फुलंब्री : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे अशी भूमीका ओबीसी नेते छगन भुजबळ यांची आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात प्रथमच फुलंब्री येथे सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने मंगळवार (दि. १९) रोजी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्याभरातील हजारो समाजबांधवांनी सहभाग नोंदवला.
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाने ५८ मोर्चे शांततेत काढले. या मोर्चांना सकल ओबीसी समाजानेही पाठिंबा दर्शवला परंतु हळूहळू त्यांनी मागण्यांमध्ये बदल केला आणि आता चक्क ओबीसी आरक्षणातूनच आरक्षणाची मागणी करत असल्याने त्यास आमचा विरोध आहे. आधी मराठा समाजाने मागासलेपण सिध्द करुन दाखवावे नंतर आरक्षण घ्यावे असे आवाहन समता परिषदेचे जिल्हाध्यक्षमनोज घोडके यांनी केले आहे.
दुपारी बारा वाजता भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा निघाला. मोर्चात समोर सजवलेल्या बैलगाड्या त्यानंतर वारकरी संप्रदायाचे पथक, त्यापाठी मागे महिला व नंतर पुरुष, तरुण मुले अशी शिस्त पाहावयास मिळाली. मोर्चाच्या मार्गावर मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली. 'एकच पर्व ओबीसी सर्व, 'जो ओबीसी के हित की बात करेगा वही देश मे राज करेगा', 'आरक्षण आमच्या हक्काचे' आदी घोषणांनी मोर्चेकऱ्यांनी शहर दणाणून सोडले. दुपारी एक वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, समता परिषदेच्या माजी महिला अध्यक्ष पर्वताबाई शिरसाट, संतोष मिटकर, बारा बलुतेदार प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांनी विचार मांडले. घोडके म्हणाले, ओबीसी समाजाची बिहार प्रमाणे महाराष्ट्रातही जनगणना करण्यात यावी. अगामी निवडणुकांत जो ओबीसींचा विचार करेल त्यालाच मतदान करावे.
पार्वताबाई शिरसाट म्हणाल्या की, मराठा समाज बांधव, ओबीसी समाज बांधव हजारों वर्षांपासून गुण्या गोविंदाने नांदत आहेत, परंतू आरक्षणाच्या विषयावरवरून चार-पाच महिन्यांपासून या दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होत चालली आहे. शाळांमधील छोटी मुले सुद्धा मी ओबीसी तू मराठा असे एकमेकांना बोलून दाखवत आहेत, ही बाब समाजासाठी घातक आहे.
सभा संपल्यानंतर ओबीसी समाजबांधवांच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार संजू राऊत देण्यात आले. हा मोर्चा सुरळीत पार पडण्यासाठी राम बनसोड, संदीप शेरकर, समाधान कुडके, गणेश राऊत, राम हापत, कचरु मैंद यांनी प्रयत्न केले. घोडके यानी आयोजकांचे अभिनंदन केले. यावेळी डीवायएसपी, ०३ पोलीस निरिक्षक, ०६ उपनिरीक्षक, ३० पोलीस कर्मचारी, २० होमगार्ड असे ५९ पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission