प्रा. डॉ. अजिज नदाफ
“इस्लामने भारतीय संस्कृती, वर्ण, विश्वास, धर्म, भाषा, साहित्य, विज्ञान, कल्म इत्यादींवर असाधारण, व्यापक आणि सखोल प्रभाव पाडला आहे. अरबस्थानचा भारताशी संपर्क फार पुरातन काळापासूनचा आहे. तेव्हा इस्लामचा उदयसुद्धा झालेला नव्हता.” ('भारतीय कला और संस्कृती की भूमिका', भगवतीशरण उपाध्य, पृ.२३५.)
"सूफी संतांनी भारतात येताच येथील संगीताचा अंगीकार केला. त्यांच्या स्वतःचे धार्मिक गायनही अत्यंत लोकप्रिय झाले. हिन्दू आणि मुसलमान दोघांनीही त्याचा स्वीकार केला.” (तत्रैव, पृ. २४१.)
'गझल, लावणी, ठुमरी, कव्वाली, धुन, चतरंग इत्यादी त्या हिंदूमुस्लीम घनिष्ठतेचा परिणाम आहे, देणगी आहे.' (तत्रैव पृ. २४५)
"ज्ञानेश्वर (१२७५-१२९६) आणि नामदेव (१२७० -१३५०) यांच्यानंतर मराठी कवितेवर दोनशे वर्षांचा गहन अंध:कार परसलेला आहे.' ('मराठी कविता', संपादक-ढवळे-कुलकर्णी, पृ.८.)
अशा स्थितीत मराठी गझलेचा इतिहास कसा उपलब्ध असणार? परंतु थोडे सूक्ष्म निरीक्षण केल्यास असे आढळून येईल की, हिंदी, उर्दूचे पहिले गझलकार अमीर खुसरो (१२५३-१३२५ इ.स.) यांच्या काळापासूनच मराठीत गझलेचे बी पेरले गेले आहे. परंतु मराठी साहित्येतिहासकारांनी अमृतराय व मोरोपंतांची मराठीचे पहिले गझलकार म्हणून इतिहासात नोंद केली आहे.
अमृतराय (१६९८-१७५३ इ.स) हे औरंगाबादचे रहिवासी होते. वली दकनी ऊर्फ वली औरंगाबादीही त्याच काळात औरंगाबादला होते. वली दकनी हे उर्दू गझलचे आद्य प्रणेते होते. गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि विजापूरची आदिलशाही औरंगजेबाने नष्ट केल्यामुळे गोवळकोंडा व विजापूरचे सांस्कृतिक केंद्र औरंगाबादला निर्माण झाले होते. दकनीचे अनेक कवी राजाश्रय शोधत औरंगाबादला जमा झाले होते, अशा काळात अमृतरायवर त्यांचा प्रभाव पडणे साहजिकच होते.
“अमृतराय औरंगाबादच्या निझामचे एक अधिकारी होते. विसा मोरोकडे दप्तदार होते. तेथे त्यांचे जीवन ऐश्वर्यपूर्ण होते. गझल हा फारसी काव्यप्रकार मराठीमध्ये त्यांनीच सर्वप्रथम प्रचलित केला.” ('मराठी वाङ्मय कोश', खंड-१,पृ.१२)
याचप्रमाणे पंडित कवी मोरोपंत (१७२९-१७९४ इ.स) यांनाही मराठी गझलेचे प्रणेते मानण्यात येते. ते कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडचे निवासी होते. ते वयाच्या चोविसाव्या वर्षांपर्यंत तेथे होते. त्या काळात पन्हाळगड हे आदिलशाहीत होते. त्यानंतर ते पुणे जिल्ह्यातील बारामती येथे अखरेपर्यंत राहिले. त्यांच्यावरही दकनी गझलेचा प्रभाव पडणे शक्य आहे. अमृतराय आणि मोरोपंतांची गझल खाली दिली आहे -
(१) 'जग व्यापका हरीला नाही कसे म्हणावे ।।धृ।।
तंतूपटी मिळाले, भूमी नभापरी हो ।
घटमृत्तिका निराळी, ऐसे कसे म्हणावे ।।
(२) रसने न राघवाच्या थोडी यशात गोडी ।।धृ।।
निंदास्तुती जनांच्या, वार्ता वधुजनांच्या
खोट्या व्यथा मनाच्या, काही न यात गोडी ।।
विनयी 'मयुर' भावे, सखी हेचि नित्य गावे ।
मजला द्रवोनी पावे, दुसरे न बंध तोडी ।'
दोन्ही गझला अनुक्रमे 'अमृतराय काव्यपद संग्रह' पृ. ७ आणि ‘मोरोपंत स्फुटकाव्य' १/३६८ मधून उद्धृत केल्या आहेत. गझल रचना तंत्राच्या दृष्टीने ह्या गझला सदोष आहेत. गझलचा पहिला शेर ज्याला ‘मतला' असे म्हणतात, त्या दोन ओळी (मिसरे) असतात, परंतु उपरोक्त दोन्ही गझलांमध्ये एकच ओळी 'धृपद' म्हणून आली आहे. गझलमध्ये ‘यमक' (काफिया) आणि अंत्ययमक (रदीफ) असतात, परंतु अमृतरायच्या गझलेत यांचा अभाव आहे. तर मोरोपंतांच्या गझलेत ‘गोडी व तोडी' अशी दोनच यमके आली आहेत. विषयाच्या दृष्टीनेही त्यातील प्रत्येक शेर वेगळ्या विषयाचा असावा लागतो, तेही यात नाही. गझलेत कमीत-कमी पाच शेर (द्विपदी म्हणजे १० ओळी असाव्या लागतात.) यात फक्त दोनच शेर आले आहेत. छंदाच्या दृष्टीने दोन्ही गझलांत “बहरे रजज - महजूफ'चा (आनंदकंद) प्रयोग झाला आहे, जसे
“जग व्यापका = मुस्तफ्अलुम (गागालगा)"
हरीला - फलुन् (लगागा)
नाही कसे = मुस्तफअलुन (गागालगा)
म्हणावे = फलुन् (लगागा)
('ल' म्हणजे लघु व 'गा' म्हणजे गुरु)
रसने न रा = मुस्तफ्अलुन् (गागालगा)
घवाच्या = फअलुन् (लगागा)
थोडी यशा = मुस्तफ्अलुन् (गागालगा)
त गोडी = फलुन् (लगागा)
दोन्ही गझलांमध्ये 'तखल्लुस' (टोपणनाव) आले आहे. 'अमृतेश्वर' आणि 'मयूर' हा प्रारंभीचा काळ असल्याने काही तांत्रिक दृष्ट्या गफलती मान्य करता येतील.