक झाली परंतु तिचे सुत्रधार हे परंपरावादी ब्राम्हण, भांडवलदार, जमीनदार व सावकारच होते. काॅंग्रेसची ही परंपरा आजही कायम आहे. फरक एवढाच की काॅंग्रेसनी वेगवेगळ्या जाती जमाती मध्ये त्या त्या जातीचे सुभेदार निर्माण करून राजकीय सत्तेवरील आपले आसन मजबूत केले व या सुभेदारांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी नेहमी साठी आपली सत्तेवरील पकड मजबूत करुन ठेवली. सत्तेच्या काही तुकडयासाठी हे सुभेदार सत्ताधाऱ्याच्या अवती भोवती फिरत असतात. या सुभेदारांचा विकास म्हणजे समाजाचा विकास होत नाही. समाजाच्या विकासासाठी नियोजन, साधनसामग्री, दबाव गट व अवलोकन याची गरज असते. गरीबी हटाव या दुकानदारीच्या नावावर देशाच्या सत्तेवर नेहमीच काॅंग्रेस विराजमान झाली आहे परंतु सत्तेवर येताच गरीबी दूर करण्याचा विचार काॅंग्रेस विसरुन जाते व आपल्या पठडीतील नवे भांडवलदार निर्माण करण्याच्या पाठी लागते. शेवटच्या पाचव्या वर्षी गरीबी हटाव व नव्या योजनांची घोषणा होते त्यासाठी बजेट ही बनविला जातो परंतु हा पैसा कधीच लाभधारकापर्यंत पोहोचत नाही तर तो सत्ताधारी व नोकरशाहीच्या घशात जातो.काॅंग्रेसच्या या चकवेधारी नीतीला देशातील जनता कंटाळली होती. तिला बदल हवा आहे.भारतीय जनता पक्षाच्या रुपाने व अटलबिहारी वाजपेयी च्या उदारमतवादी चेहऱ्याने हा पक्ष कांग्रेस ला पर्याय होता परंतु हिंदुत्व व अल्पसख्यांकाच्या विरोधा मुळे ह्या पक्षाचे रुपांतर वावटळी सारखे झाले आहे. जनतेची हिंदू व अहिंदू अशी विभागणी करण्याचा या पक्षाचा मनसभा लोकानी फेटाळून लावला.
आंबेडकरवादी कांशीरामजींचा उदय हा आतापर्यंतच्या दुर्लक्षीत समाजासाठी एक दिलासा होता.सक्षम नेता व पक्ष यांची विश्वासाहर्ता निर्माण झाल्यास जनता अशा पक्षाच्या व नेत्याच्या मागे जात असते.कांशीरामजीने कठोर मेहनत करुन बहुजनवादी चेहऱ्याच्या पक्षाची निर्मिती केली. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी' ह्या सिध्दांतानुसार बहुजन समाजाला आकृष्ट केले व देशात आतापर्यंत चालत आलेल्या ब्राम्हणवादी चेहऱ्याच्या पक्ष परंपरेला खीळ बसली. कांशीरामजींनी भुतकाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. राम मनोहर लोहिया यांनी केलेल्या कार्याला वर्तमानात पुनरुज्जिवीत केले व प्रस्थापीत पक्षांना धक्के देत कांग्रेस सारख्या पक्षाला उत्तर प्रदेशातून निर्वासीत केले तर इतर प्रदेशात काॅंग्रेसच्या परंपरागत मतदाराला बसपा कडे खेचले. बसपा हा देशात एकमेव असा पक्ष आहेत ज्याची मतदार संख्या प्रत्येक निवडणकागणीक वाढत आहे.बसपाच्या वाढत्या प्राबल्यामुळे धास्तावलेले पक्ष व वर्णवर्चस्व वादी मंडळी बहुजन समाज पक्ष हा केवळ दलितांचा पक्ष आहे असा भ्रामक प्रसार करुन इतर समाजगटातील लोकांना या पक्षात येण्यास रोखत आहेत तर मायावती व बहुजन समाज पक्षावर प्रसार माध्यमे व सिबीआय मार्फत विविध प्रकारचे आरोप लावून मायावतीचा दलित समाजात असलेला आदर व सहानूभुती कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. असे असले तरी पुढील काळात बहुजन समाज पक्ष हा देशाचा पहिला वा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असेल. भारतीय राजकारणातील हा बदल पुढील काळी अपेक्षीत असून अमेरीकेतील टाईम्स या पत्रिकेने सुध्दा पुढील 20 वर्षात भारतात मायावतीच्या नेतृत्वाखाली मोठा राजकीय व सामाजीक बदल होईल असे भाकीत केले आहे.
काॅंग्रेस व भाजपा हे दोन्ही पक्ष संघाला ( आर. एस. एस ) पुरक आहेत. या दोन्ही पक्षामुळे देश धर्माच्या, जातीच्या, द्वेषाच्या व अंधश्रध्देच्या खाईत लोटल्या गेला .देशातील समस्या अधिकाधिक गुंतागुंतीच्या झाल्या. काॅंग्रेसचा धर्मनिरपेक्षतावाद हा केवळ मुखवटा असून शासकिय कार्यालयात सत्यनारायणाच्या महापूजा घालण्यात येतात. हिंदू धर्माचे सांस्कृतीक कार्यक्रम आखण्यात कांग्रेस पुढाऱ्यांचा नेहमीच पुढाकार असतो. यज्ञाच्या कार्यक्रमाचे प्रायोजक हे मुख्यत: काॅंग्रेस पुढारीच असतात. 170 वर्षापूर्वीची बाबरी मस्जीद पाडल्या जाणार असी माहीती गप्तहेर संस्थानकडून मिळाल्यानंतरही मस्जीद वाचविण्याचे प्रयत्न तेव्हाचे काॅंग्रेसचे प्रधानमंत्री पी. व्ही. नरसिहराव यांचे कडून करण्यात आले नव्हते. स्वतंत्र भारताचे हिंदूस्तान असे नामउच्चारन करण्यास काॅंग्रेस पुढारी सदैव पुढे पुढे असतात तर बुध्दगयेतील महाबोधी महाविहार बौध्द धम्मीयांच्या हातात देण्यास काॅंग्रेस कोणतेच पाउल उचलत नाही.
मा. कांशीरामजी हे स्पष्टवक्ते होते. त्यांनी कोणत्याही धर्माचा मुलाहिजा न ठेवता पाडलेल्या बाबरी मस्जीद च्या ठिकाणी लोकांच्या सुविधासाठी टॉयलेट व हॉस्पिटल बांधण्याची जाहीर मागणी केली होती. त्यांनी बहजन समाज पक्षाचे स्वरुप धर्मनिरपेक्षवादी ठेऊन विज्ञानवादावर आधारीत समाजव्यवस्थेचे बीजरोपण असी संकल्पना मांडून गौतम बुध्दाच्या विज्ञानवादी व्यवस्थेचे समर्थन केले होते. सदैव खोट्या गोष्टी प्रसारीत करुन व भावनीक ब्लॅकमेल करून जनतेला फसवता येत नाही. विज्ञानाला विरोध करायचा परंतु विज्ञानाच्या मार्फतच धार्मिक उन्माद माजवून लोकांना लुबाडायचे हे जेव्हा जनतेला कळेल तेव्हा ब्राम्हणी व्यवस्था कोलमडून पडेल. त्यातूनच मग नव्या विज्ञानवादी व्यवस्थेचा उगम होईल.