Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

बौद्ध धर्माचा उदय आणि र्‍हास

लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

( खाटमांडूची जागतिक बौद्ध परिषद आटपून परत येतांना बनारस हिंदू विश्वविद्यालयात विद्यार्थिवर्गासमोर व आचार्यगणांसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उपरोक्त विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दि. २५-११-१९५६ च्या सकाळी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात बाबासाहेबांनी अत्यंत विद्वत्तापूर्ण विवेचन केले होते. तेच हे व्याख्यान - ) 

     बौद्ध धर्माच्या उत्पत्तीसंबंधी लोकात पुष्कळच अज्ञान दृष्टीस पडते. प्राचीन भारताचा त्रयस्थपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बुद्धपूर्वकालात दोन संघर्ष आढळतात. पहिला संघर्ष आर्य व नाग लोकात आणि दुसरा ब्राह्मण व क्षत्रियात.

     सध्या हिंदू म्हणून ओळखले जाणारे पुष्कळसे लोक नागवंशीय आहेत. ज्या नाग लोकांनी आर्यांपूर्वी भारतात वस्ती केली होती ते आर्यापेक्षा अधिक सुसंस्कृत होते. त्यांना आर्यांनी जिंकले, परंतु एवढ्यावरून आर्यांची संस्कृती नाग लोकांच्या संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ ठरत नाही. आर्याच्या विजयाचे कारण म्हणजे त्यांचे वाहन, आर्य घोड्यावर स्वार होऊन लढत तर नाग लोक पायदळी लढत. आर्य-नागांमधील लढा प्राणपणाने लढला गेला. महाभारतातील खांडववन व सर्पसत्र या कथांवरील कल्पनेचे परिवेष्टण दूर केले तर या आर्य नाग युद्धाचे भयानक स्वरूप आपल्या दृष्टीस पडते. आर्यांनी खांडववन दहनासारखी म्हणजे Scorched Earth Policy ची कृत्ये करून नागाची ससेहोलपट चालवविली. या विध्वंसातून अगस्ती ऋषीने एका नागाला वाचविले अशी एक कथा आहे. कथेत अतिशयोक्ती असली तरी नागांच्या वसाहती संपूर्ण नष्ट करण्यासाठी आर्य कसे झगडत होते हे त्यावरून दिसून येते. पराभवामुळे नागांच्या मनात आर्यांविषयी द्वेष वसत होता. परीक्षित राजाचा प्राण घेणारा तक्षक हा कोणी सर्प नसून एक नागवंशीय पुढारी होता. आर्य लोकांच्या मनात नागांसंबंधी वसत असलेल्या द्वेषाचे उदाहरण म्हणून कर्ण व अनंत ह्यांचे संभाषण सांगता येईल. कर्णार्जुन युद्धापूर्वी अनंत हा नागवंशीय योद्धा कर्णाला भेटला आणि आपण अर्जुनाविरूद्ध सहाय्य करू असे आश्वासन देऊ लागला. कर्णाने ते देऊ केलेले सहाय्य नाकारले. कारण कर्ण आर्य होता आणि अनंत हा नाग होता. आर्यांनी आपापसातील युद्धासाठी नागांचे सहाय्य घेणे निषिद्ध होते.

Rise and fall of Buddhism Written by dr babasaheb ambedkar     बौद्धपूर्व काळातील दुसऱ्या संघर्षाचे स्वरूप ब्राह्मण क्षत्रियातील संघर्ष होय. या लढ्याची वर्णने पुढे पुराणातून आलेली आहेत. त्याचप्रमाणे मनूने आपल्या स्मृतीत क्षत्रियांनी ब्राह्मणांना आदराने का वागविले पाहिजे याची कारणे देताना पूर्वकालीन ब्राह्मण क्षत्रियांच्या संग्रामाचा उल्लेख केला आहे.

     आर्य व नाग किंवा ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यामधील संघर्ष चालू असताना ब्राह्मणांनी ऋग्वेदात पुरूषसूक्ताचा अंतर्भाव केला असावा. पुरूषसूक्तापूर्वी चातुर्वर्ण्यातील चारही वर्ण एकाच समान पातळीवर होते. पुरूषसूक्ताने उच्चनीचतेचे तत्व प्रथमतः भारतीय समाजात आणले. ब्राह्मणक्षत्रियाच्या संघर्षाच्या काळात भगवान बुद्धांने भारतीय जीवनात प्रवेश केला ज्या शाक्य कुळात गौतमाचा जन्म झाला होता त्या शाक्यांचे गणराज्य लोक-शाहीप्रधान होते. ह्या लोकशाहीच्या परंपरेत वाढलेल्या गीतमास चातुर्वर्ण्य अमान्य होते. सध्याच्या स्वरूपातील बौद्ध धर्म हा एक नानाविध सिद्धान्तांचा महासागरच झाला आहे. परंतु बौद्ध धर्माचा मध्यवर्ती सिद्धान्त अथवा बुद्धमत हे समतेवरच आधारलेले आहे. बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे लोक बहुअंशी नागवंशीय आणि चातुर्वर्ण्यात हीन समजले जाणाऱ्या वर्गापैकी होते. नागांची बुद्धप्रीती मुचलिंद नागाच्या कथेवरून सिद्ध होते. मुचलिंदाचे अग्निहोत्री काश्यपाशी वैर होते. परंतु कश्यपाकडे आतिथ्यसाठी आलेल्या बुद्धाचा तो एक सेवक बनला. बौद्ध धर्माच्या अभिवृद्धीचे कारण शूद्रांनी बौद्ध धर्माचा बहुसंख्येने केलेला स्वीकार. बौद्ध वाङ्मयातील विशेषतः थेर व थेरीगाथेच्या आधारे हे सिद्ध करता येईल.

     बौद्धधर्म ही एक हिंदुधर्माचीच शाखा आहे. अशा मताचा प्रचार अलीकडे फारच बोकाळला आहे. वस्तुतः बौद्धप्रणित धर्म वैदिकधर्माच्या समकालीन होता. तो वैदिक अथवा ब्राह्मणीधर्माहून अतिशय भिन्न होता. वैदिक लोक वेदग्रंथांना प्रमाण मानीत, तर बुद्धाचा वेदांनाच विरोध होता. कालामसूत्तामध्ये बुद्धाने माणसाला विचार स्वातंत्र असले पाहिजे आणि वेदांनी माणसासाठी सदासर्वकाळ टिकणारा विचार करून ठेवला नाही असे प्रतिपादले आहे. बुद्धांच्या वेदप्रामाण्यावरील आघाताचा पुढील काळातील हिंदूंच्या भगवद्गीतेसारख्या ग्रंथावरही परिणाम झाला आहे. वेदपाठकांची गीतेने एके ठिकाणी बेडूक म्हणून संभावना केली आहे. बुद्धाने वेदांना वाळवंट म्हटले आहे. वेदांमध्ये प्राधान्याने इंद्रादि देवतांना उमदे घोडे, तेजस्वी शस्त्रास्त्रे, शत्रूवर विजय इत्यादी ऐहिक सुखोपभोगासाठी केलेल्या प्रार्थना आहेत. त्यात उदात्त नीतितत्त्वांची शिकवण नाही, म्हणून बुद्धाने त्याचा धिक्कार केला.

     बुद्धांचा समकालीन धर्मावर दुसरा आधात म्हणजे यज्ञसंस्थेवरील गाई-बैलांचे बळी देऊन तुम्हाला कोणते उच्च श्रेय लाभणार आहे असा त्याचा यज्ञिकांना प्रश्न असे, यज्ञसंस्थेवरील बुद्धांच्या टीकेमुळे हिंदूंना इंद्रवरूणादी आद्य देवतांचा त्याग करावा लागला. थोडेसे विषयांतर करून तुम्हास मी हे विचारतो की, हिंदुधर्मात ईश्वराची देवाची कल्पना तरी काय आहे? काशीतील तुमचा पूजनीय महादेव देव मानावा तर त्याचे लग्नही होते व तो आपल्या बायकोबरोबर नाचतोही! ब्रह्माविष्णूचीही तीच कथा. यांना काय देव म्हणायचे? सामान्य माणसाला सुद्धा आज लाज वाटेल अशी दृष्कृत्ये त्यांच्या हातून घडल्याचे तुमची पुराणेच सांगतात. असा एकतरी देव दाखवा की ज्याचे निश्कलंक चारित्र्य आजच्या माणसाला आदर्शवत व अनुकरणीय वाटेल. हिंदूंचे देव म्हणजे राजांची कुलदैवते, त्यांचे पराक्रम म्हणजे राजांचे पौरोहित्य मिळविण्यासाठी ब्राह्मणांनी रचलेली त्यांच्या देवतांच्या खुशामतीची पुराणे! इंद्र, कृष्ण हे काय देव? ऋग्वेदाच्या शेवटच्या भागात इंद्रपत्नीने इंद्रास मोजलेल्या शिव्या वाचून पाहा! दुर्योधन संपूर्ण वज्रदेही होऊ नये व गदायुद्धात भीमास यश मिळावे म्हणून कृष्णाने योजलेले कपटनाटक पाहा! तुमचा शेजारी असे तुमच्याशी वागू लागला तर तुम्ही त्याला काय म्हणाल ? असो. बुद्धांने पशुहत्येची निर्भर्त्सना केली आणि यज्ञाचे वैफल्य जनतेस पटवून दिले म्हणूनच ब्राह्मणांना आपले प्राचीन याज्ञिक आचार सोडावे लागले.

     आश्रमव्यवस्थे संबंधीही बुद्धांचे मत प्रचलित वैदिक धर्मापेक्षा वेगळे होते. ब्राह्मणाच्या मते ब्रह्मचर्य आश्रमानंतर गृहस्थाश्रम स्वीकारणे आवश्यक होते. बुद्धांच्या मते ब्रह्मचर्यानंतर परिव्रज्या स्विकारण्यास प्रत्यवाय नव्हता, ब्रह्मचर्यांचा मूळचा अर्थ ज्ञानार्जनाची अवस्था; अविवाहित अवस्था हा त्यास नंतर चिकटविलेला अर्थ आहे. ब्राह्मणांनी गृहस्थाश्रमाचा काळ वाढविण्यासाठी त्याला वानप्रस्थाश्रम जोडला. ब्रह्मचर्यानंतर संन्यास (परिव्रज्या) स्वीकारण्यास ब्राह्मणाची हरकत होती. अकराशे वर्षांनी कुमारिल भट्टाने बुद्धांवर घेतलेल्या आक्षेपात बुद्धांच्या परिव्रज्जेच्या स्वातंत्र्यावर भर दिलेला आहे. 

     बुद्धांचा वैदिकधर्माशी चौथा विरोध चातुर्वर्ण्याबाबत होता. त्याचे शिष्य-कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या सर्व जातीतील होते. आपल्या शिष्यांत उच्चनीचतेच्या भावनेला जागा राहू नये या बाबतीत तो अत्यंत दक्षता बाळगीत असे, आपल्या चुलत भावांना आपल्या क्षत्रियत्वाचा अभिमान वाटू नये म्हणून त्यांच्या समवेत आलेल्या न्हावी असलेल्या उपालीस प्रथम दीक्षा दिली, ज्याची दीक्षा प्रथम तो त्यानंतर दीक्षा घेणाऱ्यास वंद्य समजला जाई, म्हणून क्षत्रिय शाक्यांना उपाली ह्या त्यांच्या पर्वाश्रमीच्या नापित सेवकास अभिवादन करावे लागे. आपल्या जीवनाच्या शेवटच्या दिवसात चुंद या हीन जातीच्या समजला जाणाऱ्या लोहाराच्या घरचे अन्न, प्रकृतीस अनिष्ट आहे असे समजूनही बुद्धांने ग्रहण केले आणि सामाजिक समतेसाठी स्वप्राणाचे मोल दिले, असे चातुर्वर्ण्यविरोधी प्रसंग बुद्धाच्या जीवनात अनेक दाखविता येतील. तो आपल्या संघाला सागराची उपमा देई. ज्याप्रमाणे सागरात मिळाल्यावर नदीची पृथगात्मता, अलिप्तता राहत नाही आणि सर्व पाणी एकरूप होते, त्याप्रमाणेच संघात येणाऱ्या भिन्नवर्णीय भिक्खूचे वर्ण वैशिष्ट्य नष्ट होते. जैनमतालाही चातुर्वर्ण्य निषिद्ध होते, परंतु त्या मुद्यावर भांडण करायला किंवा विरोध करायला ते सिद्ध नव्हते. बुद्ध मात्र आपल्या मुद्याबाबत गुळमुळीत मौन कधीच धारण करीत नसे. आपल्या धर्माचे आपण वीर आहोत आणि त्याच्या स्थापनेसाठी आपणाला अज्ञानाशी झगडावे हे लागणारच असे त्याचे मत होते. बुद्धांची ही चातुर्वर्ण्यविरोधी तीव्रता ब्राह्मणांच्या मनात सदैव डाचत राहिली. म्हणूनच चातुर्वर्ण्याविषयी मूक असलेल्या निरीश्वरवादी सांख्याचा कपिल मुनीस त्यांनी आपले म्हटले, बुद्धाशी सदैव वैर मांडले.

     बुद्धांच्या वैदिक धर्माला पाचवा विरोध देव आणि आत्मा यांच्या अस्तित्वाबाबतचा होता. बुद्धांच्या मते सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापी, न्यायी आणि प्रेममय अशा देवाचे अस्तित्व ज्ञानाची साधने जी पंचेन्द्रिये आणि तर्क यांच्या सहाय्याने सिद्ध करता येत नाही. शिवाय धर्माचा उद्देश दुःखपरिहार असा आहे. देव मानल्याने दुःख कमी होत नाही. माणसाने दुसऱ्या माणसाशी कसे वागावे म्हणजे सर्व माणसे सुखी होतील, हे शिकविणे हे धर्माचे मुख्य कार्य आहे. म्हणून धम्माचा देवाशी संबंध येत नाही देवाचे अस्तित्व केवळ पोकळ तर्कावर Speculation आधारलेले आहे. आणि या अस्तित्वाच्या पोकळ श्रद्धेतून पूजा, प्रार्थना, पुरोहित, इत्यादी अष्टांग मार्गातील समादिठ्ठीला घातक अशा खुळ्या समजुतीचे Speculation आधारलेले आहे. आणि या अस्तित्वाच्या पोकळ श्रद्धेतून पूजा, प्रार्थना, पुरोहित, इत्यादी अष्टांग मार्गातील समादिठ्ठीला घातक अशा खुळ्या समजुतीचे Superstition पेच फुटते. माणसाचे परस्पर संबंध प्रज्ञा-शील-करूणा व मैत्री यांनी नियंत्रित होण्याऐवजी पावित्र्य, उच्चनीचता अशासारख्या भ्रामक समजुतींनी नियंत्रित होतात. देवाच्या अस्तित्वावरील बुद्धांचे आक्षेप केवळ व्यावहारिक दृष्टिचेच होते असे नाही. 'पतिच्च समुत्पाद' या त्यांच्या सिद्धान्तात देवाच्या अस्तित्वावर सर्वसामान्य तार्किक स्वरूपाचे आक्षेप घेतलेले आहेत. या सिद्धान्ताप्रमाणे विश्व देवाने निर्मिले की नाही हाही मुख्य प्रश्न नाही. मुख्य प्रश्न असा आहे की, देवाने जग कसे निर्माण केले? देवाच्या अस्तित्वाचे मंडन किंवा खंडन या प्रश्नाच्या उत्तराने होईल या दृष्टीने महत्वाचा प्रश्न असा की, देवाने हे जग अभावातून निर्मिले की पूर्वी अस्तित्वात असलेल्या कशातून तरी निर्मिले? काहीच नव्हते यातून काहीतरी निर्मिले या गोष्टीवर माणसाच्या बुद्धीला विश्वास ठेवता येत नाही. जर या तथाकथित देवाने हे जग जर पूर्वी काहीतरी असलेल्यातून निर्मिले असेल तर देवाला आद्यनिर्माता किंवा आदिकारण म्हणता येणार नाही. एकंदरीत कारण किंवा अस्तित्वासंबंधीची विचारसरणी तर्कदृष्ट असल्यामुळे देवावरील श्रद्धा बुद्धांच्या समादिठ्ठी प्रधान धम्माला अमान्य आहे.

     वेदान्तातील मोक्ष सिद्धान्त म्हणजे आत्म्याने ब्रह्मात विलीन होणे. यालाही तर्कदृष्ट ठरवून आणि मानवी जीवन सुखी करण्याच्या दृष्टीने निरूपयोगी म्हणून बुद्धांने विरोध केला आहे. ब्रह्मविषयक बुद्धांची विचारसरणी त्याच्या विशिष्ट व भारद्वाज या दोन ब्राह्मणांशी झालेल्या संवादात व्यक्त झाली आहे. बुद्धांचे आत्म्याच्या अस्तित्वावरील व्यावहारिक दृष्टीने आक्षेप त्याच्या देवाच्या कल्पनेवरील आक्षेपासारखे आहेत, शिवाय तो आत्म्याचे म्हणून समजले जाणारे व्यापार नामरूप या सिद्धान्ताच्या आधारे स्पष्ट करून दाखवितो. कायेच्या उत्पत्तीबरोबरच जाणिवेचा Consciousness प्रारंभ होतो. इच्छात्मक, भावनात्मक आणि विचारात्मक कार्ये ही जाणिवेचीच आहेत, तेव्हा आत्मा हे वेगळे तत्व गृहीत धरण्याची आवश्यकता उरत नाही.

     अशा रीतीने वैदिकधर्माशी विरोध असणाऱ्या बौद्धधर्माचा पाडाव करण्यासाठी ब्राह्मणांनी भल्याबुऱ्या सर्वप्रकारच्या साधनांचा उपयोग केला. बौद्ध धर्म ज्या गोष्टीमुळे लोकप्रिय झाला त्या गोष्टी आपल्या पूर्वापार धर्मास संमत नसल्या तरी त्यांचा त्यांनी उपयोग केला. या प्रचारपद्धतीस अनुसरूनच वेरूळच्या बौद्ध लेण्याजवळ त्यांनी आपल्या ब्राह्मी लेणी कोरल्या. वस्तुतः ब्राह्मण हा गृहस्थाश्रमी अग्निहोत्र हे त्याचे नित्यव्रत. त्याला परिब्राजित भिक्खूसारखे गुहेत राहण्याचे कारण नव्हते. भिक्खूना पावसाळ्याच्या तीन महिन्यांत कुठेतरी निवाऱ्याच्या जागी वास करण्याचा बुद्धांचा आदेश होता. त्यामुळे त्यांना लेण्याची आवश्यकता होती. गृहस्थाश्रमी ब्राह्मणाला ती तशी नव्हती. परंतु बौद्ध लेण्यांकडे उपासकांचा मोठा मेळावा आकृष्ट होतो म्हणूनच केवळ त्यांच्या लेण्यांच्या बाजूला आपली लेणी कोरून आपल्या धर्माकडे उपासक ओढून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 

     बौद्ध धर्माच्या र्‍हास मुख्य कारण म्हणजे हिंदू पंडित सांगतात त्याप्रमाणे कुमारिल भट्टाने किंवा शंकराचार्य इत्यादिनी बुद्धमतांचा वाग्युद्धात केलेला पराभव हे नव्हे! कारण दोघांनीही बुद्धांच्या शिकवणुकीचे मध्यवर्ती सिद्धान्त की जे सामाजिक समता, जगातील दुःख-परिहारासाठी प्रत्येक व्यक्तीचे मतपरिवर्तन, नीतितत्त्वांची सामाजिक जीवनातील प्रतिष्ठापना, बुद्धवाद इत्यादी होते त्यावर या हिंदू पंडितांनी मुळीच आघात केलेला नाही. या दोघाही पंडितानंतर बौद्ध धर्म भारतात कित्येक वर्षे समृद्धावस्थेत होता. बौद्ध धर्माच्या -हासाचे मुख्य कारण म्हणजे ज्या भिन्न संस्कृतीच्या व भिन्न सांस्कृतीक पातळीच्या लोकांमध्ये त्याचा प्रचार झाला, त्यांच्या आचारांची व समजुतीची बौद्ध धर्मावार झालेली अनुचित प्रतिक्रिया भारतातील बौद्ध धर्मावर झालेला सर्वात मोठा आघात म्हणजे इस्लामी आक्रमणाचा. भारताकड़े वळताना मुसलमान आक्रमकांना जे परधर्मी लोक भेटले ते बौद्ध धर्मीयच होते. त्यांच्या भाषेत मूर्तीला 'बुत्' असे म्हणत. 'बुतशिकन' म्हणजे मूर्तिभंजन करणे. जिथे जिथे बुद्धांच्या मूर्ती त्यांना आढळल्या त्यांचा त्यांनी नायनाट करण्याचे धोरण स्वीकारले, हे त्यांचा त्यांच्या गाझीपणाचेच लक्षण • होते. हिंदूंपेक्षा बौद्धांवर चढविलेले हल्ले अधिक हिंस्त्र व विध्वंसक स्वरूपाचे होते. त्यांनी केलेल्या बौद्ध भिक्खूच्या कत्तलीने अकरा ते तेराव्या शतकापर्यंतची इतिहासाची पाने रक्ताने रंगलेली आहेत. नालंदासारख्या जगतविख्यात बौद्ध विद्यापीठाचा त्यांनी पूर्ण नाश केला. हिंदूप्रमाणे बौद्धांमध्ये धर्मप्रचाराचे पिढीजात काम करणारा ब्राह्मणासारखा वर्ग नसल्याने भिक्खूच्या कत्तलीनंतर बौद्ध धर्माचा झपाट्याने व्हास होऊ लागला. सत्याचाही कधी कधी पराभव होतो ह्याचे हे एक उदाहरण आहे. आज त्यानंतर सहाशे वर्षांनी भारताला बुद्धांची आठवण होत आहे. आज जर भारताने बुद्धांच्या विचारसरणीचा स्वीकार केला नाही तर त्याचे भवितव्य काही ठीक नाही !

(प्रबुद्ध भारत दि. २४-८-१९५७)


1

Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209