लेखक : प्रदीप ढोबळे, BE MBA BA LLM PGDHRL, संस्थापक अध्यक्ष ओबीसी सेवासंघ, 9820350758
लोकसभा निवडणुकीचे बीगुल वाजले आहे. महाराष्ट्रात महायुती व महावीकास आघाडी ह्यांच्यात अनेक ठिकाणी सरळ मुकाबला झाला तर महाविकास आघाडीस बऱ्यापैकी चांगल्या जागा मिळू शकतात; परंतु शर्थ आहे की महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीस सन्मानाने सामावून घेणे. वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी 12-12-12-12 अश्या सम प्रमाणात लोकसभेच्या जागा काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरदचंद्र पवार ), शिवसेना (उद्धव ठाकरे ) आणि बहुजन वंचित आघाडी वाटून घ्याव्यात असे सुचविले आहे. मागच्या 2019 च्या लोकसभेत शिवसेनेला 18 राष्ट्रवादी कॉंग्रेसला 5 जागा तर कोंग्रेस आणि वंचित-एमआयएम आघाडीला प्रत्येकी एक जागा मिळाली होती.
शिवसेना : शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या कारण तिची भाजपा सोबत युती होती. आज भाजपा सोबत युती नाही. शिवसेना ह्या पक्षात उभी फुट पडली आहे. त्यात शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला गेले आहे. 18 पैकी 13 खासदार शिंदे शिवसेनेत सोडून गेले आहेत. मग आमच्या 18 जागा होत्या हे शिवसेनेने म्हणण्यात काही अर्थ आहे का ? जमेची बाजू एकच आहे .. उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांचे नेतृत्व आणि त्यांना असलेले जन समर्थन आणि सहानुभूति. परंतु पक्ष सोडून गेलेल 13 खासदार , 40-45 आमदार आणि सदया भाजपा ची केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणे हे फार तगडे आव्हान आहे. असा पक्ष खरेच 12 च्या वर जागा मागू शकतो का ?
कॉंग्रेस : मागील निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ह्यांची आघाडी होती; त्यात कॉँग्रेसचा फक्त एक खासदार निवडून आला होता. दुर्दैवाने त्या खासदारांचे सुद्धा निधन झाले आहे. मागच्या वेळेस सोबत असलेला राष्ट्रवादी पक्ष उभा फुटला आहे; आणि त्या पक्षाचे नाव आणि चिन्ह सुद्धा अजित पवार गटास गेले आहे. अगदी अलिकडेच एक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पक्ष सोडून भाजपात जातो. कॉंग्रेस पुढे आपला पक्ष आहे तेवढा जपणे; हेच फार मोठे आवाहन आहे. असा पक्ष खरेच 12 च्या वर जागा मागू शकतो का ?
राष्ट्रवादी : राष्ट्रवादी पक्षात तर घरातच उभी फुट पडली आहे. जमेची बाजू म्हणजे पवार साहेबांचे राष्ट्रीय स्तरावरील व्यक्तिमत्व; संविधानावारील त्यांची दृढ निष्ठा,जनाधार, राजकीय कौशल्य . पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाकडे. अजित पवार उपमुख्यमंत्री. स्वप्नातही पवार साहेबांना सोडून जाणार नाही असे वाटणारे त्यांचे पटेल, भुजबळ, तटकरे , मुंढे सारखे नेते विरोधी गटात. एकूणच आवाहन फार मोठे आहे ? असा पक्ष खरेच 12 पेक्षा जास्त जागा मागू शकतो का? परंतु असे ऐकण्यात आले आहे की राष्ट्रवादी पवार पक्ष 12 च्या आत निवडणूक लढण्यास तयार आहे. महाविकास आघाडीत राजकीय दृष्ट्या अतिशय परिपक्व अशी भूमिका पवार साहेबांनी घेतलेली दिसते.
वंचित बहुजन आघाडी : मागील निवडणुकीत वंचीतची एम आय एम सोबत युती होती आणि त्यातून एक खासदार संभाजीनगर मधून निवडून आला होता. आज ती युती नाही.
विश्लेषण : आज वंचित ची एमआयएम सोबत युती नाही. पण या आघाडीचा एकमेव खासदार निवडून आला त्याचे कारण तिरंगी झालेली निवडणूक. मतांचे त्रीभाजण झाले तर वंचित बहुजन ह्या पक्षास फायदा होतो; उमेदवार निवडून यायच्या संधि वाढतात परंतु तेवढ्याच प्रमाणात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणुकीत पराभूत होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते; कारण वंचित बहुजन आघाडीचे मत ही फुले शाहू आंबेडकरी विचारांची असतात. या मताच्या फरकातून मागील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी चे 10 ते 12 उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले होते. आता या स्थितीत खरे तर अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने वंचित बहुजन आघाडी चे नेते प्रकाश आंबेडकर यांना साकडे घालायला पाहिजे की 12 नको 13 जागा तुम्ही घ्या; पन आमच्या महाविकास आघाडीत सामील व्हा; परंतु येथे तर चित्रच वेगळे दिसते; येथे वंचित बहुजन आघाडीच च समसमान जागा वाटपांचा फारमुला आपल्या जाहीर सभेतून महाविकास आघाडी समोर ठेवत आहे. आणि महाविकास आघाडी काय करीत आहे तर , वंचित ला दोन किंवा चार जागांची भलावण देत आहे. महाविकास आघाडीस जन समर्थन असल्यास ही त्यांनी हे विसरता काम नये त्यांच्या मुकाबला जगातील सर्वात मोठा पक्ष भाजपा आणि भरिस भर शिवसेना आणि राष्ट्रवादीतून सोडून गेलेले दिग्गज नेते ह्यांच्या सोबत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनाचा नातू हे बळ् असलेले आणि अतिशय मुत्सद्दी राजकीय नेते बाळासाहेब आंबेडकर हेच जाहीर सभेतून भाजपा सरकारच्या जन विरोधी नितीस आवाहन करीत आहे; अर्थातच भारतातील बहुसंख्य बहुजन समाजाची ताकद ही त्यांच्या सोबत आहे. भाजपा व आरएसएस वर सरळ ताशेरे ओढण्याची ताकद फक्त बाळासाहेब आंबेडकरात आहे. एवढी ताकद आजच्या स्थितीत कुठल्याही नेत्या पाशी नाही. ह्यास बळ् देण्याची खरी गरज महाविकास आघाडीला आहे. फक्त महाराष्ट्राचा विचार करता भाजपा सोबत लढा देण्याची ताकद आज कुणा मध्येच नाही ; ही वस्तुस्थिती आहे; उद्या यात निश्चित बदल होईल हे ही मला मान्य आहे; परंतु कधी कधी वेळ महत्वाची असते; वेळीच मारलेला एक टाका; पुढील नऊ टाके वाचवितो; हे धोरण लक्षात घेऊन तर, विरोधी आघाडीने जागांचे समसमान वाटप केले पाहिजे. मतांचे त्रीभाजन हे वंचित च्या पक्ष वाढीच्या दृष्टीने आणि जास्त उमेदवार निवडून येण्याच्या दृष्टीने भले असले तरी मताचे दोन भागात विभाजन करावे .. एकास एक उमेदवार द्यावा ही रण नीती बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीसामोर ठेवत आहे; ही बाब महाविकास आघाडी साठी फायद्याची आहे. परंतु अश्या प्रसंगी त्यांच्या काही नेत्यांचे हे म्हणणे की जिंकून येणाऱ्या उमेदवारच्या क्षमतेवर आम्ही उमेदवार देत आहो; हे अतिशय हास्यास्पद आहे. त्यांना हेच समजले नाही की ही निवडणूक उमेदवार नव्हे तर सरळ जनता लढणार आहे. आणि म्हणूनच जनतेची फसवणूक टाळण्यासाठी सरळ लढत आवश्यक आहे. जनता भाजपच्या बाजूने असेल तर भाजपा निवडून येईल; विरोधात असेल तर विरोधी पक्षाचा उमेदवार निवडून येईल. खर तर सरळ लढत ही वंचित साठी फार मोठा धोका आहे ; कारण सरळ लढतीत मताचे जे विभाजन होईल त्यात महाविकास आघाडीचे उमेदवार हे प्रस्थापित पक्षाचे, प्रस्थापित जातीचे असतील व वंचित जातीची मते प्रामाणिकपणे त्यानं सरळ ट्रान्सफर होतील. वंचित चे उमेदवार हे बहुतांशी मागासवर्गीय दुबळ्या जातीतील असल्यामुळे; आपल्यात असलेल्या जातीय मानसिकतेमुळे उच्च जातीय निम्न जातीस मत ट्रान्सफर करताना खूप विचार करतील; यात मी मतदारांचा दोष आहे असे ही म्हणत नाही; हिंदू व्यवस्थेतील जातीय उतरंडी मूळे अशी सहज मानसिकता आपल्यात निर्माण झाली आहे.
वंचित सोबत असलेल्या महाविकास आघाडीतील पहिल्या बारा जागा ज्या पडतील त्या पूर्ण वंचितच्याच असतील आणि महाविकास आघाडीच्या उर्वरित छतीस जागा ज्या निवडून येतील त्या वंचितच्या मंतदानामुळेच येतील हे ही येथे लक्षात घेतले पाहिजे. एकूणच वंचित संहित महाविकास आघाडी म्हणजे निवडणूक न लढताच भाजपला 12 जागा आधीच दिल्यासारख्या होईल असे महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटू शकते; आणि काही अंशी हे वास्तविक सुद्धा आहे. परंतु या अधिकच्या बारा जागा मिळविण्याच्या प्रयत्नांत मविआ आपल्या 36 जागेला खिंडार लावत आहे हे त्यांना समजत नाही. निवडणुकीची रणनीती ही किती जास्त जागा लढण्यापेक्षा किती जास्त जागा निवडून येऊ शकतात; या वर आधारित असली पाहिजे. वंचित ला दिलेल्या 12 जागा म्हणजे भाजपचा सहज विजय. भाजपला अधिक जागा मिळविण्याचा प्रयत्न उर्वरित 36 जागेवर करावा लागेल. मग कुणीही असा प्रश्न करेल जर एक ही जागा वंचित निवडून येणार नाही अशी परिस्थिति असंतांनी वंचित महाविकास आघाडीचा आग्रह का करीत आहे? तर त्याचे कारण वंचित बहुजन गटास अर्थातच वंचित समाजाच्या नेत्याना, विचारवंतांना आणि सामान्य जनतेला; असे कुठे तरी वाटते आहे की भारतीय संविधान आणि भारतीय संविधानातील तत्वे वाचली पाहिजेत. संविधानात असणाऱ्या सामाजिक न्यायाच्या धोरणामुळे आज वंचित बहुजन जातीतील पिढयाना शिक्षण मिळते; आरक्षणामुळे प्रशासनात प्रतिनिधित्व मिळते; हा विचार ह्या मध्ये आहे. आज ही वंचित बहुजनाना आपल्या समृद्धीचा मार्ग मोठमोठे रस्ते नसून ; मोफत शिक्षण, मोफत स्वास्थ, शाळा , सरकारी दवाखाने ह्यात आहे असे वाटते; त्यांना मोफत धान्याची गरज नाही तर त्यांच्या कष्टा ला, शेत मालाला योग्य भाव मिळावा असे वाटते. वंचित बहुजना ची लढाई एका निवडणुकी पुरती नसून भावी पिढ्यासाठी आहे; संविधाना साठी आहे; लोकशाही साठी आहे; धर्मनिरपेक्षतेसाठी आहे; स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावा साठी आहे.
वंचित बहुजन आघाडी ने खुले आम महाविकास आघाडिसोबत समसमान वाटप किंवा एखादी जागा इकडे तिकडे ह्या धोरणावर निवडणूक झाल्यास ते दोघाच्याही फायद्याचे असेल आणि तरी एकी झाली नाही आणि भाजपानी जोरदार मुसंडी मारल्यास नंतर भाजपची बी टीम कोणती हा शोध घेणे मूर्ख पणाचे ठरेल. नंतर एकदुसऱ्यांना बी टीम म्हणण्यापेक्षा आजच ए टीम बनने हे जास्त शहानपणाचे होईल.
जय भारत जय संविधान.
लेखक : प्रदीप ढोबळे, BE MBA BA LLM PGDHRL
संस्थापक अध्यक्ष ओबीसी सेवासंघ, 9820350758