नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे यांच्या अनागोंदी कारभारामुळे 'महाज्योती'च्या चांगल्या योजनांना ग्रहण लागल्याचा आरोप केला जात आहे.डांगे हे राज्य सरकार आणि बहुजन कल्याण मंत्र्यांची दिशाभूल करत असून त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे विविध प्रशिक्षण कार्यक्रम, ओबीसींसाठीची सावित्रीबाई फुले आधार योजना, ८९०० टॅबलेटचे वाटप अशा अनेक योजना धूळखात पडल्याचा आरोप 'महाज्योती'चे माजी संचालक प्रा. दिवाकर गमे आणि स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाने केला आहे. तशी तक्रारही बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे करण्यात आली आहे.
शिदे - फडणवीस सरकारने 'महाज्योती'च्या तीनही तज्ज्ञ संचालकांच्या नेमणुका कुठलेही कारण न देता तत्काळ रद्द केल्या मात्र, संस्थेत पहिल्या दिवसापासून अकार्यक्षम, पक्षपाती आणि भ्रष्टाचारयुक्त कारभारामुळे वादग्रस्त असलेले प्रदीपकुमार डांगे यांच्यावर अद्यापही कारवाई का नाही, असा प्रश्न माजी संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी अतुल सावे यांना केलेल्या तक्रारीत केला आहे. राज्य शासनाने ओबीसींसाठी ७२ वसतिगृहांची घोषणा केली. मात्र, ती सुरू होण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सुरू असलेल्या 'स्वाधार'च्या धर्तीवर तशीच योजना 'महाज्योती'ने सुरू करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. बहुजन कल्याण मंत्र्यांच्या उपस्थितीत नुकतीच संस्थेची बैठक झाली. मात्र, डांगे यांनी विषय पत्रिकेवर हा विषयच न ठेवल्याने ओबीसी विद्यार्थ्यांसाठीची महत्त्वाकांक्षी योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही, असा आरोपही प्रा.गमे यांनी केला आहे. 'महाज्योती'मधून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ८९०० 'टॅबलेट' नव्याने विकत घेतले. मात्र, ते संस्थेकडे अनेक महिन्यांपासून पडून आहेत. अशा अनेक तक्रारींमुळे 'महाज्योती'तुन डांगे यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रा. गमे व स्टूडेंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाने सावे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
अन्य तक्रारी...
'महाज्योती'च्या टॅबलेट खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे. यासंदर्भात प्रदीपकुमार डांगे याना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची तक्रारही त्यांनी मुख्यमंत्री आणि बहुजन कल्याण मच्याकडे केली आहे. याशिवाय दिलेल्या आदेशाचे डांगे यांनी उल्लघन केल्याचा आरोप माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. डाने यानी सरूकेलेल्या सर्व योजना अपयशी ठरल्या असून विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास नसल्याचा आरोप स्टुडेट राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाने केला आहे.
डांगे यांच्याकडून आरोपांचे खंडन
या सर्व आरोपासंदर्भात व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे याना विचारणा केली असता त्यांनी ते नाकारले. तीन वर्षांआधी सुरू झालेल्या महाज्योतीच्या अनेक योजना सुरू असून अन्य संस्थांच्या तुलनेत कमी खर्चात आम्ही प्रशिक्षण कार्यक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. कुठल्याही योजना तयार करण्याचे काम संचालक मंडळाचे असून त्या राबवण्याचे काम प्रशासनाकडून प्रामाणिकपणे सुरू आहे. टॅबलेट वाटप थांबवण्याचे आदेश शासनाकडूनच आले होते. नुकत्याच झालेल्या बैठकीत हा विषय मार्गी लागला असून लवकरच वाटपही होईल. आधार योजना सुरू करण्याचा अधिकार हा राज्य शासनाचा आहे. 'महाज्योती'च्या कुठल्याही कामात अनियमितता नसन पा. गमे यांनी केलेले आरोप हे साफ खोटे आहेत. समाजाची दिशाभूल करून संस्थेला नाहक बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याचेही डागे म्हणाले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan