कुडाळ : 'जो ओबीसी की बात करेगा, वही देश पर राज करेगा' असे म्हणत ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे यांनी जातीपातीमध्ये न विभागता ओबीसी म्हणून एकत्र यावे. आपल्या न्याय हक्कासाठी जर एकत्र आलो तर कोणताही राजकीय पक्ष आपल्या मागण्या मान्य करणार नाही असे होणार नाही, असे त्यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी महासंघ व आरक्षित महासंघाच्या वतीने जिल्ह्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर, प्रदेशाध्यक्ष प्रकाश भागरत, विश्वनाथ राऊत, कोकण विभागीय अध्यक्ष एकनाथ तारमाळे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री, जिल्हा प्रतिनिधी काका कुडाळकर, सुनील भोगटे, नंदन वेंगुर्लेकर, महेश परूळेकर तसेच विविध समाजाच्या संघटनांचे जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. तायवाडे यांनी सांगितले की, रत्नागिरी दापोली येथे महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर कुडाळ येथे बैठक घेण्यात आली. देशात ६० टक्के ओबीसी आहेत. मात्र, संविधानानुसार ज्या सोयी, सवलती समाजाला दिल्या पाहिजे होत्या त्या गेल्या ७० वर्षांत दिल्या गेल्या नाहीत. म्हणून संविधानिक मागण्या, न्याय व हक्क मिळविण्यासाठी हा महासंघ स्थापन केला आहे. सर्व मागण्या सरकारकडे सातत्याने मांडत आलो व ओबीसींच्या कल्याणासाठी शासनामार्फत ३३ शासन निर्णय काढण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षण मोफत मिळत आहे. नवोदय, सैनिक स्कूल अशा शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण, देशात ६० टक्के ओबीसी आहेत; मात्र अनेक प्रश्न, समस्या आहेत.
आरक्षण देण्यात यावे
■ देशात ६० टक्के असणाऱ्या ओबीसींकरिता जातनिहाय आरक्षण लोकसभा, विधानसभेत मिळावे. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्येही आरक्षण देण्यात यावे.
■ केंद्रात ओबीसी मंत्रालय नाही ते सुरु करावे. शेतकरी, शेतमजूर यांना वयाच्या ६० वर्षांनंतर पेन्शन द्यावी.
■ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना अजूनही भारतरत्न दिला नाही ही शोकांतिका आहे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan