11 एप्रिल 1827 रोजी माळी समाजातील गोविंदराव आणि चिमणाबाई यांच्या घरी हे रत्न जन्मास आले.
19 व्या शतकातील बहुजन समाज म्हणजे शूद्र-अतिशुद्रांचा समाज! यामध्ये उच्चवर्णीय ब्राह्मण सोडून मराठ्यांसह सर्व जातींचा समावेश होता. अगदी मराठे स्वतःला क्षत्रिय मानत असले. तरी ब्राह्मण मात्र त्यांना शूद्र समजत होते. असा हा समाज म्हणजे देशातील 97% समाज सामाजिक गुलामगिरी, धार्मिक गुलामगिरी, दारिद्र्य, अज्ञान व अंधश्रद्धेच्या गर्तेत गुरफटला होता. आणि त्यांच्या या अवस्थेचे मूळ कारण एकच होते, ते म्हणजे अविद्या, विद्याहीनता, धनहिनता! महात्मा फुले हे या अन्यायी व्यवस्थेच्या विरोधात उभे राहणारे पहिले कृतिशील नेते होते. बहुजन समाजात नवविचार जागृत करून त्याला पुनर्जीवन प्राप्त करून देण्याचे महान कार्य ज्योतिबांनी केले. 19 व्या शतकात शूद्र व अतिशूद्रांकरीता सारे जीवन समर्पित करणारा युगपुरुष म्हणजे ज्योतिराव फुले!
सुधारणेचा मूळ पाया शिक्षण आहे, असे ज्योतिबांचे ठाम मत होते. शिक्षणाने सर्वांगीण सुधारणा होऊ शकते, या विचारांवर त्यांची प्रचंड श्रद्धा होती. आदर्श समाज रचनेसाठी शिक्षणाची गरज आहे हे ओळखून त्यांनी स्त्री शिक्षण आणि शूद्रांना शिक्षण देण्याचे ठरविले. त्याची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासूनच म्हणजे आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन केली.
पुणे येथील भिडे वाड्यात त्यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. लिहिता वाचता येणे एवढा मर्यादित उद्देश्य शिक्षणामागे नाही, तर आचारात, विचारात अमुलाग्र बदल घडवून आणण्याचे काम शिक्षणाने झाले पाहिजे याबाबत फुले दांपत्य आग्रही होते.
सावित्रीबाईंच्या सहकार्यामुळे आणि उत्तेजनामुळेच आपण समाजकार्य व लोकसेवेचे कर्तव्य पार पाडू शकलो असे ते कौतुकाने सांगत.
त्यांनी आयुष्यभर अस्पृश्यतेला प्रखर विरोध केला. तसेच केशवपणाचा धिक्कार करून विधवा विवाहाचा पुरस्कार केला. अंधश्रद्धेचे निर्मूलन होऊन समतावादी विचार रुजावा यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. “सार्वजनिक सत्यधर्म” या पुस्तकातून त्यांनी सत्य वर्तनाने वागणाऱ्या व्यक्तीचे लक्षणे लोकांसमोर मांडली. हे पुस्तक वाचताना ज्योतिबांचा समाजाविषयी किती अभ्यास होता हे लक्षात येते.
गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून तात्कालीन इंग्रज राजवटीवर आक्रमक शैलीत त्यांनी हल्ला केला. गरीब शेतकऱ्यांविषयी वाटणारा कळवळा आणि अन्यायाबद्दलची चीड त्यांच्या शब्दांमधून जाणवते. दरिद्री शेतकऱ्यांना बियाणे व शेतीची अवजारे पुरविण्यासंबंधी सरकारकडे त्यांनी आग्रह धरला होता. समाजसुधारणेच्या हेतूने ज्योतिबांकडून विपुल लेखन झाले. “अखंड” या काव्य प्रकारातून मानवता धर्माचे प्रतिपादन ते करतात.
आपला देह जगाच्या कल्याणासाठी कष्टावा, असा उपदेश ते करतात. अस्पृश्यता निर्मूलन, स्त्री शिक्षण, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, समाजसुधारक, विचारवंत या त्यांच्या महान कार्यामुळेच लोकांसाठी ते महात्मा ठरले.
अशा या थोर महात्म्याचे महानिर्वाण 28 नोव्हेंबर 1890 साली झाले. क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचे संघर्ष आणि समाज कार्य पाहून एवढेच म्हणावेसे वाटते की,
स्त्री शिक्षणाचे तुम्ही रोपटे लाविले !
त्याचेच आज भव्य वृंदावन झाले !!
फळा फुलांनी ते सर्व बहारले !
त्या फळा-फुलातून आज आवाज निघतो
महात्मा फुले, महात्मा फुले !!