अनिल भुसारी
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालेत. त्या निमित्ताने भारत सरकार अमृत काळ साजरा करत आहे. अमृत काळ साजरा करताना असं वातावरण तयार करण्यात आले आहे की, जणू संपूर्ण भारतीयांच्या तोंडामध्ये दररोज अमृताचे थेंबच पडत आहेत. परंतु वास्तव या उलट आहे. काही मूठभर लोकांच्या तोंडामध्ये अमृताचे थेंब पळावेत आणि हातभर (बहुजन) लोकांच्या तोंडामध्ये मात्र विषाचे थेंब कसे पडतील याचा व्यवस्था केल्या जात आहे. स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांना आणि भारतीय संविधान निर्मात्यांना अशी अपेक्षा होती की, भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे भारतातील सर्व वर्गाच्या लोकांना सारख्या प्रकारे अनुभवता येईल. परंतु अमृत काळामध्ये सुद्धा जातीय आणि धार्मिक वर्गवारी भारतीयांमध्ये केल्या जात आहे. ही एक शोकांतिका आहे. बाबासाहेबांनी जो धोका स्वातंत्र्या नंतरच्या संदर्भाने व्यक्त केला होता. तो आजही खरा ठरत आहे. पहिल्या गोलमेज परिषदेला जाण्या आधी मुंबईतील दामोदर हॉल येथील सत्कार समारोहाला उत्तर देताना बाबासाहेब म्हणाले होते, "सध्या हिंदू - मुसलमान, अस्पृश्य या सर्वांना स्वराज्य मिळत असल्यास पाहिजे आहे. नुकत्याच नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय दलित काँग्रेसने तसा ठरावही पास केला आहे. याबद्दल सर्वांची एकवाक्यता आहे. परंतु वाद आहे तो स्वराज्याने मिळणारी सत्ता सर्व समाजामध्ये योग्य रीतीने विभागले जावी की एखाद्या विशिष्ट वर्गाच्या हातीच ती राहावी यासंबंधी आहे." म्हणजे बाबासाहेबांचे स्वातंत्र्य विषयीचे विचार अधिक सखोल आणि सर्वसमावेशक होते. राजकीय स्वातंत्र्या बरोबरच इथल्या अल्पसंख्याकांना, अस्पृश्यांना, मागासवर्गीयांना सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य सुद्धा प्रस्थापितांच्या बरोबर समान प्रमाणात मिळाला पाहिजे असे त्यांचे मत होते. पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये यासंदर्भाने बाबासाहेब म्हणतात, "आम्हाला असे सरकार पाहिजे की, जे देशाचे खरे हित निष्ठापूर्वक साधेल. न्याय आणि निकडीचे असे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न कुणाच्याही रागलोभाची पर्वा न करता सोडवील." भारतात नव्हे तर इंग्रजांच्या देशांमध्ये जाऊन बाबासाहेबांनी त्यांना ठणकावून सांगितले होते. बाबासाहेबांना जे अपेक्षित स्वातंत्र्य होते ते मिळाले नाही. आणि त्यांना जो धोका वाटत होता की, स्वातंत्र्याच्या नंतर ज्या उच्चवर्णीय लोकांच्या हातामध्ये सत्ता जाईल ते लोक मूठभर लोकांच्या फायद्याचाच विचार करणार आणि बहुसंख्य असणाऱ्या लोकांना मात्र विकासापासून वंचित ठेवतील. हा जो त्यांना धोका वाटत होता तो आज 75 वर्षानंतर सुद्धा आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. देशामध्ये ज्या काही सरकारी संस्था, उद्योगधंदे, कारखाने स्थापन करण्यात आले होते. त्या संस्थांची दररोज एकेक करून अलीकडच्या काळामध्ये विक्री करून उद्योगपत्यांच्या घशात टाकून बहुजन समाजाचा प्रगतीचा मार्ग अडविल्या जात आहे. बहुजनांच्या हातातील सरकारी नोकऱ्या - रोजगार हिसकावल्या जात आहे.
अलीकडच्या काळामध्ये सरकारच्या ध्येय - धोरणावर टीका केली किंवा सत्ताधाऱ्यांच्या चुका दाखवल्या की, त्या चुका दाखवणाऱ्यांना आणि टीका करणाऱ्यांना देशद्रोही ठरवून सरळ पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. असा सल्ला देणारी वृत्ती म्हणजे फॅसिस्ट प्रवृत्ती आहे. वर्तमानात आपल्या देशापुढे विविध समस्या आहेत जसे रोजगाराची, महागाईची, उद्योगधंद्यांची. शैक्षणिक आणि आरोग्याचे प्रश्न तसेच महिलांचे, विद्यार्थ्यांचे असे वेगवेगळे प्रश्न असताना, हे सोडवण्या ऐवजी मात्र जात, प्रांत, धर्म, भाषा यात लोकांना गुरफटवून राष्ट्रवादाचा बाऊ केल्या जात आहे. अशा लोकांसंदर्भात बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, "काही लोक म्हणतात की आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि नंतर हिंदू किंवा मुसलमान आहोत. मला हे पसंत नाही. हे पुरेसे वाटत नाही. धर्म संस्कृती आणि भाषा यातून निर्माण होणाऱ्या कोणत्याही स्पर्धेमुळे आपली भारतीय म्हणून असलेली निष्ठा धोक्यात येता कामा नये. लोकांनी भारतीय आणि फक्त भारतीयच राहावे. त्याखेरीज अन्य काही असू नये." जे काही अंधअनुयायी आम्हीच कसे देशभक्त आहोत आणि आमच्या धर्माला, आमच्या भावनांना, आमच्या विचारांना विरोध करणारे किंवा आमच्या चुका दाखवणारे सर्व राष्ट्रद्रोही आहेत. असा प्रचार आणि प्रसार करणाऱ्यांनी एकदा बाबासाहेब आंबेडकर वाचून - समजून घ्यावा. बाबासाहेब आंबेडकर मी प्रथमत: ही भारतीय आणि अंतिमत:ही भारतीय असं का म्हणाले होते? हे त्यांच्या वरील वाक्यातून लक्षात येते. जेव्हा आपल्याला आपली स्वतःची ओळख जात, धर्म, प्रांत या पलीकडे जाऊन, माझी ओळख फक्त भारतीय आहे. असे वाटेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं असं म्हणता येईल.
अनिल भुसारी, तुमसर, जि.भंडारा 8999843978
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan