अमरावती, मे २०२५: बहुजन समाजाच्या महामाता आणि त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या परिनिर्वाण दिनानिमित्त अमरावती येथील भीम टेकडीवर २७ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ ते १० या वेळेत एक भव्य आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. रमाई ब्रिगेड, जीवन विकास फाउंडेशन आणि दैनिक वृत्त राजवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ५,००० भीम सैनिक, बौद्ध उपासक, मुले आणि बहुजन समाजातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यात महाराष्ट्राचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि सप्तखंजरी वादक डॉ. रामपाल महाराज धारकर यांच्या शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचाही समावेश आहे. या कार्यक्रमात सर्वांनी पांढरे वस्त्र परिधान करून आणि हातात मेणबत्ती घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अमरावती मराठी पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत आयोजक राजेंद्र उर्फ राजसाहेब वाटाणे यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशस्वी जीवनामागे माता रमाई यांच्या त्याग आणि समर्पणाचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी स्वतःच्या कष्टमय जीवनातून बाबासाहेबांना आधार दिला, ज्यामुळे ते विश्वाच्या शिखरावर पोहोचले. माता रमाई यांनी बहुजन समाजाला आकाश ठेंगण्याची प्रेरणा दिली आणि त्यांच्या या योगदानामुळे आज बहुजन समाज सूर्यासारखा तेजोमय झाला आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, माता रमाई यांचे योगदान समाज विसरला होता, परंतु गेल्या १४ वर्षांपासून ७ फेब्रुवारी रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त अमरावतीत भव्य उत्सव आयोजित केला जात आहे. हा उत्सव आता देशभरात वैचारिक पातळीवर साजरा होतो, ज्याचे बीज अमरावतीत रोवले गेले. याचे श्रेय राजसाहेब वाटाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जाते, परंतु आयोजकांचे म्हणणे आहे की, त्यांना याचे श्रेय नको, तर माता रमाई यांच्या कार्याला मानवंदना देण्याचा हा प्रयत्न आहे.
राजसाहेब वाटाणे यांनी पुढे नमूद केले की, ६ डिसेंबर रोजी संपूर्ण देशात आणि जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र, माता रमाई यांचा परिनिर्वाण दिन त्याचप्रमाणे साजरा होत नाही. ही बाब लक्षात घेऊन, त्यांच्या त्याग आणि समर्पणाला मानवंदना देण्यासाठी २७ मे २०२५ रोजी हा भव्य आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या सोहळ्यात खासदार, आमदार आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. माता रमाई यांनी बाबासाहेबांना त्यांच्या अंतिम श्वासापर्यंत साथ दिली आणि त्यांच्या त्यागामुळे बहुजन समाजाला स्वाभिमान आणि प्रगतीचा मार्ग मिळाला. या कार्यक्रमात माता रमाई यांच्या या अमूल्य योगदानाला सलाम करण्याचा उद्देश आहे.
पत्रकार परिषदेत आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते राजेंद्र उर्फ राजसाहेब वाटाणे, सांध्य दैनिक मतदार राजचे व्यवस्थापकीय संपादक विजय गायकवाड, प्रा. काशिनाथ बनसोड, व्ही.एम. वानखडे, प्रमोद गुरुदेवकर, स्वराज वासनकर, स्वराज दांडगे, मीना सचिन पंचभाई, अजय शृंगारे, शिवम मेश्राम आणि खंडारे साहेब उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे माता रमाई यांच्या कार्याला व्यापक स्तरावर मान्यता मिळेल आणि बहुजन समाजात त्यांच्या प्रेरणादायी योगदानाचा संदेश पसरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar, Bahujan