लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आता विषयाला सुरवात करू या. सुप्रसिद्ध वंशशास्त्रज्ञांच्या मते भारतातील लोकसंख्या आर्य, द्रविड, मंगोलियन आणि शिथिअन या वंशांच्या मिश्रणाने बनलेली आहे. हे लोकसमूह वेगवेगळया दिशांनी भिन्न भिन्न संस्कृतीं. सह शेकडो वर्षापूर्वी भारतात आले. त्यावेळी त्यांची राहणी भटकी होती. यापैकी प्रत्येक टोळी भारतात क्रमशः घुसली आणि तेथील लोकाशी लढाई करून तेथे तिने आपला जम बसविला. यानंतर मात्र ते शेजाऱ्या प्रमाणे शांततेने राहू लागले. नित्य संबंध आणि पारस्पारिक व्यवहारामुळे त्यांच्यात एका संस्कृतीचा उदय झाला; आणि तीत त्यांच्या भिन्न संस्कृतीचा लोप झाला. भारतात आलेल्या या विभिन्न वंशातील लोकांचे पूर्णतः एकीकरण झालेले नाही ही गोष्ट मान्य करावीच लागते. कारण भारताच्या सीमांमध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे व दक्षिणेकड़न उत्तरेकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशाला शरीर रचनाच नव्हे तर लोकांच्या वर्णामध्येसुद्धा लक्षात घेण्याजोगा फरक आढळतो. तथापि एखाद्या लोकसमूहाच्या एकत्वासाठी केवळ वेगवेगळया वंशाच्या लोकांचे पूर्णतः एकत्रीकरण होणे हा मुद्दा पुरेसा होऊ शकत नाही. वंशशास्त्रदृष्टाया सर्व लोकसमूहाच्या एकत्वासाठी केवळ सांस्कृतिक ऐक्य हेच त्यांच्या एकत्वाचे गमक असते. हे विधान मान्य झाल्यास मी असे धाडसी विधान करू इच्छितो की लोकांच्या सांस्कृतिक एकतेच्या बाबतीत दुसरा कोणताही देश भारताची बरोबरी करू शकत नाही. भारत केवळ भौगोलिक दृष्टयाच एक आहे असे नव्हे तर एकतेच्या इतर कोणत्याही गमकापेक्षा भारतात अधिक मूलभूत असलेली सांस्कृतिक एकता एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आढळून येते. परंतु या एकत्यामुळेच जातीसमस्येचे स्पष्टीकरण करणे अधिकच बिकट होते. हिंदू समाज हा जर केवळ परस्परासून भिन्न अशा जातींचा समूह असता तर हा विषय अतिशय सोपा झाला असता. परंतु आधीच एकसंध असलेल्या समाजाचा जात हा एक तुकडा आहे म्हणूनच जातींच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण बिकट ठरते.
संशोधनाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष पाऊल टाकण्यापूर्वी आपण जातीच्या वैशिष्टयांबद्दल सतर्क होणे अधिक फायदेशीर ठरेल. म्हणून जातीसंस्थेचा अभ्यास करणाऱ्या काही विद्वानांचा आश्रय घेऊन मी त्यांनी केलेल्या तिच्या व्याख्यांकडे लक्ष वेधू इच्छितो.
१) मि. सेनार्ट हा फ्रेंच विद्वान जातीची लक्षणे अशी सांगतोः जात ही आनुवंशिकतेच्या दृढ बंधनांनी तत्वशः बांधलेली एक घनिष्ठ संस्था होय. तिला रुढीने चालत आलेली एक स्वतंत्र जातपंचायत असते. या पंचायतीचा एक प्रमुख असतो. या पंचायतीची बैठक विशिष्ट सणांच्या दिवशी व खास प्रसंगी होते. तीत बहुधा निवडक लोक भाग घेतात. जात एका विशिष्ट धंद्याशी निगडित असते. जातीतील लोकांचा परस्परातील संबंध मुख्यतः रोटी बेटी व्यवहार व सार्वत्रिक उत्सवांनी नियंत्रित होतो. विटाळाच्या मर्यादा वेगवेगळया असतात. परंतु समाजप्रमुखाला विशिष्ट प्रकारचे दंड ठोठावण्याचा पूर्णतः अधिकार देण्यात आलेला असतो. जातीबाहेर टाकण्याचा सर्वात मोठा अनिबंध अधिकारही प्रमुखाला देण्यात आलेला असतो.
२) मि. नेफिल्ड जातीची व्यख्या पुढीलप्रमाणे करतोः
जात हा असा एक लोकसमूह असतो की त्याचा इतर लोकसमूहाशी लग्न व खाणे पिणे या बाबतीत परस्पर संबंध मुळीच नसतो. या समूहान तील व्यक्ती केवळ अंतर्गत गटातील व्यक्तींपुरतेच वरील प्रकारचे संबंध मर्यादित ठेवतात.
३) सर. एच. रिस्ले यांच्या मते, जात ही काही कुटुंब किंवा कुटुंब समूह यांच्या एकत्रीकरणाने तयार होते. तिला एक स्वतंत्र नाव असते. बहुधा जात एखाद्या विशिष्ट धंद्याशी निगडित असते. कोणत्यातरी पौराणिक पुरुषापासून किंवा देवतेपासून या जातीचा उगम झाला असा लोकांचा दृढ समज असतो. परंपरागत उद्योग करण्यास त्या जातीतील लोकांची मान्यता असते. इतर जातीतील प्रमुखांचीही ती एकसंध जात असल्याबद्दल तिला मान्यता असते.
४) डॉ. केतकरांच्या मते जात ही एक सामाजिक संस्था असून तिची वैशिष्टये दोन आहेत. १) जातीचे सभासदत्व केवळ जातीत जन्माला आलेल्यापुरतेच मर्यादित असते. आणि त्या जातीत जन्माला आलेल्या सर्वांचा तिच्यात समावेश होतो. २) काठोर जातकायद्यान्वये जातीतील व्यक्तींना जातीबाहेर लग्न करण्यास मनाई करण्यात आलेली असते.
या व्याख्यांचे परीक्षण करणे आपल्या दृष्टीने फारच महत्वाचे आहे. यातील प्रत्येक व्याख्या बारकाईने पाहिल्यास असे दिसून येईल की लेखकांनी अतिव्याप्ती किंवा अव्याप्तीचा अलंब केला आहे. यापैकी कोणतीही व्याख्या स्वयंपूर्ण किंवा बरोबर नाही; इतकेच नव्हे तर जाती व्यवस्थेच्या घडणीमधील मध्यवर्ती मुद्दाच त्यांच्या नजरेतून निसटलेला आहे. जातीचा एकाकी विचार करण्याच्या प्रयत्नामुळे त्यांच्याकडून ही चूक झालेली आहे. कारण जात ही जातीच्या साखळीत एक दुवा असून तिचा दुसऱ्या जातीशी एक निश्चित प्रकारचा संबंध असतो. सर्व जातीमिळून एक स्वयंपूर्ण जातिसंस्था निर्माण होते. या सर्व जाती परस्परांना पूरक असून एका जातीत अस्पष्ट असणाऱ्या बाबी दुसऱ्या जातीत ठळकपणे दिसून येतात. म्हणून परीक्षणाच्या माध्यमातून वरील व्याख्यांमध्ये सर्व जातीत समानपणे आढळणाऱ्या मुद्यांचेच मी विवेचन करतो. कारण हे समान गुणधर्मच जातीची वैशिष्टे म्हणून वरील व्याख्यात दाखविण्यात आलेले आहेत.
सेनार्टपासून सुरवात करू या. "विटाळाच्या कल्पनेकडे" जातीचे वशिष्टय म्हणून त्यांनी लक्ष वेधलेले आहे. जातीच्या घडणीतील 'विटाळाची कल्पना' हे खास वैशिष्ट नव्हे हे सहजगत्या स्पष्ट होण्यासारखे आहे. साधारणतः ही कल्पना ब्राम्हणी कर्मकांडातून निर्माण होते. आणि शुद्धाशुद्धतेच्या सर्वमान्य कल्पनेचेच ते एक विशिष्ट रूप आहे.' यामुळेच कोणत्याही जातीच्या कार्यपद्धतीत फारसा बदल न करताही विटाळाची कल्पना पूर्णतः काढून टाकता येण्यासारखी आहे.
ही कल्पना ब्राम्हण जातीत मुख्यत्वे प्रचलित असल्यामुळे त्यांना सर्वोच्च स्थान उपभोगण्यास मिळते व यामुळेच संपूर्ण जातीव्यवस्थेला ही कल्पना जोडण्यात आली. कारण उपाध्यायपद आणि शुद्धाशुद्धतेची कल्पना ही हातात हात मिळवून चालत आलेली आहे, याची आपणास कल्पना आहेच. म्हणूनच जोपर्यंत जातींना धार्मिक बैठक असते तोपर्यंत 'विटाळाची कल्पना' ही जातीचे वैशिष्टय ठरू शकते असा याचा निष्कर्ष निघतो. नेस् फिल्डने जातिबाह्य भोजनाच्या बंदीवर एक वैशिष्टय म्हणून विशेष भर दिला आहे. मुद्याचे नाविन्य लक्षात घेऊनही आपणाला म्हणता येईल की त्यांनी कार्य आणि कारण यामध्ये गल्लत केली आहे. जात ही एक स्वयंमर्यादित संस्था असल्यामुळे स्वभावतःच तिच्या सभासदांवर भोजनादि सामाजिक व्यवहार अंतर्गतच करण्याची मर्यादा पडते. याचाच अर्थ असा की जातिबाह्य भोजनबंदी ही मुद्दाम लादलेली नसून ती जातीच्या स्वभाव धर्माचाच (फुटीर वृत्ती) एक परिणाम आहे. या फुटीर वृत्तीतूनच जातिबाहर भोजनबंदी निर्माण झाली व तिला धार्मिक आज्ञेचे रूप प्राप्त झाले असावे. रिस्लेने लक्षात घेण्याजोगा कोणताही नवीन मुद्दा सांगितलेला नाही.
आता आपण डॉ. केतकरांच्या व्याख्येकडे वळू या. त्यांनी या विषयाच्या सष्टीकरणासाठी बरेच परिश्रम घेतलेले आहेत. ते एतद्देशीय तर आहेतच शिवाय त्यांनी जातीचा अभ्यास खऱ्याखुऱ्या विवेचक बुद्धीने व खुल्या अंतःकरणाने केला आहे. त्यांची व्याख्या निश्चितच विचारात घेण्याजोगी आहे. कारण त्यांनी संपूर्ण जातिव्यवस्थेच्या संदर्भात जातीची व्याख्या केली असून जातीच्या अस्तित्वासाठी अत्यंत अनिवार्य अशा वैशिष्टयांवरच लक्ष केन्द्रित केले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी इतर दुय्यम दर्जाच्या व आनुषंगिक वैशिष्टयांकडे दुर्लक्ष केले आहे. या बाबतीत ती सुबोध व स्पष्ट असूनही तिच्यात काहीसा वैचारिक गोंधळ झालेला आहे, असे म्हणणे भाग आहे. जातिबाहय विवाहबंदी जातीत जन्मलेल्यांनाच सदस्यत्व असे त्यांनी दोन मुद्दे मांडलेले आहेत. मला म्हणावयाचे आहे की हे दोन्ही मुद्दे डॉ. केतकर समजतात त्याप्रमाणे वेगवेगळे नसून एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विवाहाला बंदी घातल्यानंतर परिणामतः सदस्यत्व जातीत जन्मणान्यापुरतेच मर्यादित होते अशा तऱ्हेने या दोन्ही बाबी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
जातीच्या वेगवेगळ्या वैशिष्टयांचे परीक्षण केल्यानंतर निसंदिग्धपणे दिसून येते की जातिबाह्य विवाहाची उणीव-जात्यंतर्गत विवाह-हाच खराखुरा जातीचा आत्मा आहे. परंतु यावर संदिग्ध अशा मानववंश शास्त्राच्या दृष्टीने कोणी आक्षेप घेऊ शकेल. कारण जातीसमस्या निर्माण न करताही जगाच्या पाठीवर असे गटांतर्गत विवाह करणारे समाज आढळन येतात. साधारणतः हे खरे आहे. कारण परस्परापासून सांस्कृतिक भिन्नता असलेले-स्वगटातच विवाह करणारे काही समाज बऱ्याच वेळा एकाच गावात वेगवेगळया मोहल्यात राहतात. वस्तुतः त्यांचा परस्परांशी फारच थोडा संबंध असतो, अशी खरी स्थिती आहे. युनायटेड स्टेट्समध्ये निग्रो, गोरेलोक आणि अनेक भटके लोक राहतात. त्यांना अमेरिकन इंडियन या नावाने ओळखले जाते. हे उदाहरण वरील मताच्या योग्य समर्थनासाठी उद्धृत केले जाऊ शकते. परंतु भारतात वेगळी स्थिती असल्यामुळे आपण आपल्या विषयात उगीच गोंधळ निर्माण करू नये. भारतीय लोकसमूह हा एकसंध समाज आहे याचा उल्लेख मी पूर्वीही केलेला आहे. भारतात आलेले वेगवेगळ्या वंशाचे लोक भिन्न भिन्न प्रदेशात स्थायी झाल्यानंतर परस्परात विलीन झाले आणि त्यांच्यात सांस्कृतिक एकता निर्माण झाली. ही सांस्कृतिक एकताच एकात्मतेचे खरेखुरे गमक आहे. ही एकात्मता जमेस धरल्यास जातीची समस्या नवीन लक्षणांनी युक्त अशी समस्या ठरते. ही लक्षणे केवळ स्वगटात विवाह करणारे समाज व भटके लोक यांच्या सान्निध्यातून निर्माण झालेली दिसून येत नाही. भारतातील जाती ह्या एकसांध समाजाचे कृत्रिमपणे लचके तोडून निर्माण केलेले निश्चित व स्थिर असे घटक होत. या प्रत्येकावर जात्यंतर्गत विवाहाच्या रूढीद्वारे परस्परांत मिसळून जाण्याची बंदी घालण्यात आली आहे. अशा तन्हेने, अपरिहार्यपणे निष्कर्ष निघतो की जात्यंतर्गत विवाह हेच जातीचे व्यवच्छेदक लक्षण ठरते; आणि जात्यंतर्गत विवाहाची रूढी कशी टिकवून ठेवल्या गेली हे जर आपण स्पष्ट करू शकलो तर आपण जातीचा उगम व घडण प्रत्यक्षपणे सिद्ध केल्यासारखे होईल.
जातीव्यवस्थेच्या गुहेची जात्यंतर्गत विवाह ही गुरुकिल्ली आहे असे मी का म्हणतो हे तुमच्या चटकन लक्षात येणार नाही. तुमच्या कल्पना शक्तीला अधिक ताण पडू नये म्हणून त्याची कारणे मी आता सांगण्यास सुरवात करीत आहे याच वेळी या ही मद्यावर भर देणे अनाठायी होणार नाही की भारतीय समाजाऐवजी जगातील दुसऱ्या कोणत्याही समाजात पुरातन रुढीचे अवशेष विशेषत्वाने आढळत नाहीत. त्यांचा धर्म मूलतः प्राचीन असून काल व संस्कृती यांची कितीही प्रगती झाली असली तरी त्यांचे वर्णविषयक कायदे आजही जुन्या जोमानेच कार्यशील आहेत या प्राचीन रूढी की जिच्याकडे मी आपले लक्ष वेध इच्छितो ती म्हणजे गटबाह्य विवाहाची रूढी * होय. प्राचीन काळी गटबाह्य विवाहाची पद्धती सर्रास रूढ होतो. याचे अधिक स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता नाही. ताथापि काळाच्या ओघाबरोबर गटबाह्य विवाहाची रुढी मागे पडली आणि केवळ रक्ताचे नातेवाईक वगळल्यास आज लग्नाच्या क्षेत्रात कोणतेही सामाजिक बंधन उरले नाही. परंतु भारतीय लोकांच्या बाबतीत गटबाह्य विवाहाचा कायदा हा आजही सक्तपणे पाळण्यात येतो. वस्तुतः भारतात आज वेगवेगळया वंशाच्या लोकांचे गट उरले नसले तरी भारतीय समाजाला अजूनही गटपद्धतीच्या छटा चिकटलेल्या आहेत. गटबाह्य विवाह पद्धतीच्या नियमाभोवती रूंजी घालणाऱ्या विवाह पद्धतीत आजही या छटा सहज आढळून येतात. कारण भारतात केवळ सपिंड वधुवरामध्येच लग्न होऊ शकत नाही असे नाही तर सगोत्र ( हा एक गटबाह्य विवाहाचाच प्रकार आहे ) वधुवरांचे लग्नसुद्धा एक फार मोठा धर्मभ्रष्टाचार मानण्यात येतो.
*Exogamy