आटपाडी - बहुजन समाजातला कोणी नेता बनत असेल, कोणी आपली स्वतःची भूमिका मांडत असेल तर त्याच्या दिशेने चप्पल भिरकावणे ही दादागिरी खपवून घेणार नाही. तुमच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतु तुम्ही ओबीसी आरक्षणाचे वाटेकरी होणार असेल तर आम्हाला विरोध करावाच लागेल. महाराष्ट्र पेटवायची भाषा कराल, तर आमचेही हात बांधले गेले नाहीत. जशास तसे उत्तर देऊ. तुम्हाला आम्ही मोठे भाऊ समजतो. याचा अर्थ असा नव्हे की तुम्हाला आमच्यातला एकही नेता होऊ द्यायचा नाही. आमचा एकच नेता सगळ्यांना भारी आहे, तो आमच्या हृदयात आहे. आ. गोपीचंद पडळकर वाघ आहे, वाघच राहणार... अशा आशयाची वक्तव्ये भाजपचे ज्येष्ठ नेते जयवंत सरगर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, सामाजिक कार्यकर्ते रणजीत ऐवळे यांनी केली.
ते आटपाडी ओबीसी बांधवांच्या मोर्चाप्रसंगी बोलत होते. मोर्चा बसस्थानक ते मुख्य पेठेतून आटपाडी पोलीस स्टेशन चौकात येऊन विसावला. यावेळी 'एकच पर्व... ओबीसी सर्व', तसेच ना. छगन भुजबळ, आ. गोपीचंद पडळकर यांच्या नावाने जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. प्रत्येकाच्या डोईवर 'मी ओबीसी' असे लिहिलेली टोपी होती. मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. यावेळी जयवंत सरगर, माजी सभापती समानताई नागणे, पंढरीबाबा नागणे, यु. टी. जाधव, आबासाहेब सागर, रणजीत ऐवळे, राजेंद्र खरात यांनी मनोगते व्यक्त केली. त्यानंतर तहसीलदार सागर ढवळे, पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जालींदर खंडागळे, अजित जाधव, चंद्रकांत काळे, यशवंत मेटकरी, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण वाघमारे, शैलेश ऐवळे, अरुण बालटे, विष्णू अर्जुन, प्रभाकर पुजारी, संतोष लांडगे, ओबीसी मोर्चाचे आटपाडी तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे भाळवणकर,
कल्याण काळे, महादेव पाटील, अरुण चव्हाण, अनिल सूर्यवंशी, नरेंद्र दीक्षित, बाबासाहेब माळी, महादेव राऊत, नानासो माळी, प्रविण क्षीरसागर, कौठुळीचे दिव्यांग बंधू दत्तात्रय कृष्णा कदम उपस्थित होते.
तुम्ही ज्यांना सिंहासनावर बसवलं, त्यांनीच तुमचे वाटोळे केले. आम्ही आताशी कुठे आरक्षणाच्या सवलतीने राजकारणातले आहोत. आमचा एक नेता होणे तुम्हाला खपत नाही. आम्ही तुम्हाला मायबाप समजतो. पाटील- देशमुख मानतो. याचा अर्थ असा नव्हे, की तुमची दमदाटीची भाषा आम्ही सहन करु. आमच्या नेत्यावर चप्पल भिरकावणे म्हणजेच समस्त ओबीसी बांधवांवरच ती मारलेली आहे. तुमच्या भीतीने काही ओबीसी बांधव घराबाहेर आले नसतील, पण जे आले ते निधड्या छातीचे आहेत हे विसरू नका. फेसबुकवर लाईव्ह येऊन, सोशल मीडियावर शिव्या देऊन विचार जागवता येत नाहीत. तुमच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, म्हणजे तुम्ही आमचेच आरक्षण हिसकावून घेणे नव्हे. तुमच्या आरक्षण प्रश्नी सात सप्टेंबरच्या आटपाडी बंदमध्ये आम्ही सामील झालो होतो, पण आजच्या बंदला तुम्ही 'आटपाडी काय तुमच्या बापाची आहे काय?' असा सवाल करता, हे चुकीचे आहे. - रणजित ऐवळे, सामाजिक कार्यकतें.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission, Savitri Mata Phule