सांगली : अर्धे राज्य दुष्काळात होरपळते आहे. प्यायला पाणी नाही. राज्यातील शाळांची अवस्था गंभीर आहे. शाळा बंद पडायला लागल्या आहेत. या परिस्थितीत दुष्काळी योजनांना आणि शाळांना पैसे द्यायचे सोडून सरकार कुंभमेळ्यावर २५०० कोटीचा शासकीय निधी उधळत असल्याचा घणाघाती आरोप करुन कुंभमेळ्याचा पैसा दुष्काळी भागाला आणि शाळांना द्या, असे आवाहन पुरोगामी कार्यकर्त्यांनी केले.
सांगलीत सुरू असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या आठव्या राज्यस्तरीय अधिवेशनात आज दुपारी 'सांस्कृतिक दहशतवाद मुक्तीसाठी संभाजी ब्रिगेडची जबाबदारी' या विषयावरील परिसंवाद पार पडला. संतोष गजरे यांच्या अध्यक्षतेखाली अमरजीत पाटील, शंकरराव निकम, प्रा. श्रीमंत कोकाटे यांनी यावेळी आपली रोखठोक भूमिका व्यक्त केली.
श्रीमंत कोकाटे यांनी अनेक उदाहरणे देत सांस्कृतिक दहशतवादाचा बिमोड करायचे आवाहन केले. ते म्हणाले, कोणताही दहशतवाद हा वाईटच असतो आणि त्याला शासन झालेच पाहिजे, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडची आहे. या देशात बळिराजा, चक्रधर, तुकाराम, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांच्याही हत्याच करण्यात आल्या. या दहशतवादाविरुध्द काही बोलायचे की नाही, असा सवाल
त्यांनी केला.
होमहवनात गायींच्या कत्तली करणाऱ्यांना गायींचा पुळका कसा? असा सवाल करुन महावीर आणि बुध्दांनी भौतिक मार्गाने प्रबोधन केल्यानेच लोकांनी होमाला गायी द्यायच्या बंद केल्या होत्या, अशी माहिती त्यांनी दिली. गाय वाचली पाहिजे म्हणून एकाही शेतकऱ्याने कधी आंदोलन केले आहे काय? मग आरएसएसलाच गायींचा पुळका का, असा सवाल करुन सर्वच धर्माचे लोक गोमांस भक्षण करतात आणि याच कारणावरुन भविष्यकाळात गायीवरुनही दंगल करता येते याचा दुरोगामी विचार करत जाणिवपूर्वक हा कायदा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमरजीत पाटील यांनी सांगितले, समाजात जाती जातीत दुही पाडून आपले हित साधणाऱ्या समाजाच्या शत्रुला त्याच्या मूळ स्वरुपात उघडे पाडण्याचे काम संभाजी ब्रिगेडने केले. नव्या कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी अधिक तडफेने पार पाडली पाहिजे. सांस्कृतिक दहशतवाद मुळापासून संपवला पाहिजे. यासाठी क्रियावादी व्हा.. प्रतिक्रियावादी नको. टाळ्या मिळवणारी भाषणे करुन हे परिवर्तन होणार नाही तर त्यासाठी स्वत:ची शब्दसंस्कृती उभी करावी लागेल. नथुरामवादी लोक आजही हरलेलीच लढाई लढत आहेत, पण ते कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.
शंकरराव निकम यांनी सांगितले, समाजातील विकृती दूर करायचे काम संभाजी ब्रिगेडने केले. यापुढेही संस्कृतीच्या मुळाशी जाऊन आणि बारकाईने अभ्यास करुन लढा दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज हे पुराणपुरुष नव्हे तर आंतरराष्ट्रीय पुरुष होते, पण त्यांचा इतिहास जगापर्यंत जाऊ नये म्हणून त्यांच्या जन्मतारखेबाबत जाणिवपूर्वक वाद करुन त्यांची जयंती तिथीनुसार करणे, समाजातील प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून आयुष्यभर झगडणाऱ्या फुले यांच्याऐवजी ब्राम्हणी व्यवस्थेचे गुणगाण करणाऱ्या राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षकदिन साजरा करणे, पाठ्यपुस्तकात मुद्दामहून हातात पिंड घेतलेल्या अहिल्याबाई होळकरांचे चित्र छापणे, रामसाद धडधाकट आणि तुकाराम मात्र कर्जबाजाऱ्यासारखे दाखवणे, नीतीमूल्याच्या नावाखाली केशवा.. माधवा सारखे गाणे म्हणायला लावणे कारण केशव म्हणजे हेडगेवार आणि माधव म्हणजे गोळवलकर, पुण्यात संभाजी उद्यानात राम गणेश गडकरींचा आणि फुले मंडईत टिळकांचा पुतळा उभा करणे, फुले शाहू आंबेडकर हे दीनदलितांचे नेते आणि टिळक मात्र लोकमान्य असे सांगणे, खानांचे चित्रपट बघू नका असे सांगताना खानांबरोबर नाचते कोण (माधुरी, उर्मिला, भाग्यश्री) हे मात्र लपवणे, महापुरुषांचे गुरु ब्राम्हणच दाखवणे..यासारखा चालबाजपणा केवळ संभाजी ब्रिगेडने उघडकीस आणला असल्याची माहिती श्रीमंत कोकाटे यांनी दिली.
Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar, Bahujan