लेखकः -प्रा. श्रावण देवरे
‘‘आजी इंदिरा गांधींनी 1975 साली आणीबाणी लावली, ही फार मोठी चूक होती’’ म्हणून राहूल गांधींनी भारतीय जनतेची माफी नुकतीच मागितली आहे. राजकारणी लोक सहसा माफी मागत नाहीत. परंतू, राहूल गांधींचे मन फार मोठे आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिलेच पाहिजे.
राहूल गांधींचं मोठं झालेलं मन बघता आमच्या शूद्रादिअतिशूद्रांच्या अपेक्षा थोड्या वाढल्या आहेत. कारण अजून बऱ्याच पापांचा हिशेब बाकी आहे. राहूलजी आपले मन अजून थोडे मोठे करतील व त्याही पापांचे प्रायशित्त करतील अशी अपेक्षा आहे. राहूलजी तुमच्या पणजोबाने म्हणजे जवाहरलाल नेहरु यांनी जातनिहाय जनगणना बंद केली. हे फार मोठे पाप केले व त्याची विषारी फळे 52 टक्के ओबीसी जनता गेल्या 75 वर्षांपासून भोगते आहे. एव्हढेच पाप करून पणजोबा थांबले नाहीत तर 1955 साली कालेलकर आयोगाचा अहवाल तुमच्या पणजोबाने दडपला व ओबीसींच्या उद्धाराचा मार्ग त्यांनी रोखला. पणजोबाने केलेल्या या नीच पापाबद्दल केव्हा माफी मागणार राहूलजी?
तुमच्या आजीने म्हणजे इंदिरा गांधींनी मंडल आयोग बासनात गुंडाळला. आणीबाणीनंतर 1977 सालच्या निवडणूकीत सपशेल पराभूत झाल्यावर इंदिराजींनी दिल्लीत आपल्या समर्थकांची बैठक घेतली होती. त्या बैठकीस भारतभरातून फक्त 300 लोक उपस्थित होते. त्यात मोठ्या संख्येने ओबीसी, दलित व मुस्लीम होते. या लोकांमुळेच केवळ तीन वर्षांनंतर इंदिराजी पुन्हा सत्तेत आल्यात. सत्तेत आल्यानंतर पहिले काम इंदिराजींनी कोणते केले? मंडल आयोगाचा अहवाल फेटाळण्याचे काम केले. ओबीसींच्या उपकाराची अशी परतफेड करणार्या कृतघ्न इदिराजींच्या या पापाची माफी केव्हा मागणार राहूलजी?
तुमच्या बापाने म्हणजे राजीव गांधीने 1990 साली लोकसभेत ओबीसी आरक्षणाच्या विरोधात एक तास भाषण केले. तेव्हा राजीव गांधी हे लोकसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्कालीन प्रधानमंत्री व्हि.पी. सिंग मंडल आयोग लागू करीत आहेत, एव्हढ्या एका कारणास्तव तुमच्या बापाने व्हि.पी. सिंग सरकार पाडले. व्हिपी सिंग सरकार पाडण्यासाठी ब्राह्मणवादी संघ-भाजपाशी हातमिळवणी तुमच्या बापाने केली. बापाच्या या पापाबद्दल केव्हा माफी मागणार राहूलजी?
2014 पर्यंत तुम्ही स्वतः व तुमच्या आईच्या नेतृत्वाखाली केंद्रात कॉंग्रेसची सत्ता होती. या कालावधित ओबीसी जनगणनेसाठी अनेक आंदोलने झालीत. पण तुम्ही व तुमच्या आईने ओबीसी जनगणनेला कडाडून विरोध केला. 2011 साली झालेली आर्थिक-जातिय जनगणना (SECC) केवळ धुळफेक करणारी ठरली.
तुमच्या नेहरू घरान्याच्या ओबीसीविरोधी धोरणामुळे ओबीसी कॉंग्रेसला कंटाळला! कॉंग्रेसला कंटाळलेल्या या ओबीसीला भाजपकडे ढकलण्याचे काम राजीव गांधींनीच केले. अयोध्येला लावलेले कुलूप राजीव गांधींनी उघडले व भाजपाच्या मंदिर-मस्जिदच्या राजकारणाला रस्ता तयार करून दिला. त्यामुळे समस्त ओबीसी भाजपाच्या जाळ्यात अडकला. याला कारणीभूत केवळ राजीव गांधी आहेत!
राहूलभैय्या, तुमच्या नेहरू घराण्याच्या चार पिढ्यांच्या अमानुष पापांचे ओझे आज तुमच्या खांद्यावर आहे. हे ओझे घेऊन तुम्हाला 2024 सालच्या निवडणूकीला सामोरे जायचे आहे? नेहमीप्रमाणे ओबीसीला गृहीत धरू नका! ओबीसी आता जागृत होत आहे. आणीबाणीबद्दल आज माफी मागायची गरज नाही. कारण भारतीय जनतेने इंदिराजींना कधीच बिनशर्त माफ केले आहे व पुन्हा सत्तेत बसवले आहे. आज माफीच मागायची असेल तर 52 टक्के ओबीसी जनतेची मागा! आणी केवळ शाब्दिक माफी मागून भागणार नाही, कृती करुन माफी मागा! कॉंग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यात जातनिहाय जनगणना ताबडतोब सुरू करा. आजचा ओबीसी जागृत झाला आहे.. केवळ संघ-भाजपाची भीती घालून ओबीसी तुम्हाला 'मत' द्यायचा नाही.
जयजोती, जयभीम, सत्य की जय हो!
- प्रोफे. श्रावण देवरे संस्थापक -अध्यक्ष, ओबीसी राजकीय आघाडी संपर्क: 94 227 88 546 ईमेलः obcparty@gmail.com
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission