ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत. संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम
पुणे, दि. १० - 'दलित पँथरसारखी चळवळ पुन्हा उभी राहणे गरजेचे आहे,' असे मत मत ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
दलित समाजात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव सोहळा संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री रमेश बागवे, राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, अविचल धिवार, रुग्ण हक्क परिषदेचे उमेश चव्हाण आदी उपस्थित होते.
'पँथरचा तो काळ आठवला की आज ही अंगावर शहारे उभे रहातात. कोठेही अन्याय अत्याचार झाले की त्याला न्याय देण्याचे आणि वाचा फोडण्याचे काम पँथर करायची. पँथरचा तो झंझावात म्हणजे एक क्रांतीचे पर्व होते. त्यांचा आदर्श घेऊन आज गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या राज्यात चळवळी आणि नेतृत्व तयार होत आहे. पण, ज्या महाराष्ट्राने पँथर निर्माण केली तिथे आज पुन्हा पँथर निर्माण व्हावी, ही गरज निर्माण झाली आहे.
त्याचा आज सर्वांनी विचार करावा,' असे आवाहन देशमुख यांनी यावेळी केले. 'दलित पँथरने आम्हाला जीवन जगण्याचा अधिकार दिला. स्वाभिमानाने जगायला शिकवले फुले, शाहू, आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांचे विचार शिकवले. आजचा दलित तरुण भरकटत आहे. राजकीय, सामाजिक वाटचाल करताना आज दलित पँथरचा आदर्श सर्वांनी अंगिकारला पाहिजे. तरच समाजाचा विकास होईल,' असे बागवे म्हणाले.
Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Periyar, Bahujan