नाशिक : शहरात होऊ घातलेल्या १५व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे सोमवारी (दि. २२) मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. मविप्र संचलित केटीएचएम महाविद्यालयात संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे यांच्या हस्ते बोधचिन्हाचे प्रकाशन करण्यात आले. औरंगाबाद येथील चित्रकार राजानंद सुरडकर यांनी हे बोधचिन्ह तयार केले आहे.
यावेळी बोलताना नीलिमा पवार म्हणाल्या, मराठा विद्या प्रसारक संस्थेला छत्रपती शाहू महाराजांनी भेट दिली होती. या भेटीला एकशे एक वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर महात्मा फुले,छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सत्यशोधक चळवळीच्या विचाराचे हे संविधान सन्मानार्थ १५वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारात होत असल्याचा आनंद आहे. संमेलनासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देत संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन पवार यांनी केले. स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे, मनीष बस्ते यांनी आपले मत मांडले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. व्ही.बी. गायकवाड, शिक्षणाधिकारी डॉ. डी.डी. काजळे, किशोर ढमाले, गणेश उन्हवणे, गुलाम शेख, कार्याध्यक्ष प्रभाकर धात्रक, साराभाई वेळूजकर, व्ही. टी. जाधव, प्रल्हाद मिस्त्री, चंद्रकांत भालेराव उपस्थित होते. सूत्रसंचालन राजू देसले तर आभार नारायण पाटील यांनी मानले.
साहित्य संमेलन प्रतिक्रिया वादी नाही. हाच खरा मूळ प्रवाह आहे. क्रांतिसूर्य जोतिबा फुले, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज या सूर्यकुळांनी या मूळ प्रवाहाला उजागर केले. म्हणून या बोधचिन्हात प्रतीकात्मक सूर्य दाखवला आहे. लेखणीतून प्रबुद्ध पिपळपान उगवले आहे. महाकवी वामनदादा कईक, आंबेडकरी साहित्याचे भाष्यकार बाबूराव बागुल यांचे पिपळपान प्रतीक आहे. आदिवासी उलगुलानसाठी एक महिला नगारा वाजवत आहे. नांगर आहे आणि या नांगराने गुलामीच्या बेड्या तोडून टाकल्या आहेत. शेतकरी आंदोलन व साहित्य याचे ते प्रतीक असल्याचे किशोर ढमाले यांनी सांगितले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan