मित्रांनो सप्रेम जय गुरु. कोणत्याही एका व्यक्तीला जगातल्या सर्व विषयाचं समग्र ज्ञान असणे अशक्य आहे. ज्ञान हे अनंत आहे अगाध आहे असीम आहे ज्ञानाला सीमा नाही त्याचबरोबर ज्ञान हे अबाधित आहे ज्ञान या अबाधित तत्वाला आपण ईश्वर मानतो. जगात ईश्वरच फक्त निर्दोष आहे. कारण जो जन्म घेतो त्याला दोष आहे आपण गुणदोषाचे पुतळे आहोत. ज्ञान हे जन्मही घेत नाही आणि मरतही नाही. ज्ञान हे जन्ममृत्यूच्या पलीकडे आहे असं जे आपण म्हणतो ते अगदी यथायोग्य आहे. या ज्ञानाच्या संदर्भात अनेक समज आणि गैरसमज पद्धतशीरपणे पसरवण्यात आलेला आहे. विज्ञानातलं ज्ञान आणि अध्यात्मातलं ज्ञान अगदी वेगळं असतं. शोषणाचं तंत्र पद्धतशीरपणे राबवणाऱ्या आध्यात्मिक दरोडेखोरांकडून 'जिथे विज्ञान संपतं तिथून अध्यात्माला सुरुवात होते' अशा कंड्या पिकवण्यात येते. जिवंतपणी नरक यातना भोगून मृत्यूनंतर वैकुंठ, स्वर्ग सुख प्राप्त करून देणारं हे तथाकथित ज्ञान एरवी जीवन जगत असताना सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरच असतं. सर्वसामान्य माणसाला ज्यातलं काहीही कळत नाही अशा ज्ञानाला आध्यात्मिक ज्ञान असाच तथाकथित आध्यात्मिक गुरूंचा निर्वाळा आहे.
सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर असलेल्या या तथाकथित ज्ञानावर काही विशिष्ट लोकांचीच मक्तेदारी असणं स्वाभाविक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये एका विशिष्ट वर्गाचीच ज्ञानाच्या क्षेत्रात मक्तेदारी राहिलेली आहे त्यामुळे ज्ञान हे व्यक्ती केंद्रित होतं. बहुजन समाजावर प्रभुत्व गाजवण्यासाठी गुरुत्वाचा महिमा वर्णन करणाऱ्या पोथ्या ब्राह्मणी साहित्यकारांनी लिहिल्या आणि त्या जनसामान्यांमध्ये पसरवण्यात आल्या. गुरु शिष्य परंपरेतून आपल्याला बहुजन समाजावर पिढ्यान पिढ्या प्रभुत्व गाजवता येईल या उद्देशाने ब्राह्मणी साहित्यकारांनी शेकडो वर्ष लिखाण केले. या लिखाणातून गुरूला शिष्याने आपले तन-मन-धन अर्पण केले पाहिजे ही भावना प्राधान्याने निर्माण करण्यात आली. याचं एक बटबटीत उदाहरण म्हणजे नागपूर येथील हाय कोर्टाच्या न्यायाधीशाने आपली बायको गाडी बंगल्या सहित एका तथाकथित अध्यात्म गुरुला तन-मन धनाने समर्पित केल्याची घटना सर्वश्रूत आहे. दुसऱ्या बाजूने गुरुला सर्वस्व समर्पित करणाऱ्या शिष्याचं महिमा मंडन करणाऱ्या कथा बहुजन समाजात पद्धतशीरपणे पेरण्यात आल्या. या पोथ्यातून संशयात्मे विनाशती हा सिद्धांत बळकट करण्यात आला. परिणामी प्रश्न विचारणे तर दूर प्रश्न निर्माण होणे हे सुद्धा पाप मानले गेले. त्यामुळे ज्यांच्या डोक्यात प्रश्न निर्माण झाले त्या व्यक्तीच्या मनात अपराधीपणाची भावना स्वाभाविकपणे निर्माण झाली. हजारो वर्ष बहुजन समाजाची विचार प्रक्रिया थांबवण्यासाठी इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने गुरु नावाच्या या हत्याराचा अत्यंत कौशल्याने पूर्णताकदिनिशी वापर केला.
या गुरु शिष्य परंपरेचा वारकरी संप्रदायाच्या सगळ्या संतांनी धिक्कार केला आहे 'गुरुशिष्यपण हे तो अधम लक्षण'..तुका गुरु शिष्य परंपरा ही बहुजन समाजाला अधोगतीच्या मार्गाने नेणारी आहे अशी जोरदार मांडणी संत तुकाराम महाराज आपल्या अभंगाच्या माध्यमातून करतात. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरु शिष्य परंपरा तोडण्यासाठी गुरुकुंजात गाधीच निर्माण केली नाही. संत गाडगेबाबा म्हणतात 'माह्या कोणी गुरु नाई माह्या कुणी चेला नाई'खऱ्या अर्थाने आपणच आपले गुरु आहोत. 'आपलाची संवाद आपणाशी' हाच संतांचा निर्वाळा आहे. एकाच व्यक्तीला गुरु मानून सर्वस्व समर्पित करणे हा ब्राह्मणी कावा असून होआपण समजून घेतला पाहिजे.आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर आपल्याला अनेक लोकांचं मार्गदर्शन मिळत असतं त्यामुळे ते सगळेच आपले गुरु आहेत. आपली आई आपला प्रथम गुरु आहे. अध्यात्मातलं ज्ञान हे वेगळं असतं ही कल्पना आपण फेकून दिली पाहिजे. 'राजहंसे चोच पुरविता| पाणी दुधाची होय भिन्नता| तैसे तुझे ज्ञानस्पर्शे चित्ता| दोष निर्दोषता उमगु लागे'| ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ज्ञानाची केलेली व्याख्या विचार प्रक्रियाच दर्शविते आपण सदोष आहोत परंतु अधिकाधिक निर्दोष बनवण्याच्या प्रक्रियेलाच आध्यात्मिक उन्नती म्हटल्या गेली आहे. त्यातूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो तेच नियम विज्ञानाला लागू आहे. हे आता तरी आपण समजून घेतले पाहिजे.
विवेक म्हणजे वेचणे आपण जेव्हा वेचतो तेव्हा आवश्यक ते घेतो आणि अनावश्यक जे आहे टाकून देतो या निवड प्रक्रियेलाच राष्ट्रसंतांनी ज्ञान म्हटलेलं आहे. दोष आणि निर्दोषता कळायला लागण्याच्या प्रक्रियेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्ञान असे म्हणतात. मुलगा कसा होतो हे माहीत नसल्यामुळे मुलगा होत नाही म्हणून दुसरे लग्न करणारे अनेक पुरुष आपण पाहिले आहे. पण जेव्हा स्त्रीचा एक्स एक्स आणि पुरुषाचा एक्स वाय हे गुणसूत्र आपल्याला कळलं तेव्हा मुलगा होणे हे सर्वस्वी पुरुषांवर अवलंबून आहे हे माहीत झाल्यानंतर स्त्रियांना दोष देणे बंद झाले. वैश्विक नियम समजून घेणे हीच वैज्ञानिक प्रक्रिया आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी भारतातील जनसामान्यांवर तथाकथित अध्यात्मिक गुरुचा जबरदस्त प्रभाव आजही आहे. अशा अध्यात्मिक गुरुकडे काहीतरी आगाध आणि जगावेगळे ज्ञान आहे ज्यातलं आपल्याला काहीही कळत नाही मग अशा आध्यात्मिक गुरूच्या पायाची नव्हे त्याच्या चपलीची ही नव्हे तर तो ज्या गाडीत बसलेला आहे त्या गाडीच्या टायरची धूळ आपल्या कपाळाला लावण्यासाठी हातरस मध्ये 122 लोक किड्या मुंग्यासारखे मारले जातात. त्यामुळे गुरु शिष्य परंपरेने भारतामध्ये जी सामाजिक हानी केली आहे ती कधीही भरून निघणारी नाही. गुरुने बायको मागितली तर दिली पाहिजे असं पुस्तकात लिहिणारा आणि 23 हजार कोटीची संपत्ती गोळा करणारा तथाकथित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू, निवृत्त मिलिटरी अधिकाऱ्यांची सशस्त्र सेना स्वतंत्रपणे उभी करून भारत सरकारच्या विरुद्ध युद्ध पुकारणारा राम रहीम आणि हा आत्ताचा तथाकथित भोले बाबा ही याच गुरुपरंपरेने दिलेली देन होय.
हेमंत टाले - 9975807632
Satyashodhak, Bahujan