- जोगेंद्र सरदार
छत्रपती शाहू महाराजांना ज्या वेदोक्त प्रकरणावरून अपमानित करण्यात आले होते, तोच प्रकार छत्रपतींच्या घराण्यातील संयोगिताराजे भोसले यांच्या बाबतीत नाशिकच्या काळाराम मंदिरात घडला. महाराजांनी त्यानंतर चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जसे ठोकरीने उडवून लावले तसे धैर्य राणीसाहेबांना १०० वर्षांनंतरही दाखविता आले नाही. त्यांनी पूजाविधीप्रसंगी वेदोक्तमंत्रांऐवजी पुराणोक्त मंत्रांचे पठण केल्यावरून ब्राह्मण पुरोहितांचा निषेध केला. परंतु त्याबरोबरच ब्राम्हणी पुरोहितशाही नाकारण्याची तसेच वर्णव्यवस्थेची चौकट मोडून काढण्याची भूमिका त्यांनी घेतली असती तर ते एक क्रांतिकारी पाऊल ठरले असते.
१९०० मध्ये शाहू महाराजांना अशाप्रकारच्या अपमानाला सामोरे जावे लागले होते. कार्तिक एकादशीला महाराज सहपरिवार सूर्योदयापूर्वी पंचगंगेवर आंघोळीसाठी गेले असताना त्यांचा राजोपाध्ये उशिरा आला. त्यांनी त्याला प्रथम आंघोळ करण्यास सांगितले. त्यावेळी तो महाराजांना म्हणाला, मला थंडीमुळे पाणी गार लागते, शिवाय मला पूराणोक्त मंत्र म्हणावयाचे आहेत, त्यामुळे मला शूचिर्भूत होण्याचे कारण नाही. यावर महाराज संतापून त्याला म्हणाले, आम्ही स्नान करण्याच्या अगोदर तू स्नान करून तयार राहून आमच्या स्नानाच्या वेळी वेदोक्त मंत्र इतकी वर्ष म्हणत असे आणि आताच तुला हे काय वेड लागले ? यावर तो ब्राह्मण म्हणाला, महाराज, तुम्ही राजे असला तरी, शूद्र आहात व तुम्हाला वेदोक्त मंत्र ऐकण्याचा अधिकार नाही. तुम्ही फक्त पुराणोक्त ऐकावे व ते मी शूचिर्भूत न होता म्हणालो तरी त्याला शास्त्राची आडकाठी नाही. राजोपाध्येने केलेल्या या अपमानाने महाराज संतापाने लाल झाले. त्याला हाकलून लावले. त्याला पदावरूनही काढून टाकले आणि महाराजांनी हिंद धर्माचा त्याग करून आर्य धर्माचा स्वीकार केला. पुढे महात्मा जोतिराव फुले यांच्या सत्यशोधक धर्माचा स्वीकार केला आणि ही सत्यशोधकी चळवळ संपूर्ण ब्राम्हणेत्तरात त्यांनी पसरविली.
संयोगिताराजे या छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्यातील आहेत, त्यांनी त्याचप्रकारचा त्यांच्या विचारांचा वारसा चालवायला हवा. ब्राम्हणांनी महाराजांना शूद्र मानून त्यांच्यासाठी वेदोक्त मंत्रांचे पठण करण्याचे नाकारले. १०० वर्षांनंतर त्याच गोष्टीचा आग्रह धरून संयोगिताराजे यांना काय सिद्ध करायचे आहे. यातून ब्राम्हणांनी आम्ही चातुर्वर्ण्य व्यवस्थेत श्रेष्ठ आहोत आणि वर्णश्रेष्ठत्वानुसार वेद मंत्र ऐकण्याचा अधिकार संयोगिता राजे यांना यासाठी नाही की, त्यांच्या मते त्या शूद्र आहेत, हेच पुन्हा एकदा जाहीरपणे सांगितले. या पार्श्वभूमीवर बाबासाहेब म्हणतात, जोपर्यंत वर्णव्यवस्था कायम आहे, तोपर्यंत ब्राह्मणांचे श्रेष्ठपण कायम आहे. जपानमधील सामुराई वर्गांच्या लोकांनी राष्ट्रैक्य साधण्यासाठी आपले विशिष्ट सामाजिक हक्क सोडून दिले. समतेच्या पायावर राष्ट्राचा एकोपा करण्यासाठी जो स्वार्थत्याग त्यांनी केला, तितका स्वार्थत्याग करणे ब्राम्हणांच्या हातून होणार नाही. तशा प्रकारचे राष्ट्रप्रेम ब्राम्हणांमध्ये नाही. हिंदू धर्मातील जातीच्या उतरंडीत स्वतःला उच्चस्थानी मानणारे ब्राम्हण ज्यावेळी जिझिया कर देण्याची वेळ त्यांच्यावर येते त्यावेळी 'ते आम्ही हिंदू नाही, ब्राम्हण आहोत', अशी औरंगजेबाला स्वतःची ओळख करून देतात. तेच मठ मंदिरात हिंदूचे पूरोहित व पुजारी म्हणून हजारो वर्षांपासून एकाधिकारशाही गाजवित आहेत. खरे तर ब्राम्हणी धर्म हाच त्यांचा धर्म आहे. त्याचे मूळ वैदिक धर्मात आहे. त्यांना वगळून ब्राम्हणेतर आणि इतर नागवंशी असून त्यांची संस्कृती एकच आहे. म्हणून वेद पठण आणि इतर अधिकारात शूद्र आणि अतिशूद्र यांना कोणतेही स्थान नाही आणि त्यांच्या मते परशूरामाने क्षत्रीय वंश नष्ट केल्यानंतर ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वर्ण शिल्लक राहिले आहेत. ब्राम्हणी धर्माचा हा आधार असल्याने त्यांना उच्चस्थानी बसवून देव आणि मानव यांच्यातील मध्यस्थ म्हणून मानण्याची आवश्यकता नाही. जोपर्यंत हे चालत आहे तोपर्यंत ते शूद्रांचा अपमान करीतच राहणार आहेत. छत्रपतींचे घराणेसुध्दा त्याला अपवाद नाही. बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचे आंदोलन मंदिर प्रवेशासाठी नव्हे तर अस्पृश्यांना हिंदू धर्माचे घटक मानल्यानंतरही मंदिर प्रवेश नाकारून माणूसकीचा जो हक्क हिरावून घेण्यात आला होता. त्यासंबंधी अस्पृश्यांमध्ये जागृतीचा विस्तव पेटविण्यासाठी आंदोलन केले. बौध्द धम्माचा स्वीकार केल्यानंतर बौध्दांनी देवच नाकारला. मंदिरात जाण्याचा प्रश्नच उरला नाही. हिंदू धर्माचा पाया वर्णव्यवस्था आहे. यातून बाहेर पडायचे असेल तर प्रथम ही चौकट मोडावी लागेल, असे मानसिक परिवर्तन झाल्याशिवाय संयोगिताराजे व इतर कोणी कितीही प्रयत्न केला तरी वर्णव्यवस्थेचे पानसुद्धा हलणार नाही.
- जोगेंद्र सरदार
Satyashodhak, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar, Bahujan