कोंडीबाबा लहानपणी कधीकधी ब्राह्मणांच्या घरी जेवायला जात, म्हणजे त्यांना जेवायला बोलावले जाई. जाताना लहान कोंडिबा गाईचं शेण घेऊन जाई. जेवण झाल्यावर ती जागा सारवून येई. आपण बसलेली जागा सारवायची याची बोचणी, अपमान त्यांना कधीच वाटला नव्हता. उलट गावात इतर कोणालाही जेवायला बोलवत नव्हतं. ब्राह्मणांच्या घरी माझाच नंबर लागायचा ह्याचा उल्लेख ते अभिमानानं करीत.
थंडी असो, पाऊस असो-कोंडीबाबा उघड्या अंगानं काम करीत असायचे. 'आपण पांचाळ सुतार म्हंजे ब्राह्मनाच्या तोडीचे.' असा उल्लेख ते मधूनमधून करत. ब्राह्मणांच्या घरी पाळलं जात नसेल इतकं सोवळं-ओवळं ते पाळत. सकाळी अंघोळ, पूजा झाल्याशिवाय पाणीही पीत नसत. त्या घरात बबनच्या कर्तबगारीपर्यंत अंडंही उकडलं गेलेलं नव्हतं.
कायम चमनगोटा, कपाळावर ठसठशीत गंध, जानवं, जुनंच पण धुतलेलं धोतर अशी काळीसावळी कोंडीबाबाची मूर्ती डोळ्यांसमोरून हालत नाही. त्यांची परिस्थिती तशी हालाखीचीच होती. काही शेतकऱ्यांकडून बलुत्याच्या पेंढ्या, भाजीपाला आणून त्यावर घर चाले. मला आठवतं. आंब्याच्या दिवसात कोंडीबाबा सहा-सात आंबे आणायचे; त्याच्या रसात पाणी आणि गूळ घालून त्यात साऱ्या घराचं भागवलं जाई. घर तसं मोठं होतं. कोंडीबाबा, त्यांचा मुलगा बबन, बबनची आई, आणखी एक सावत्र आई, बबनच्या दोन बहिणी. असं मोठं खटलं होतं. गणपती बसवण्याच्या दिवशी दुपारी एक-दोन नंतर बबन कोंडीबाबाबरोबर गणपती विकत आणायला जाई. तोपर्यंत गणपतीच्या मूर्तीची किंमत बरीच कमी झालेली असायची. कमी किमतीतली मूर्ती घेऊन ते घरी येत.
बाबा कधीतरी आम्हाला त्यांच्याकडची जुनी चांदीची नाणी दाखवत. पूर्वी ती नाणीही कशी दुर्मिळ होती इथपासून, ब्रिटिशांच्या काळच्या काही खुमासदार कथा, प्रसंग ते रंगवून सांगत. आम्ही आश्चर्यचकित झालो की, त्यांना भलताच आनंद होई. नाणी कापडाच्या पिशवीत ठेवून ती पिशवी घरात कुठंतरी जपून ते ठेवत आणि येऊन कामाला लागत. त्यांच्या घराची पडझड झाली हे पावसाळ्यात जास्त जाणवे. छपरातून सगळीकडे घर गळायला लागल की, बबनच्या दोन्ही आया मिळेल ती भांडी, पराती, बुटकुली, तांब्या, पितळ्या गळणाऱ्या जागेखाली ठेवत.
दिवसामागून दिवस, वर्षे उलटत होती. बबनच्या बाबाचा हात मंदावत होता. पण टकळी चालूच होती. भर पावसाळ्यात एका सकाळी आम्ही शाळेत जायला निघालो तेव्हा कुणीतरी सांगत आलं, “कोंडिबा मिस्त्री गेला बरं का." बरेच दिवस ते आजारीच होते. आम्ही पोरं वरच्या आळीला गेलो, घरचे लोकही गेले होते. आम्ही कुणाच्यातरी घराच्या ओट्यावर लवेच्या आडोशाला उभे होतो. पावसाची पिरपिर थांबली तशी लोकांनी घाई केली-प्रेत बाहेर आणले. लोक तयारी करत होते. बबन जवळच बसला होता. त्याला काहीच समजत नव्हते आणि त्याला कुणी काही विचारीतही नव्हते. त्याच्या दोन्ही आया ओसरीवरून बघत होत्या... त्यांच्या मुली त्यांना बिलगून उभ्या होत्या. भाऊबंदांनीच सारं केलं. सगळं यांत्रिकपणे होत होतं. कुणी फारसे रडत नव्हते. कोंडीबाबाचा दशक्रियाविधीही भाऊबंदांनीच वर्गणी काढून केला असं म्हणतात.
बबनचे बाबा गेल्यावर त्याच्या दोन्ही आया मोलाने लोकाच्या शेतावर काम करू लागल्या. बबनच्या बहिणींची लग्नेही झाली. लग्नानंतर त्या पुन्हा माहेरी कधी आल्याचे आठवत नाही.
बबन मोठा होत होता. आमच्याबरोबर तो तिसरी-चौथीपर्यंतच शाळेत होता. त्यानंतर त्याची शाळा सुटली. त्याला शाळेत इंटरेस्टही नव्हता आणि त्याच्यामागे कुणी शिकायचा लकडाही लावणारे नव्हते. तो सरपण विकू लागला. लहानमोठी सुतारकामे करू लागला. हळूहळू घराची कामेही घेऊ लागला. त्याच्या हाताला बरकत येऊ लागली. घरची स्थिती सुधारू लागली. दोन वेळचं अन्न घरात सहजसहज मिळू लागलं. बबननं घर दुरुस्त करून घेतले. लाईट घेतली. संध्याकाळी माडीवर ट्रॅझिस्टर घेऊन तो गाणी ऐकत बसे. मोठा आवाज रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेई.
गावातून जाताना-येताना त्याच्या चालण्या-बोलण्यात ऐट आली. चालता चालता अनेकदा हातातल्या घड्याळात किती वाजले हे तो पाही. कुठेतरी मधूनच घड्याळ काढून चावी देत थांबू लागला. पुढे त्याने एक सायकल घेतली. त्याचा भलताच शो केला. सकाळ-संध्याकाळ सायकलची बेल वाजवत बबन गावातन इकडेतिकडे फिरे. अंगात पायजमा आणि शर्टच. पण तो टेरीकॉट नायलॉनचा आला. बबनचा बबनमिस्त्री किंवा बबनशेठ झाला.
कधी कधी बबन आमच्यासारख्या समवयस्क मुलांना हॉटेलात नेऊन भेळ खायला घाली. आम्ही शिकत होतो; त्यामुळे आमच्याकडे पैसे असणे दुर्मिळ. बबनला तसा प्रश्न नव्हता. हॉटेलच्या बाकड्यावरून तो झोकात ऑडर देई, “अरे, पाच-सहा भेळ द्या चांगला कांदा घालून. आनी मग च्या पन द्या.” मला चांगलं आठवतं. आम्ही काही मुलं एका शेतात वार्षिक परीक्षेचा अभ्यास करत बसलो होतो. बबन तिथं आला. त्याच्याकडे ट्रॅझिस्टर होता. कुणीतरी ओरडलं “अरे, स्कोर काय झाला रे क्रिकेटचा? रेडौ लाव ना." बबननं भराभर स्टेशनं फिरवली. कॉमेंट्री चालू झाली. इंग्रजीतलं काही कळत नव्हतं. पण कुणीतरी म्हणालं, “गावस्कर सेंचुरीच्याजवळ आहे."
बबन म्हणाला, “आपण क्रिकेट खेळायचं का ?"
"त्याला बॅटबॉल लागती."
"विकत मिळत आसंल ना?" बबन.
“मिळंल बाजाराच्या गावी. पन त्याला पैसे लागतील.'
“हात्तीच्यायला, आपन आनूना..." असं म्हणत बबन उठला. त्याने तडक एस्. टी. स्टँड गाठला. तालुक्याला जाऊन बॅट-बॉल आणले. संध्याकाळी आम्हा सगळ्यांना ते दाखवताच आम्हाला किती आनंद झाला ! दुसऱ्या दिवसापासून मराठी शाळेच्या ग्राऊंडवर आम्ही क्रिकेट खेळू लागलो. आमच्या गावच्या क्रिकेटचा जनक बबनच ठरला.
पुढे क्रिकेटचं वेड सगळीकडे लागलं. मला आठवत बबननं एक क्रिकेटची टुर्नामेंट स्पॉन्सर केली होती. मराठी शाळेच्या ग्राऊंडवर ती स्पर्धा झाली. शाळेच्या पडवीतून माईकवर कॉमेंट्री चालू होती. माईकजवळ बबनशेठ पायावर पाय टाकून बसले होते. कुणी विकेट घेतली. सिक्सर मारला की, माईकवरून त्याला शाबासकी देत दोन-तीन रुपायचं बक्षीस जाहीर होत
होतं.