१) शक्य तितक्या लवकर समाजाकरिता एक जागा घ्यावी व तेथे नियमितपणे आठवड्यांतून निदान पंधरवड्यांतून एकवेळ सभा भरवावी.
२) समाजामार्फत एक वाचनालय काढावें. ते समाजाच्या जागेत किंवा दुसऱ्या सोयीच्या जागी ठेवाव. त्यात कमीत कमी ३ तरी वर्तमानपत्रे घ्यावी.
३) वाचनालयाचे सेकेटरी हे निराळे नेमावेत.
४) सत्यशोधक समाजाचे मेंबर वाढविण्याचे काम झपाट्याने सुरू करावे. मेंबर होऊ इच्छिणाराने कार्यकारी मंडळाच्या सभेपुढे हजर होऊन प्रतिज्ञा म्हणून किंवा वाचून दाखवावी. मग त्याचे नांव मेंबरांचे रजिष्टरात नोंदावें. या रजिष्टरात नवीन मेंबराने सही करावी. लिहिता येत नसल्यास त्याचा आंगठा उठवून घ्यावा.
५) मेंबर होतेवेळी सालास शक्तीप्रमाणें चार आणे पासून १ रूपया पर्यंत वर्गणी देण्याचे प्रत्येक मेबराने कबूल करावे व पहिले सालची वर्गणी द्यावी.
६) समाजमार्फत गावी किंवा परगावी जे विधि चालविले जातील त्याची नोंद करण्यात यावी व कार्यास खर्च आला असेल त्या मानाने उभयपक्षाकडून दरशेकडा १ रूपया पर्यंत खंडणी घेऊन समाज फंडातजमा करावी. लग्नाची नोंद एका स्वतंत्र रजिष्टरात करणे सोयीचे आहे.
७) खंडणी, देणगी, वर्गणी वैगरे रूपानी लहान मोठी रकम समाजफंडात जमा होईल तिजबद्दल लेखी पावती देऊन रक्कम हिशेबाचे वहीस जमा करावी.
8) विधी कसे करावे हे शिकविण्याचा वर्ग गावी काही दिवस चालविणे फायद्याचे आहे.
९) वार्षिक वर्गणी, देणग्या, विधीवरील खंडणी वगैरे रूपाने जमा झालेल्या समाजफंडाचा उपयोग (अ) गावचे वाचनालय चालविणे, (अ) पुस्तकसंग्रहालय चालविणे, (इ) समाजाची इमारत बांधणे, (ई) गावचे व समाजाचे उपयोगाकरिता भांडी, बिछायतीचे अथवा मंडपाचे सामान, खुर्च्या, टेबले, बाके, वगैरे खरेदी करणे, (उ) समाजाचे वार्षिक किंवा नैमित्तिक उत्सव करणे, (ऊ) विद्यावृध्दीचे प्रयत्न करणे, (ए) उपाध्यायाचा वर्ग चालविणे (ऐ) समाजमताचा प्रसार करणे वगैरे कामाकडे करण्यात यावा.
१०) समाजाचा उत्सव दरसाल सोयीवार दिवशी करावा. त्यावेळी जवळच्या गावची मंडळी जमवावी व दूरवरचे २/३ चांगले वक्ते आणवून त्यांच्या व्याख्यानाचा लाभ सर्वांस मिळेल असे करावें. या रीतीनें खर्च फार न येतां जागृती चांगली होते.
११) जेथे समाज पूर्वीच स्थापन झाले असतील परंतु काम जोराने चालत नसेल तेथे कलम १ ते१० प्रमाणे जोराची चळवळ सुरू करणे हे पुढाऱ्यांचे कर्तव्य आहे.
मु. कोल्हापूर
ता. २१।३।१९२७
भास्करराव जाधव
सत्यशोधक समाज
कलाभवन प्रेस, कोल्हापूर
ना. भास्करराव विठोजी जाधव हे सत्यशोधक समाजाचे इ.स. १९२० ते १९३० पर्यंतच्या कालखंडात अध्यक्ष होते. ना. जाधववांनी १ लाख सभासद करण्याचे उद्दिष्ट ठरविले होते. त्यासाठी त्यांनी मराठी मुलखात भ्रमंती केली. या प्रकल्पासाठी मुद्दामहून प्रस्तूत परिपत्रक प्रसिध्द केले होते. सदरील परिपत्रक, जेष्ठ सत्यशोधक रा.ना. चव्हाण यांचे जेष्ठपुत्र रमेश चव्हाण, पुणे यांनी संकलित केले आहे. - संपादक
Satyashodhak, obc, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar, Bahujan