वणी : संविधानानुसार देश चालविणाऱ्या व ओबीसींची जातनिहाय जनगणना करणाऱ्या पक्षालाच ओबीसींनी मतदान करावे, असे आवाहन प्रा. डॉ. लक्ष्मण यादव (दिल्ली) यांनी वणी येथे आयोजित ओबीसी एल्गार मोर्चात केले. रविवारी ११ फेब्रुवारीला वणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ओबीसी (व्हीजे, एनटी, एसबीसी ) जातनिहाय जनगणना कृती समिती वणी झरी मारेगावच्या वतीने एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. एल्गार मोर्चाच्या समारोपीय सभेत ते बोलत होते. कोण संविधान मानतो व कोण संविधानाच्या विरोधात आहे, हे ओबीसींनी ओळखावे व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत संविधानाला मानणाऱ्या पक्षालाच मतदान करावे, असेही ते यावेळी म्हणाले.
वणीतील शासकीय मैदानातून एल्गार मोर्चाला प्रारंभ झाल्यानंतर मोर्चा मार्गक्रमण करीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला पुन्हा प्रारंभ झाला.
वणी शहरातील मुख्य मार्गावरून चालत हा मोर्चा लोकमान्य टिळक चौकात दाखल झाला आणि पुढे जाऊन पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानात मोर्चाची सांगता झाली. ज्या-ज्या चौकातून एल्गार मोर्चा गेला, त्या प्रत्येक ठिकाणी विविध महापुरुषांना हार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. त्यांनतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. सभास्थळी मोर्चा पोहोचल्यानंतर सभेला सुरुवात झाली. संचालन प्रदीप बोरकुटे यांनी केले, तर प्रास्ताविक मोहन हरडे यांनी केले. उपस्थितांचे आभार रवींद्र आंबटकर यांनी मानले. विचारपीठावर अध्यक्षस्थानी प्रदीप बोनगीरवार होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. लक्ष्मण यादव, प्रा. अनिल डहाके, उमेश कोरराम, अँड. पुरुषोत्तम सातपुते, आशिष साबरे, बाबाराव ढवस उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Mandal commission