दिनांक ३० एप्रिल रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इतिहास विभाग आणि देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ’देशभक्त केशवराव जेधे स्मृती व्याख्याना’चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. हरी नरके होते आणि सकाळ वृत्तपत्राचे संपादक सम्राट फडणीस यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. इतिहास विभागाच्या विभागप्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सदरील व्याख्यान आयोजित करण्यामागचा हेतू सांगतांना त्या म्हणाल्या कि, त्या काळाच्या युगमानसाचा अभ्यास करणे आणि समजून घेणे महत्वाचे आहे म्हणून आम्ही हे व्याख्यान आयोजित केले आहे.
फाउंडेशन चे अध्यक्ष दिग्विजय जेधे यांनी संस्थेची भूमिका मांडली. त्यामध्ये ते म्हणाले कि, केशवराव जेधे हे महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय इतिहासतील अत्यंत महत्वाचे नायक आहेत. त्यांनी जनसेवा केली म्हणून आम्हीही त्यांचा वैचारिक वारसा फौंडेशनच्या वतीने चालवत आहोत. यापुढेही अनेक कार्यक्रम फौंडेशनच्या वतीने आम्ही करणार आहोत, त्यामध्ये शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये जेधेंचे जीवनकार्य समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असून भविष्यामध्ये त्यांच्या आयुष्यावर आधारीत वेब सिरीज तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे.
प्रा. हरी नरके सरांनी आपल्या भाषणात महात्मा जोतीराव फुल्यांच्या सत्यशोधक समाजाविषयी मांडणी केली. तसेच, देशभक्त केशवराव जेधे हे महात्मा फुल्यानंतर सत्यशोधक चळवळीत सर्वात मोठे लोकनेते होते असेही म्हटले. जेधेंनी लोकशिक्षण, लोकजागृती आणि लोकसंघटन करून सामाजिक चळवळीच्या आणि राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळीत महत्वाची भूमिका निभावली आहे असे अनेक उदाहरणे देवून प्रा. नरकेंनी सांगितले. केशवराव जेधे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील मैत्री आणि केशवराव जेधे आणि काकासाहेब गाडगीळ हे निवडणुकीत प्रतिस्पर्धी असूनही एकमेकांचे स्नेही होते असे सांगत असतांना आजच्या राजकीय वातावरणात असा स्नेहभाव दिसत नाही म्हणून प्रा. नरकेंनी खंत व्यक्त केली. भाषणाच्या शेवटी, महाराष्ट्राच्या इमानाला आणि हितसंबंधांना जगेल तोच खरा मराठा ही केशवराव जेधेंची भूमिका आजही महराष्ट्राच्या राजकारणाला आणि समाजकारणाला दिशादर्शक आहे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करतांना सम्राट फडणीसांनी सागितले कि, आजच्या काळात खरा इतिहास आणि खोटी बातमी यात फरक करायची गरज आहे. कारण, सोशल मिडियामध्ये सातत्याने इतिहासाची मोडतोड होते. विद्यापीठांनी आणि इतिहास विभागांनी त्याविरोधात कृतीशील कार्यक्रम हाती घेतली पाहिजे. फडणीस पुढे म्हणाले कि, आजच्या काळात चळवळी का थंडावल्या? या प्रश्नांचा अभ्यास झाला पाहिजे. सत्यशोधक आणि पुरोगामी चळवळींचे विचार पुढे का गेले नाहीत. याचा विचार करायला हवा. तसेच, माहितीची गती वाढली पण त्याप्रमाणात आकलनक्षमता वाढलेली दिसत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शेवटी, वाढत्या उदारीकरणाचा आणि चळवळीच्या ऱ्हासाचा काहीसा संबंध आहे असेही सम्राट फडणीस म्हणाले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इतिहास विभागाचे प्रा. बाबासाहेब दुधभाते यांनी केले. कार्यक्रमाला विद्यापीठातील इतिहास आणि इतर विभागाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तसेच, देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशनचे विशवस्त अनिल पवार, राजलक्ष्मी जेधे, ॲड. मारूती गोळे, महेश मालुसरे, मंदार मते, व सुजीत ताकवणे उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, Bahujan