- अनिल भुसारी.
छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय नाहीत ते शूद्र आहेत आणि शुद्रांना राजा होण्याचा अधिकार नाही असे म्हणून महाराष्ट्रातील ब्राह्मण - पूरोहीतांनी त्यांचा राज्याभिषेकाचा विधी करण्यास नकार दिला. समस्त रयतेच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करून, स्वातंत्र्याची ज्वाला पेटवून, स्वाभिमान निर्माण करत स्वराज्याची स्थापना केली, समस्त रयतेला सुखी समाधानी केले अशा छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र ठरवून राज्याभिषेक करण्यास नकार देणे म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच अपमान नव्हता तर ज्या मावळ्यांनी स्वराज्य स्थापन करण्याकरीता त्याग केला, संघर्ष केला, बलिदान दिले त्या समस्त मावळ्यांचा - रयतेचा तो अपमान होता. छत्रपती शिवाजी महाराजां नंतर संभाजी महाराज हे छत्रपती झाले. परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी ब्राम्हण - पुरोहितांना जुमानल नाही. स्वतः त्यांना धर्माचा अभ्यास होता. काशीचा पुरोहित गागाभट्टाला त्यांनी वाद-विवादात पराभूत केले होते. ते धर्म पंडित होते. त्यामुळे त्यांच्यापुढे ब्राम्हण- पुरोहितांचे चालत नव्हते. त्याचाच राग म्हणून त्यांच्या छत्रपती बनवण्याच्या मार्गा मध्ये अनेक अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या गेला, त्यांना मारण्याचा प्रयत्न केल्या गेला होता. ब्राम्हण- पुरोहिताना दूर ठेवत संभाजी महाराजांनी स्वराज्याचे रक्षण केलं म्हणून त्यांना स्वराज्य रक्षक असे म्हटल्या जाते. पुढे शाहू महाराज ज्यांचा उल्लेख राजर्षी म्हणून केल्या जातो. ते छत्रपती झाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना पंचगंगा नदीत पूजा करताना मात्र पुरोहिताने वेदोक्त मंत्र म्हणण्यास नकार दिला. पुरोहिताला शाहू महाराजांनी जाब विचारताच तो म्हणाला की, तुम्ही क्षत्रिय नाहीत शूद्र आहात आणि शूद्रांना वेदोक्त पद्धतीने मंत्र म्हणण्याचा अधिकार नाही. पुढे वेदोक्त मंत्र पद्धतीचा लढा शाहू महाराजांनी लढला. परंतु त्या प्रकरणानंतर शाहू महाराजांनी पुरोहिताचे इनामे, जहागिरी जप्त केली, वेतन बंद केलं. त्यानंतर बाळ गंगाधर टिळकांनी आपल्या जातभाई पुरोहीतांची बाजू घेत शाहू महाराजांवर टीका करणारा अग्रलेख २२ ऑक्टोंबर 1901 च्या केसरीमध्ये लिहिला त्यात ते म्हणतात, "जरी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक वेदोक्त पद्धतीने झाला असला तरी त्यांचे घरचे सर्व धार्मिक संस्कार वेदोक्तं पद्धतीने होत असत त्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. शिवाजी महाराजांपेक्षा ज्यांची जातकुळी श्रेष्ठ नाही त्यांनी वेदोक्तचा खुळ माजवून राज्यातील शांततेचा भंग करणे हे गैरशिस्त आहे." म्हणजे शाहू महाराजांनी पुरोहिताच्या सवलती बंद केल्यानंतर छत्रपतींच्या वंसजाना म्हणजे शाहू महाराजांना शिस्त सांगणारे टिळक. (याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा) छत्रपतींच्या घराण्यात कदाचित धार्मिक दृष्ट्या पुरोहितांकडून असे अनेक छोटे - मोठे धार्मिक अपमानाचे प्रसंग झाले असतील, ज्याचा उल्लेख सापडत नाही. परंतु ह्या दोन प्रकरणा नंतर सुद्धा छत्रपतींच्या पुढील वारसांनी धडा घेऊ नये यात चूक पुरोहितांची की वारसांची हा चिंतनाचा आणि विचार करण्याचा विषय आहे. हे सर्व आठवण्या मागचे कारण म्हणजे, कोल्हापूर गादीच्या श्रीमती संयोगिता संभाजीराजे भोसले यांचा नाशिक येथील काळाराम मंदिरात वेदोक्त आणि पुराणोक्त पद्धतीने करावयाच्या विधी वरून पुरोहितांसोबत झालेला वाद - विवाद.
खरंतर कोल्हापूर आणि सातारच्या गादीच्या वारसांनी 15 एप्रिल 1920 रोजी राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांनी काढलेलं आदेश (आदेश जोडलेला आहे) जर त्यांनी वाचलं असतं आणि वाचलं असेल तर त्याचे स्वतःच्या जीवनात जर अंमलबजावणी केली असती तर आज जो त्यांच्यावर अपमानास्पद प्रसंग ओढवला तो प्रसंग कदाचित ओढवला नसता. खरंतर हे म्हणताना दुःख होतो की, जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही. देवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून नव्हे तर माणूस म्हणून मानवी हक्क मिळावा यासाठी काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केला होता. परंतु आज झालेल्या प्रकारानंतर असं वाटायला लागत आहे की, छत्रपती घराण्यातील वारस आणि कुणबी - मराठा - ओबीसी समाज सुद्धा ब्राम्हण- पुरोहितांच्या दृष्टीने अजूनही अस्पृश्यच आहे. हे आजच्या प्रसंगातून दिसून येतो. ज्या सावरकराने त्यांच्या साहित्यातून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या संदर्भाने अपमानास्पद लेखन केलेले आहे. त्यांचा अपमान केलेला आहे. त्या सावरकरांच्या सन्मानार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सावरकर गौरव यात्रा काढत आहे. या गौरव यात्रेत कदाचित सातारचे खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले हे सहभागी होण्यास उत्सुक असतील तर त्यांनी फर lविचार करण्याची ही योग्य वेळ आहे. आणि समस्त महाराष्ट्रातल्या कुणबी -मराठा -ओबीसी बांधवांनी सुद्धा आजच्या या काळाराम मंदिरातील प्रसंगाने धडा घेऊन आपले शत्रू आणि आपले मित्र कोण हे ओळखून, गुलाम आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो हे जाणून, वारंवार आपल्या प्रेरणांचा महामानवांचा अपमान करणाऱ्यांच्या हातून आपल्या घरातील धार्मिक संस्कार करावे का? याचा विचार करावा आणि इतिहासातून धडा घेत पुढची वाटचाल करावी. शिवराय - फुले - शाहू - आंबेडकरांच्या विचाराचे वारस म्हणून घेणारे "खासदार संभाजी भोसले " हे त्यांच्या सुविद्य पत्नी संयोगिताताई भोसले यांचा झालेला अपमान आपण खासदारकीसाठी सहज पचवून शांत राहणार असणार तर महाराष्ट्रातील शिव - शाहू विचारांचे अनुयायी आपणास फक्त शिव - शाहूंच्या रक्ताचे वारस समजतील विचारांचे वारस समजणार नाहीत. आपल्या भूमिकेची महाराष्ट्र वाट पाहतोय.
अनिल भुसारी...
Satyashodhak, obc, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, Bahujan