लेखकः -प्रा. श्रावण देवरे
निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे उमेदवार निवडीची लगीनघाई जोरात सुरू होत असते. सध्या लोकसभा निवडणूक जवळ आलेली असतांना उमेदवार निवडीसाठी लगीन घाई सुरू झालेली आहे. उमेदवार निवडतांना कोणत्या कसोट्या लावल्या जातात. या सर्व कसोट्या कोणत्या मॉडेलमधून येतात?
विषम समाजव्यवस्थेत प्रत्येक समाजघटक प्रत्येक क्षेत्रासाठी आपापले वेगळे मॉडेल बनवत असतो. मुकेश अंबानीच्या परिवाराचे अनन्य असे लग्नाचे मॉडेल आपण नुकतेच पाहिले आहे, त्यात विविध नट-नट्यांचे डान्स समविष्ट असतात. चौफेर लांबवर महागडी रोशनाई असते. जागतिक स्तरावरचे सेलीब्रिटीज असतात. हे मॉडेल मध्यम व कनिष्ठ समाजघटक स्वीकारूच शकत नाही. ते आपले स्वतःचे वेगचेळे मॉडेल बनवतात. चहापानावर व मिठाईच्या एका छोट्याशा बॉक्सवर रजिस्टर्ड मॅरेज होतांना आपण पाहात असतो. सत्यशोधक विवाह व बौद्ध विवाह असे अब्राह्मणी लग्नाचे मॉडेल आपणास माहीत आहेत.
प्रस्थापित उच्चजात-वर्गाच्या सत्ताधार्यांनी आपले स्वतःचे एक निवडणूक मॉडेल बनविले आहे. या मॉडेलप्रमाणे उमेदवारसाठी पहिली कसोटी आहे ‘सक्षमतेची’. एकादा उमेदवार सक्षम आहे म्हणजे नेमके काय आहे? या सक्षमतेमध्ये कार्य-क्षमता, विचार-सक्षमता याचा समावेश होता का? तर, अजिबात नाही, कारण प्रस्थापित उच्चजातीयांच्या निवडणूक मॉडेलमध्ये कार्यक्षमता व विचारक्षमता या दोन मुद्द्यांना अजिबात जागा नसते. त्यांच्या दृष्टिने एनकेन प्रकारे निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार म्हणजे ‘सक्षम’ उमेदवार होय! त्यामुळे सचिन तेंडूलकर, हेमा मालिनी, धर्मेंद्र वगैरे सेलिब्रिटीज यांना सहज तिकीट मिळते व ते निवडूनही येतात. सक्षम होण्यासाठी तो उमेदवार धनाढ्यसुद्धा असला पाहिजे. पैशाने श्रीमंत असलेला उमेदवार खरोखर सक्षम असतो काय? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर हा प्रश्न उपस्थित झाला होता. 1936-37 साली ईगतपूरीच्या एका सभेत त्यांनी जनतेला हा प्रश्न विचारला व त्यांनीच या प्रश्नाचे उत्तरही दिले.
बाबासाहेब म्हणाले, तुमच्या मतदारसंघात आपल्या पक्षाच्या तिकीटावर दोन उमेदवार लढू ईच्छितात. एक म्हणतो माझ्याकडे पैसे आहेत, मी पैशाच्या जोरावर सहज निवडून येईल. दुसरा उमेदवार म्हणतो मी आपल्या चळवळीत सुरूवातीपासून कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे व आपल्या विचारांशी एकनिष्ठ आहे. बाबासाहेब स्पष्टपणे सांगतात की पैशांच्या जोरावर नव्हे तर विचारांच्या जोरावर निवडून येणारा उमेदवार मला हवा आहे.
बाबासाहेब असे का म्हणाले असतील ? त्याचे साधे कारण हे आहे की, विधानसभेत जाणारा उमेदवार हा शोषित-पिडित जनतेचा प्रतिनिधी म्हणून काम करणारा हवा! या कायदेमंडळात शोषित व अस्पृश्य जातींच्या हितासाठी कायदे करून घेण्यासाठी तेथे वैचारिक भुमिका मांडावी लागते. प्रसंगी आक्रमकही व्हावे लागते. हे काम विचारांशी एकनिष्ठ असलेला कार्यकर्ताच करू शकतो. विचारांच्या जोरावर लढणारा उमेदवार निवडणूकीत पडला तरी तो पुढच्या निवडणूकीत जिंकून येन्यासाठी दुप्पट वेगाने जनजागृतीचे काम करेल व आंदोलनेही करेल. या उलट पैसेवाला उमेदवार हा आपल्या पैशाच्या धुंदित पक्षनिष्ठा, विचारनिष्ठा विसरतो, असा अनुभव आहे. पैसेवाला उमेदवार निवडूण आला तर तो म्हणतो, मी माझ्या पैशांच्या जोरावर निवडून आलो आहे. निवडणूकित खर्च झालेले पैसे दस पटीने वसूल करण्यासाठी तो शत्रू पक्षांशी अनैतिक तडजोडी करेल, पक्षाशी व विचारांशी गद्दारी करेल. शोषित व अस्पृश्य जनतेच्या हिताचा तो सौदा करेल. अशा खोकेबहाद्दर आमदार-खासदारांची संख्या वाढते आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी उच्चजातीयांचे निवडणूक मॉडेल नाकारले व आपले स्वतःचे शोषित-पिडितांचे नवे निवडणूक मॉडेल तयार केले व ते यशस्वीही करून दाखविले.
या पार्श्वभुमीवर विचार करता आज ओबीसी जनतेने कोणते मॉडेल स्वीकारले पाहिजे? उच्चजातीयांचे निवडणूक मॉडेल की बाबासाहेबांचे निवडणूक मॉडेल ? कोणत्या उमेदवाराला सक्षम मानायचे? निवडून येण्याची क्षमता (शक्यता) बाळगणार्या पैसेवाल्या धनाढ्य उमेदवाराला सक्षम मानायचे की ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी लढणार्या पक्षाच्या उमेदवाराला सक्षम मानायचे?
- प्रोफे. श्रावण देवरे, संस्थापक-अध्यक्ष, ओबीसी राजकीय आघाडी
संपर्क: 94 227 88 546 ईमेलः obcparty@gmail.com
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission, Savitri Mata Phule