विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, दि. २८ रोजी कोल्हापुरात येणार आहेत. त्यावेळी ओबीसींची जातवार जनगणना करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्याचा निर्णय ओबीसी जनमोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरचिटणीस दिगंबर लोहार होते.
येथील मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानुसार जातवार जनगणना करावी, महाज्योतीचे विभागीय कार्यालय कोल्हापुरात व्हावे, ओबीसी विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मिळावा, तसेच ओबीसी विद्याथ्यांना शिष्यवृत्तीमध्ये वाढ करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्रातील ओबीसींची जातवार जनगणना सर्वेक्षण करण्यासाठी ४३५ कोटींचा निधी मागासवर्ग आयोगास तातडीने द्या, ओबीसींच्या प्रगतीची महाज्योती संस्थेचे विभागीय कार्यालय तातडीने कोल्हापूरला सुरू करावे, उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता प्रतिवर्षी ६० हजार रुपये द्यावा, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हावार वसतिगृहे तातडीने सुरू करावीत, बीबीए, बीसीएस या कोर्सेसना शिष्यवृत्ती सुरू करा, ओबीसी वित्त आणि विकास महामंडळास तातडीने १ हजार कोटी निधी द्या, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुणबी जातीचे दाखले देणे बंद करा, यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्वागत व प्रास्तविक शिवाजीराव माळकर यांनी केले. सवाजी झुंजार, एम. आर. मोमीन, शीतल मंडपे, मोहन हजारे, जहांगीर अत्तार यांची भाषणे झाली. बैठकीस किशोर लिमकर, संजय काटकर, पडित परीट, विजय परीट, चंद्रकांत कोवळे, अनिष पोतदार, गजानन भुर्के, दिलीप गेली, सुनील सावर्डेकर, सुधाकर भाट आदी ओबीसी बांधव उपस्थित होते. बबनराव रानगे यांनी आभार मानले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan