प्रा. प्रदीप फलटणे
गर्दीने मैदान खचाखच भरले होते. लोकांचा उत्साह ओसंडून वहात . होता. जिनेशला हार, गुच्छ देणाऱ्या प्रियजनांची रांग लागली होती. आणि पहाता पहाता हार-गुच्छांचा प्रचंड ढीग तयार झाला.
त्याचे कारणही तसेच होते. जिनेशने जैन समाजातील शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या ओबीसी वर्गासाठी केलेल्या कार्याची दखल समाजाने आणि शासनाने घेतली होती. राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे काही सहकारी, जैन धर्मगुरू, नेते, अन्य प्रतिष्ठित लोक यांच्या उपस्थितीत जिनेशच्या सत्काराचा कार्यक्रम सुरू होता. जिनेशने केलेल्या कार्याची पावती सत्काररूपाने दिली जात होती... सत्काराची भाषणे सुरू होती.
... अन् पहाता जिनेशचे मन भूतकाळात रमून गेले.
आज गर्दी होती, प्रचंड गर्दी. अन् तेव्हा... एकट्याचाच प्रवास... एकटाच... एका ध्येयाने, एका वेडाने जिनेशची वाटचाल चालायची. जैन समाज आणि त्यात मागासवर्ग? अनेकांना, अनेक जैन माणसांनाही हे पटायचे नाही. प्रत्यक्षात दिसायचे जैनांचे प्रचंड कार्यक्रम, पूजा आणि डामडौल. एकीकडे प्रचंड धनसंन्न वर्ग... दुसरीकडे दिसायचा जैन म्हणवणाराच, शेतात काम करणारा, शेतमजूर, कष्टकरी, कुणबी जैन, शेतकरी, गावोगाव डोक्यावर बांगड्यांचा भारा घेऊन फेरी करून विक्री करणारा जैन कासार, स्वतःला रफू स्पेशालिस्ट - आल्टर स्पेशालिस्ट म्हणवणारा, शिंपीकाम करणारा, जैन . शेतवाल शिंपी, विणकाम करून कापड बनविणारा जैन कोष्टी, कधी काळी दारू गाळण्याचे काम करणारा परंतु महावीरांवर श्रद्धा ठेवून स्वतःला जैन म्हणवणारा जैन कलार, जैन मंदिरांची पूजा करणारा जैन-गुरव, काचेचा रस तयार करून त्याच्या बांगड्या बनवणारा जैन काचारी, कपडे रंगविणारे जैन रंगारी, जैन भावसार... अशा अनेक सामान्य माणसांचे अस्तित्व जिनेशला मोठ्यामोठ्या धार्मिक समारंभात क्वचितच जाणवत असे... ही मंडळी यायची. दर्शन घ्यायची. निघून जायची. समारंभात त्यांचा थोडासाच सहभाग असायचा.
यात पूजा करणारे कोण? जो जादा रकमेचा चढाव घेणार, तो पूजा करणार... आणि मग एखादा व्यापारी यायचा, चढाव स्वीकारायचा, पूजा करायचा, गर्दीसाठी बहुजन जनसामान्य माणूस. पण पुजेला? ज्या महावीरांचा धर्म जनसामान्य बहुजनांसाठी होता, तो आज पैसेवाल्यांच्या ताब्यात गेला. पूजा अभिषेक म्हणजेच धर्म का ?
आणि मग जिनेशला वाटायचं की, महावीरांचे अनुयायी जैन विचार विसरले आहेत. बहुजन समाज, त्यांच्या वेदना, त्यांचं दारिद्र, त्यांच्या समस्या, त्यांचं अडाणीपण यांबद्दल कोणालाही काहीही वाटत नव्हतं.
आणि या उद्वेगातून आणि सामाजिक जाणिवेतून तो दलित चळवळीत काम करू लागला. सरळ स्वभावाची प्रामाणिक माणसं त्याला तिथं भेटली. महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छ. शाहू महाराज यांची चरित्रे, विचारग्रंथ त्याने झपाट्याने वाचून काढले. त्याने जिनेशची सारी वैचारिक दृष्टीच बदलून गेली. बहुजन समाज हा त्याच्या विचारांचा केंद्रबिंदू झाला.
विविध दलित कार्यकर्त्यांशी आणि नेत्यांशी त्याचा परिचय झाला. तो मुव्हमेंटचा कार्यकर्ता बनला. नामांतराच्या लढ्यात सहभागी झाला. विविध आंदोलनात सहभागी झाला. मोर्चांमध्ये आणि अनेक चळवळींमध्ये भाग घेऊ लागला. व्यवसायाने प्राध्यापक असूनही वेळ काढून मोठ्या जिद्दीने दलित मुव्हमेंटमध्ये काम करू लागला.
अन् सर्व सामाजिक चळवळींना दिशा देणारी घटना घडली. मंडल कमिशन अहवाल प्रसिद्ध झाला. त्याविरोधी उठलेली आंदोलने त्याने पाहिली. मंडल कमिशन अहवालाचा अभ्यास त्याने सुरू केला... मंडल समर्थक आंदोलनांत त्याने सक्रिय भाग घेतला. भाषणे दिली... हळूहळू बहुजन समाज, सामाजिक न्याय, आरक्षण यांवर त्याचे चिंतन वाढत गेले.
आणि मग सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांशी-ज्येष्ठ नेत्यांशी बोलताना, मंडल कमिशनचा अहवाल अभ्यासताना त्याला जाणवले की, मंडल कमिशनच्या सोयी-सवलतींसाठी धार्मिक बंधन नाही. जिनेश विचार करू लागला... दलितांचं, अस्पृश्यतेचं दुःख त्याने पाहिले होते. आदिवासींचे समाजापासूनचे दूर, दऱ्याखोऱ्यांत राहिल्यामुळे या समाजापासूनचे तुटल्याचे दुःख त्याने पाहिले होते... आणि परंपरागत व्यवसायाच्या बंधनात आणि जातीमध्ये अडकल्याने मागास राहिलेल्या जैन ओबीसींचे दुःख तो अनुभवत होता. तो पाहत होता की, जैनांमध्ये अनेकजणांना व्यवसायदर्शक जातीचं नाव लावणं हे अनेकदा कमीपणा दाखणारं वाटायचं आणि मग ते फक्त धर्माचे नाव सांगायचे - जैन ! अशा अनेक परंपरागत व्यावसायिक जाती जिनेश आपल्या अवतीभोवती पहात होता. त्यांच्या परंपरागत व्यवसायाने त्यांना मागासलेपण आले होते. शिक्षण फारसे नसायचे. उलट पोरगं शिकायला पाठवले की, काम करणारं माणूस कमी व्हायचं आणि त्यावाचून कुणाचं फारसं अडतही नसायचं... खेड्यापाड्यांतून पसरलेला हा बहुजन जैन समाज जिनेश पहात होता.