जातिव्यवस्था आणि व्यवसाय अशी एक सांगड घालण्यात आली होती. जातिव्यवस्था आणि अर्थव्यवस्था अशीच ती सांगड होती.
भारत हा खेड्यापाड्यांचा देश आहे. म्हणजे तो कृषिप्रधान है। आहे. मुख्य व्यवसाय हा शेती आणि त्याला पूरक असणारे इतर व्यवसा त्या भोवतीने, अशी स्थल मानाने भारतीय समाजाची रचना होती. त्यात अलुतेदार, बलुतेदार, फिरस्ते इ. निर्माण झाले. अलुतेदार, बलुतेदार यांच्यातही पुष्कळ जाती आणि व्यवसाय होते. उदा. विणकर, रगारी, तेली, शिकलगार शिंपी इ. व्यवसाय हे ग्रामीण भागातील परंपरेने चालत आलेले व्यवसाय होते. अशा असंख्य धंद्यांची आणि व्यवसायांची मोठी यादीच काढता येईल शिवाय लोहार, सुतार, रामोशी इ. अलुते-बलुतेदार होतेच. म्हणजे त्या शेतीला पूरक असणारे असंख्य व्यवसाय खेड्यापाड्यात चालत असत: परंतु आज काय परिस्थिती आहे? साधारणतः १९ व्या शतकाच्या मध्यापासून समाजजीवनात प्रचंड बदल सुरू झाले. इंग्रजांच्या आगमनानंतर सामाजिक व शैक्षणिक चळवळी तर सुरू झाल्या. पण औद्यागिकीकरणालाही प्रारंभ झाला. साधारणतः १८७० च्या आसपास मुंबई आणि सुरत येथे कापडाचे कारखाने सुरू झाले आणि औद्यागिकीकरणाला वेग येऊ लागला. १८५७ मध्ये भारतामध्ये रेल्वे सुरू झाली. हा औद्योगिकीकरणाचा प्रारंभ गृहीत धरला, तरी आज भारतातील औद्योगिकीकरणास दीडशेच्यावर वर्षे झाली आहेत असे म्हणावे लागते. या औद्योगिकीकरणाचा सर्वाधिक परिणाम जर कोणावर झाला असेल तर तो प्रामुख्याने अलुतेदार-बलुतेदार आणि इतर छोटे-मोठे व्यावसायिक यांच्यावर झाला. यात प्रामुख्याने इतर मागासवर्गातील म्हणजे ओबीसींमधील विविध समाज उद्ध्वस्त होऊन गेले. (आता तर शेती करणारा समाजही उद्ध्वस्त होतो आहे.)
इतर मागास वर्ग, तसेच इतर व्यावसायिक कसे उद्ध्वस्त झाले? त्यामुळे त्यांची स्थिती कशी झाली यावर सूक्ष्म संशोधने होण्याची गरज आहे. स्थूलमानाने असे सांगता येईल की, जसे जसे छोटे छोटे व्यवसाय यंत्राच्या स्वाधीन होत गेले, तसतसे हे व्यावसायिक खरे म्हणजे हे सगळ कारागीरच होते; उद्ध्वस्त झाले. यंत्राच्या साह्याने नांगराचा फाळ आणि इतर अवजारे तयार होऊ लागली, तसतसे आमचे लोहार आणि शिकलगार उपाशी पोटी मरू लागले. ताराशंकर बंडोपाध्याय यांच्या सुप्रसिद्ध 'गणदेवता' कादंबरीचा प्रारंभच गावकरी आणि लोहार समाज यांच्यातील तणावांपासून होतो. यंत्रातून कपडा तयार होऊ लागल्याबरोबर आमचे विणकर आणि रंगारी भुकेकंगाल झाले. यंत्रातून तेल निर्मिती होऊ लागल्याबरोबर पारंपरिक तेल्यांपुढे जगण्याचे प्रश्न निर्माण झाले. या पद्धतीने साळी, कोळी, भोई, चांभार, ढोर, न्हावी, पूर्वाश्रमीचे महार, मांग अशा शेकडो जाती जगायचे कसे अशा प्रश्नाने ग्रासल्या गेल्या. या सगळ्यांचे व्यवसाय यंत्राने हिरावून घेतले, परंतु या यंत्रांची माहिती मात्र त्यांच्याकडे नव्हती आणि नाही. ही मालकी जो कोणी त्यात भांडवल गुंतवेल त्याची होती. म्हणून पारंपरिक ब्राह्मण चपलांचा कारखाना काढतो हे नवे चित्र दिसू लागले.
याचा अर्थ असा की, एक नवी समाजव्यवस्था अस्तित्वात येऊ लागली. किंबहुना ती आलेली आहे. परिणाम जातिसंस्थेच्या आधाराने जगणारी असंख्य व्यावसायिक मंडळी देशोधडीला लागली. याचा पहिला उल्लेख म. फुले यांच्या चळवळीतील सुप्रसिद्ध लेखिका ताराबाई शिंदे यांच्या 'स्त्री-पुरुष तुलना' या पुस्तकात येतो. त्यांनी कारागिरी तर साफच बुडाली' असे म्हटले होते. याचा अर्थ असा की सगळ्या व्यावसायिकांची, व्यवसायाकडून देशोधडीला लागण्याची परंपरा दीडशे वर्षे इतकी जुनी आहे असे दिसते. याचे मुख्यतः दोन अर्थ आहेत.
१) जातिव्यवस्था आता संपूर्णत: निरुपयोगी झालेली आहे. म्हणून तिचा गडही खिळखिळा झालेला आहे.
२) भांडवलदारी औद्योगिक युग अवतरले आहे.
प्रथमतः आपण पहिल्या मुद्द्याचा विचार करू. आज आपण सारेच जातीच्या खुंटाभोवती फिरत असलो तरी तिची उपयुक्तता संपलेली आहे. कारण आज जात आणि व्यवसाय यांचे कुठलेच नाते नाही. आज अत्यंत मागासलेल्या समाजातील कुठल्याही बुद्धिमान माणसास जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात स्वतःचे कर्तृत्व स्वीकारता येते. त्याला परंपरेने, जातीने दिलेले काम केलेच पाहिजे असे बंधन आज कोणीही घालू शकत नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांचे पारंपरिक व्यवसाय हिरावूनच घेतले आहेत. असे अवस्थेत म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संदेशाप्रमा जातिव्यवस्था उध्वस्त करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. छोट्या छोट्या समूहांमध्ये हा देश विभागला गेल्यामुळेच कित्येक वर्ष त्यास पराभवाच्या छायेत राहावे लागते. आजही जर आपण वेगवेगळ्या जातीच्या छावणीत राहिलो, तर या देशांमध्ये एकात्मता अशी निर्माण होणारच नाही. ही आवश्यकता ओबीसीमधील विविध जाती समूहांसाठी फारच आवश्यक आहे. कारण ओ.बी.सी.मधील छोट्या छोट्या जाती विभागलेल्या राहिल्यामुळे एकूण समाजावर कुठलाही प्रभाव टाकू शकत नाहीत. उदा. म्हणून एखाते गाव आपण घेतले तर तेथे तेल्याचे एखादे घर असते, सुतार, लोहार, शिंपी, न्हावी, सोनार, भोई, विणकर, रंगारी, कासार, परीट, हटकर अशा जातींचे एखादे-दुसरे घर असते. काही गावांमध्ये माळी समाजाची थोडी अधिक संख्या असते. म्हणजे हे एखाद-दुसरे घर त्या त्या गावामध्ये अतिशय नगण्य म्हणूनच गणले जाते.
गावपातळीवर जशी ही अवस्था आहे, तशीच ती मोठ्या आणि शहरी पातळीवरसुद्धा असू शकते. अशा अवस्थेत समाजामध्ये ते आपल्या भल्यासाठी एक प्रभाव गट म्हणून कार्य करू शकत नाहीत. याचा अर्थ असा की, जातिसंस्थेचा आता उपयोग सपलेला आहे, ओ.बी.सी.मधील जातींना व्यवसाय गेल्यामुळे तर जातींना चिटकून परवडणारेच नाही. म्हणून काळाची पावले ओळखून साऱ्यांनी एकच प्रयत्न केला पाहिजे. आणि तो म्हणजे खिळखिळी झालेली जातिव्यवस्था उद्ध्वस्त करून टाकणे. यासाठी ओ.बी.सी. संघर्ष समितीने पुढाकार घेतला पाहिजे. दुःखमुक्तीसाठी एक मोठी संघशक्ती उभी करावयाची असेल, तर सगळ्याच जातींनी, जाती संघटनांनी या कालबाह्य झालेल्या व्यवस्थेवर हल्लाबोल केला पाहिजे. याचा गरज कणाला असो की, नसो परंतु ओबीसीमधील सगळ्या छोट्याछोट्या समाजांसाठी तर आवश्यकच आहे. ओबीसीमधील जाती वेगवेगळ्या न राहता त्या एकच ‘ओबीसी' या जातीत विलीन झाल्या पाहिजेत. आज रोटीबंदीचा व्यवहार कोणी फारसा पाळत नाही. बेटीव्यवहारही परस्परांमध्ये सुरू झाला पाहिजे. या देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी आंतरजातीय विवाह हा एकमेव उपाय आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते. आयुष्याच्या उत्तरार्धात म. गांधी यांनी तर प्रतिज्ञाच केली होती की, 'सजातीय विवाहास उपस्थित राहणारच नाही, जेथे आंतरजातीय विवाह असेल तेथेच मी उपस्थित राहीन.' आणि त्याचप्रमाणे ते शेवटपर्यंत वागले. याचा अर्थ असा की, समाजाच्या एकात्मतेसाठी आंतरजातीय विवाह आवश्यक आहेत. बाराव्या शतकात म. बसवेश्वरांनी याच हेतूने अशा विवाहांचा पुरस्कार केला होता; नव्हे अशी लग्ने त्यांनी लावून दिली होती.
निदान ओबीसीमधील छोट्या छोट्या जाती समूहांनी या बाबतीत पुढाकार घ्यावा आणि जातिव्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने पाऊल उचलावे, तरच या चळवळीला आपल्या दुःख मुक्तीच्या दिशा दिसायला लागतील !