नागपूर : ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या तिरुपती येथे ७ ऑगस्टला होणाऱ्या आठव्या अधिवेशनात ओबीसी समाजबांधव व भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केले. तिरुपती येथील अधिवेशनाच्या तयारीसंदर्भात धनवटे नॅशनल कॉलेज येथे रविवारी (ता. ९) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला डॉ. तायवाडे यांच्यासह महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, कोषाध्यक्ष गुनेश्वर आरीकर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, महिला शहर अध्यक्ष वृंदा ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. डॉ. तायवाडे यांनी अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या विविध विषयांची माहिती यावेळी दिली. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, क्रिमिलेअरची अट रद्द करावी, अट रद्द होईपर्यंत क्रिमिलेअरची मर्यादा २० लाख रुपये करावी, मंडल व स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बहाल करावा, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण लागू करावे, ओबीसी, विजा, भज व विशेष मागास प्रवर्ग समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करावीत, स्वाधार व वसतिगृह निर्वाह भत्ता योजना लागू करावी, ओबीसी प्रवर्गाचा अॅट्रॉसिटी कायद्यात समावेश करावा, यासह अन्यही मागण्या मंजूर करून घेण्यासाठी तिरुपती येथील अधिवेशनात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. तायवाडे यांनी केले. बैठकीला प्रकाश साबळे, कल्पना मानकर, शकील पटेल, ऋषभ राऊत, राजू चौधरी, पराग वानखेडे, शुभम वाघमारे, रुचिका डफ, विनोद हजारे, महासंघाचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी, महाराष्ट्र कार्यकारिणी, विदर्भ कार्यकारिणी, सर्व जिल्हाध्यक्ष व बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. संचालन शरद वानखेडे यांनी केले. आभार परमेश्वर राऊत यांनी मानले.