वणी :- छ. शिवाजी महाराजांचा चेहरा आणि व्यक्तीमत्व एवढे आश्वासक आणि मोहक होते की राजांची जनताच नव्हे तर त्यांचे शत्रुही त्यांच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित होत. त्यामुळे आग्रा दरबारात शिवाजी महाराजांच्या समोर येण्याचे औरंगजेबाने टाळले होते. असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे सिनेट सदस्य आणि चंद्रपुर जिल्हा संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष प्रा.डॉ. दिलीप चौघरी यांनी केले.
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड चे वतीने दि.१९ फेबृवारी रोजी सायंकाळी शिवतीर्थ वणी येथे आयोजित शिवजयंती उत्सव सोहळ्यानिमीत्य जाहीर सभेत त्यांनी मार्गदर्शन करतांना वरिल विचार व्यक्त केले. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितांना केवळ भौगोलिक प्रदेश पादाक्रांत केला नाही तर जिंकलेल्या प्रदेशात उत्तम प्रशासन व्यवस्था बसविली. उत्तरदायीत्व हा महाराजांचा स्थायी भाव होता. त्यांचे प्रजेवर पोटच्या पोरांसारखे प्रेम होते. ही महाराजांची कमजोरी हेरून शत्रु स्वराज्याच्या रयतेला त्रास देत असत. औरंगजेबाचा सरदार जयसिंगाने याच धोरणाचा अवलंब करून महाराजांना तह करण्यास भाग पाडले. शिवरायांनी स्वराज्याचा अर्धाअधिक मुलूख केवळ रयतेचा त्रास वाचविण्यासाठी सोडुन दिला. आजच्या सत्ताधाऱ्यांनी शिवचरित्रातुन किमान एवढी तरी शिकावे. शेतकऱ्याला चार पैसे देण्याची संधी मिळाली तर सरकार निर्यात बंदी करते. आणि शेतकरी सन्मान योजनेच्या नांवाखाली आवळा देउन कोहळा घेण्याचे धोरण आखत असते. आजच्या सत्ताधाऱ्यांची राजवट पाहीली आणि आजची लोकशाही आणि शिवरायांची राजेशाही याची तुलना केली तर कोणालाही शिवरायांची राजेशाही बरी वाटेल. मानवी मुल्ये आणि नैसर्गिक संसाधनांची लुट पाहीली तर जगाचे भवितव्य अधांतरी आहे. त्यामुळे चारीत्र्यवान तरुणांनी राजकारणात येउन समाजाची जबाबदारी खांद्यावर घ्यावी आणि शिवरायांना अपेक्षित मुल्ये प्रस्थापित करावी. असे आग्रही आवाहन त्यांनी केले.सरकारला ८० कोटी जनतेला मोफत धान्य पुरवावे लागत असेल तर आपल्या विश्वगुरुच्या कल्पना किती काल्पनिक आहे, हे लक्षात येते. तसेच बहुजन समाज ज्या पौष महिन्यात अगदी किरकोळ कार्य करण्याचा विचार करत नाही. त्या महिन्यात देशातील महत्त्वाचा असा राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणे म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुरोहितांनी निर्माण केलेल्या पारंपारीक धार्मिक संकल्पना झुगारल्या असा होतो.सोबतच समाजाने पौष महिन्यात आता शुभ कार्य सुरू करावे. आणि अतार्किक अशा धार्मिक कल्पना सोडुन द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
या जाहीर सभेचे अध्यक्षीय मार्गदर्शन मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर यांनी केले.स्वागतपर मनोगत स्वागताध्यक्ष तथा कापुस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांनी व्यक्त केले. तर प्रास्ताविक भुमिका संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी मांडली. जाहीर सभेच्या पुर्वी मान्यवरांकडून शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.जाहीर सभेच्या प्रारंभी जिजाऊ,शिवरायांना अभिवादन झाले.नामदेव ससाणे,अमोल बावने,सोनाली थेटे,किरण गोडे यांनी सामुहिक जिजाऊ वंदना सादर केली.सोबतच कॉम्रेड शंकरराव दानव आणि शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जिवन पा.कापसे यांना मौन आदरांजली देण्यात आली.याप्रसंगी मराठा सेवा संघाचे वतीने शेतमालाला रास्तभाव,जातनिहाय जनगणना,सरकारी नौकर भरती आणि जुनी पेन्शन योजना या संदर्भाने शासनाला पाठवायच्या निवेदनाचे ठराव मंजुर करण्यात आले.संजय गोडे यांनी या ठरावाचे वाचन केले तर उपस्थितांनी हात उंचावून या ठरावाला संमती दिली.या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे,प्रा.बाळकृष्ण राजुरकर,नामदेव जेनेकर,डॉ.शांताराम ठाकरे,रमेश येरणे,भारती राजपुत,देवराव धांडे, विधीज्ञ विनोद चोपणे,मंगल तेलंग,विजय नगराळे आणि डॉ.अविनाश खापने हे प्रमुख मान्यवर म्हणुन उपस्थित होते.
सुरवातीस श्रीजा धांडे या चिमुकलीने सादर केलेली शिवगर्जना आणि सुरभी कुचनकर,धृव नीखाडे,स्वामिनी कुचनकर,सुषमा डाहुले यांनी शिवचरित्रावर सादर केलेले संक्षिप्त सादरीकरण लक्षणीय ठरले. या वेळी दशरात्रौत्सवात संपन्न झालेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण क्रां.सावित्रीबाई फुले वाचनालयाचे वतीने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संभाजी ब्रिगेडचे दत्ता डोहे आणि आशिष रिंगोले यांनी केले.तर उपस्थितांचे आभार मराठा सेवा संघाचे नितीन मोवाडे यांनी मानले.यशस्वितेकरिता भाऊसाहेब आसुटकार,सुरेंद्र घागे,विधीज्ञ अमोल टोंगे,वसंत थेटे,मारोती जिवतोडे आदींनी प्रामुख्याने परिश्रम घेतले. कार्यक्रमाला वणीकर जनतेची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar, Bahujan