अंबाजोगाई, ता. २९ केंद्र व राज्य शासनाची ओबीसी आरक्षणाबाबत टोलवाटोलवी सुरु आहे. त्या अनुषंगाने ओबीसी जनगणनेकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २८ व २९ मे असे दोन दिवस शहरात ओबीसी परिषदेतर्फे पाट्या लावा आंदोलन करण्यात आले. जनगणनेत ओबीसी कॉलम नाही; तर त्यात आमचा सहभाग नाही... अशा आशयाच्या पाट्या या आंदोलनात ओबीसींनी आपल्या दारावर लावल्या आहेत.
अखिल भारतीय ओबीसी परिषदेचे तालुकाध्यक्ष अॅड. किशोर गिरवलकर आदींच्या उपस्थितीत हे पाटी लावा आंदोलन झाले. या आंदोलनाचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नामफलकाला हार घालून झाला. सध्या ओबीसींचे राजकीय आरक्षण तर धोक्यात आहेच. ओबीसींची प्रगती होण्यात आरक्षणाचा मोठा वाटा आहे. मात्र आता हेच आरक्षण धोक्यात आहे. तरीही भारतीय समाजातील बहुसंख्य असणारा ओबीसी अजगरी शांततेत आहे. आता ही शांतता आपल्या पूर्वजांनी मिळवून दिलेले आरक्षण संपविल्याशिवाय राहणार नाही. सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचविण्यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी ओबीसींचे पाटी लावा आंदोलन सुरू असल्याचे अॅड. गिरवलकर यांनी सांगितले. या आंदोलनात दिनेश परदेशी, दिलीप सांगळे, भागवत मसणे, अँड. व्यवहारे, योगेश सुरवसे, राजेश, वेदपाठक आदींनी सहभाग घेतला.