मुक्ती कोन पथे ? लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
काही जण अस्पृश्यांच्या सभेत मोठ्या तावातावाने अस्पृश्यांना शिव्या देतील; काही जण अस्पृश्यांच्या सभेत येऊन मोठ्या आढ्यतेने अस्पृश्यांना सांगतील की बाबांनो, तुम्ही स्वच्छ राहा, शिक्षण घ्या तुमच्या पायावर उभे राहा वगैरे. खरे म्हटले असता कोण आरोपी असेल तर तो स्पृश्य वर्ग, कोणाचे चुकत असेल तर ते स्पृश्य वर्गाचे. पण त्या स्पृश्य वर्गाच्या सभा करून त्यांची कान उघडणी करतील तर हराम आहे. हिंदु धर्मातच राहून तुम्ही आपला लढा चालू ठेवा, तुम्ही आम्ही मिळून तो यशस्वी करू असे सांगणाऱ्या सुधारकांना दोन गोष्टीची आठवण करून देणे अनावश्यक वाटते. गेल्या महायुद्धात एका अमेरिकन व इंग्लिश माणसामध्ये लडाई संबंधाने झालेला संवाद माझ्या वाचनात आलेला आहे. तो उदबोधक असल्या कारणाने त्याचा याप्रसंगी उल्लेख करणे उचित वाटते. संवादाचा बिषय लढाई कोठपर्यत चालू ठेवावयाची या संबंधाने होता. त्या अमेरिकन गृहस्थाच्या प्रश्नाला उत्तर देताना इंग्रज़ माणसाने मोठ्या तोराने सांगितले कि शेवटचा फ्रेंच माणूस ठार होईपर्यत आम्ही हि लड़ाई लढू, हिंदू समाजातील सुधारक जेव्हा असे म्हणतात की, अस्पृश्यतेचा लढा हि आम्ही शेवटपर्यंत लढू. तेव्हा शेवटचा अस्पृश्य ठार होईपर्यत आम्हा लटू, असाच त्याचा अर्थ मी तरी निदान करतो. दुसऱ्याचे शीर तळहातावर घेऊन युद्धाला निघणाऱ्या योद्धयापासून विजयश्रीचा आशा धरणे कितपत रास्त आहे, हे ठरविणे तुम्हाला काही अवघड जाऊ नये. आमच्या लढ्यात जर आम्हीच मरणार आहोत तर मग भलत्याच ठिकाणी लढा करण्यात काय हासिल आहे? हिंदु समाजाची सुधारणा करणे हे आपले ध्येय नाही, हे आमचे कार्य नाही. आमचे स्वातंत्र्य मिळविणे हे आमचे ध्येय आहे. या पलीकडे आम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्तव्य नाही. धर्मातर करून जर आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळू शकते तर आम्ही हिंदू समाजाच्या सुधारणेचा लढा काय म्हणून आमच्या अंगावर घ्यावा? व त्या लढ्यात आमच्या सामर्थ्याची, शक्तीची व द्रव्याची आहुती काय म्हणून द्यावी? हिंदू समाजाची सुधारणा करणे हा अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीचा मुख्य हेतू आहे असा कोणीही आपला गैरसमज करून घेऊ नये. अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीचा मुख्य हेतू अस्पृश्यांना सामाजिक स्वातंत्र्य मिळवून देणे हाच आहे आणि ते स्वातंत्र्य धर्मांतर शिवाय प्राप्त होणार नाही. हे हि तितकेच खरे आहे. अस्पृश्यांना समतेची आवश्यकता आहे, हि गोष्ट मला मान्य आहे व समतेची प्राप्ती हा खरोखरीच त्याच्या चळवळीचा हेतू आहे. परंतु हि समता प्राप्त करून घेण्याकरिता त्यांनी हिंदु धर्मातच राहिले पाहिजे, नाहीतर समता प्राप्त व्हावयाची नाही, असे कोणालाही म्हणता येणार नाही. समता प्राप्त करून घेण्याचे दोन मार्ग मला दिसतात. हिंदु धर्मात राहून समता मिळवावयाला किंवा धर्मातर करून समता मिळवावयाची. हिंदु धर्मात राहून समता प्राप्त करायची झाल्यास नुसती शिवाशिव जाऊन कार्यभाग होणार नाही. रोटी व्यवहार व बेटी व्यवहार घडला तरच समानता प्राप्त होऊ शकेल. याचाच अर्थ असा कि चातुर्वर्णयाचा बिमोड झाला पाहिजे व ब्राहमण धर्माचा विध्वंस झाला पाहिजे. ही गोष्ट शक्य आहे काय? व ही जर शक्य नसेल तर हिंदु धर्मात राहून समतेच्या वागवणुकीची अपेक्षा करणे शहाणपणाचे होईल काय? व या प्रयत्नात तुम्हाला यश येईल काय? त्या मानाने धर्मांतराचा मार्ग किती तरी सोपा आहे. हिंदु समाज़ मुसलमान समाजाला समतेने वागवितो. हिंदु समाज ख्रिस्ती समाजाला समतेने वागवितो अर्थात धर्मांतराने सहजगत्या सामाजिक समता प्राप्त होऊ शकते. जर खरे आहे तर मग धर्मांतरा सारख्या साध्या सोप्या मार्गाचा तुम्ही अवलंब का करू नये? माझ्या मते धर्मांतराचा मार्ग हा जसा अस्पृश्य लोकांना तसाच हिंदुना ही सुखाचा होणार आहे. हिंदु धर्मात राहाल तोपर्यंत तूम्हाला त्यांच्याशी शिवाशिवी करिता, पाण्या करिता, रोटी करिता, बेटी करिता भांडण करावे लागेल. व जोपर्यंत हे भांडण चालु राहील तोपर्यंत तुमच्यात आणि त्यांच्यात बखेडा माजेल व तुम्ही एकमेकांचे वैरी होऊन राहाल. धर्मांतर केले तर भांडणाचे सर्व मूळ नाहीसे होईल. तुम्हाला त्याच्या देवळावर हक्क सांगण्याचा काही अधिकार राहणार नाही व जरुरी हि राहणार नाही. सहभोजन करा, सहविवाह करा वगैरे सामाजिक हक्काकरिता भांडण्याचे काही कारण उरणार नाही आणि हे भांडण जर मिटले तर उभयतांमध्ये प्रेम वाढून सलोखा उत्पन्न होईल. आज मुसलमान व खिस्ती समाजाचा व हिंदू समाजाचा परस्पर स्थिती काय आहे हे पाहा. तुमच्या प्रमाणे हिंदू लोक मुसलमानांना अगर खिस्ती लोकांना आपल्या देवळात घेत नाहीत. तुमच्या प्रमाणे त्यांच्याशी रोटी व्यवहार करीत नाहीत. बेटी व्यवहार करीत नाहीत, असे असताना त्यांच्यात आणि हिंदू मध्ये जो आज सलोखा आहे तो तुमच्यात आणि हिंदुत नाही हा जो फरक आहे त्याचे मुख्य कारण हेच की, तुम्ही हिंदु धर्मात राहिल्यामुळे हिंदू समाजाशी सामाजिक ब धार्मिक हक्कांकरिता तुम्हाला भांडावे लागते. परंतु ते हिंदु धर्मातून बाहेर गेल्यामुळे त्यांना हिंदू लोकांशी धार्मिक व सामाजिक हक्कांकरिता लढा चालविण्याचे कारण पडत नाही. दुसरे असे कि हिंदू समाजात त्यांना कोणत्याही प्रकारचे सामाजिक हक्क नसले, म्हणजे त्याच्याशी रोटी व्यवहार होत नसला व बेटी व्यवहार होत नसला तरी हिंदू समाजात त्यांना असमानतेने वागवत नाही. धर्मातराने ज़र समता प्राप्त होऊ शकते. धर्मातराने ज़र हिंदू आणि अस्पृश्य यांच्या मध्ये सलोखा उत्पन्न होऊ शकतो तर तो समतेचा साधा आणि सूखकर मार्ग अस्पृश्य लोकांनी का स्वीकारू नये? अशा रितीने पाहिले असताना हा धर्मातराचा मार्ग खऱ्या स्वातंत्र्याप्रत नेणारा आहे व त्यापासून खरी समता प्राप्त होणार आहे. धर्मातराचा मार्ग हा पळपुटेपणाचा मार्ग नाही, तो एक शहाणपणाचा मार्ग आहे.
धर्मातराच्या आड आणखी एक बाब उपस्थित करण्यात येते. जातिभेदाला त्रासून धर्मातर करण्यात काही अर्थ नाही. असा युक्तिवाद काही हिंदू लोक करतात. कोठे हि गेलात तर तेथे जातीभेद आहेतच. ख्रिस्तात गेलात तरी त्याच्यात हि जातीभेद आहेत असे हिंदू लोक सांगतात. दुदैवाने हि गोष्ट कबूल करणे प्राप्त आहे कि हिंदुस्तानातील अन्य धर्मीय समाजामध्ये सुद्धा जातीभेदाचा शिरकाव झाला आहे. पण या पापाचे धनी हिंदू लोकच आहेत. मूळात हा रोग त्यांच्यातून उद्भवलेला आहे. त्यांचा संसर्ग मग इतर लोकांना झाला आहे ही त्यांच्या दृष्टीने नाईलाजाची गोष्ट आहे. ख्रिस्ती व मुसलमान यांच्या मध्ये जरी जातीभेद असला तरी तो जातीभेद हिंदूतील जातिभेदासारखा आहे. असे म्हणणे कोतेपणाचे लक्षण आहे असे म्हणावे लागेल. हिंदू जातीतील जातीभेद व मुसलमान व ख्रिस्ती यांच्यातील जातीभेद या दोघांमध्ये मोठे अंतर आहे, पहिल्या प्रथम हि गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे कि मुसलमान व ख्रिस्ती यांच्या मध्ये जरी जातीभेद असला तरी तो जातीभेद समाजाचे प्रमुख अंग असे कोणालाही म्हणता येणार नाही. "तू कोण?" याला "मी मुसलमान आहे", "मी ख्रिस्ती आहे" एवढे उत्तर दिले असताना त्या उत्तरावरून सर्वांचे समाधान होते. "तुझी जात काय?"असे विचारण्याची कोणास ही आवश्यकता भासत नाही. परंतु कोणीही हिंदूला "तू कोण?" असा प्रश्न विचारला असताना "मी हिंदू" अरे उत्तर दिले तर तेवढ्याने कोणाचे ही समाधान होऊ शकत नाही. "तुझी जात काय?" असा प्रश्न विचारण्यात येतो व त्यांचे उत्तर दिल्या शिवाय कोणालाही त्याच्या स्थितीचा उमज पडत नाही यावरून हिंदू समाजातील जातीयता कसे प्राधान्य देण्यात आले आहे व मुसलमान व ख्रिस्ती समाजात तिला कसे गौणपद प्राप्त झाले आहे. हा मुद्दा आपोआप सिद्ध होऊ शकतो. याशिवाय हिंदूतील व इतरांमधील जातीभेद यामध्ये आणखी ही एक महत्वाचा फरक आहे. हिंदूतील जातीभेदाच्या मुळाशी हिंदूचा धर्म आहे. मुसलमान व ख्रिस्ती यांच्यातील जातीभेदाच्या मुळाशी त्याच्या धर्माचे अधिष्ठान नाही. हिंदूंनी 'जातीभेद मोडू' असे म्हटलं असता त्यांचा धर्म त्यांच्या आड येईल. परंतू ख्रिस्ती व मुसलमान लोकांनी आपल्यातील जातीभेद मोडण्याचा उपक्रम आरंभिला तर त्यांचा धर्म त्यांच्या विरुद्ध येऊ शकणार नाही. हिंदूंना धर्मनाश केल्या शिवाय जार्ती विध्वंसन करता येणार नाहीं मुसलमान व ख्रिस्ती लोकांना जातिनाशन करण्याकरिता धर्मनाशन करण्याचे काही कारण नाहा. जातिनाशनाच्या क्रमात त्यांचा धर्म त्यांच्या आड येणार नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्या धर्माचा अशा कार्याला पार मोठा पाठिंबा मिळू शकेल. जातीभेद सर्वत्रच आहे, असे जरी कबूल केले तरी हिंदु धर्मातच राहा, असा निष्कर्ष त्यापासून निघू शकत नाही, जातीभेद हि गोष्ट ज़र अनिष्ट असेल तर ज्या समाजात गेले असताना जातीभेदाची तीव्रता विशेष नाही किंवा ज्या समाजात गेले असताना जातीभेद लवकर, सहन व सुलभपणे मोडता येईल त्या समाजात जा, हाच खरा तर्क शुद्ध सिद्धांत आहे असे मानावे लागेल.
"नुसत्या धर्मातराने काय होणार? तुम्ही आपली आर्थिक स्थिती, शैक्षणिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करा." असे काही हिंदू लोक सांगत आहेत. या प्रश्नाने आपल्या पैकी काही लोक संभमून जाण्याचा संभव आहे आणि म्हणून त्या प्रश्नाचा विचार करणे मला आवश्यक वाटते. प्रथमतः प्रश्न असा का तुमचा आर्थिक व शैक्षणिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न कोण करणार आहे ? तुम्ही किंवा तुम्हाला असा उपदेश करतात ते? हिंदू लोक तुम्हाला असा उपदेश करतात ते बोलण्या पलीकडे तुमच्या करिता काही करतील असे मला वाटत नाही व करण्याची त्यांची तयारी ही मला दिसत नाही. उलट जो तो हिंदू आपापल्या जाती पुरती दृष्टी ठेवून आपापल्या जातीचा आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता झटत आहे. ब्राह्मण लोक ब्राह्मण बायकांकरिता सुतिकागृहे, ब्राह्मण मुलांकरिता स्कॉलर शिप, ब्राह्मण बेकारांना नोकऱ्या मिळवून देण्याची सोय, यामध्ये गुंतले आहेत. सारस्वत तसेच करित आहेत. जो तो आपापल्याकरिता व ज्याला कोणी नाही त्याचा वाली परमेश्वर, अशी स्थिती आहे. तुमची उन्नती तुम्हीच करावयाची दुसरा कोणी तुम्हाला मदत करणार नाही अशी जर खरी स्थिती आहे तर या लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्यात काय हासिल आहे? नुसती दिशाभूल करून कालक्षेप करण्या पलीकडे यांचा दुसरा काही हेतू दिसत नाही. तुमची स्थिती तुम्हीच सुधारावयाची, असेच जर या हिंदू लोकांचे म्हणणे असेल तर त्यांच्या तर्कटांकडे लक्ष देण्याचे कोणाला काही कारण नाही व उपदेश करण्याचा त्यांना कोणाला काही अथिकार हि नाही. तथापि एवढेच सांगून हा प्रश्न सोडून देण्याचा माझा विचार नाही त्याचे खंडण करणे मला आवश्यक आहे.