आंबेडकरी साहित्याचा नवा दृष्टिकोन: प्रा. रणजित मेश्राम यांचे ‘आंबेडकर कशासाठी ?’ यावर भर

       नागपूर, २०२५: आंबेडकरी चळवळीच्या साहित्याने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कशासाठी?’ या प्रश्नाला केंद्रस्थानी ठेवून पुढे जावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि आंबेडकरी भाष्यकार प्रा. रणजित मेश्राम यांनी केले. नागपूर येथील हिंदी मोर भवनातील मधुरम सभागृहात आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचर संस्थेतर्फे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना ते बोलत होते. खचाखच भरलेल्या सभागृहात उपस्थितांना उद्देशून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आजच्या काळातील उपयोजन आणि नेतृत्वाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.

Prof Ranjit Meshram Ni Mandala Ambedkar Kashasathi Cha Aagraha

     प्रा. मेश्राम यांनी डॉ. आंबेडकरांचे वेगाने होणारे दैवतीकरण धोकादायक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “मार्क्सवादात ज्याप्रमाणे व्यक्तिगत मार्क्स नसतो, तर त्याच्या विचारांचे आजच्या संदर्भातील उपयोजन महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीनेही बाबासाहेबांच्या तत्त्वांचा व्यावहारिक अंगाने विचार करावा.” त्यांनी ‘नेता’ या संकल्पनेची सध्याची अवहेलना आणि कार्यकर्ता तसेच संघटना यांचे दुय्यम स्थान याबद्दल चिंता व्यक्त केली. “नेता, कार्यकर्ता आणि संघटना या संकल्पना आंबेडकरी चळवळीतून बाद झाल्या तर गोंधळ माजेल. त्याची लक्षणे आजही दिसत आहेत,” असे ते म्हणाले. बाबासाहेबांनी ‘देव’ ही संकल्पना नाकारली असली तरी ‘नेता’ ही संकल्पना कधीच नाकारली नाही. ते प्रथम एक थोर नेते होते, हे विसरता कामा नये, असे त्यांनी ठासून सांगितले.

     आंबेडकर यांचे विचार मांडताना त्यांनी कोण, कसे आणि काय सांगितले यावरच भर दिला जातो, पण ‘आंबेडकर कशासाठी?’ हा प्रश्न उपस्थित केला जात नाही. आजच्या काळात हीच गरज आहे, असे मत त्यांनी मांडले. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाच्या ध्येयधोरणाविषयी बोलताना कणखर नेतृत्वाच्या गरजेवर भर दिला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली. गांधी आणि आंबेडकर यांच्यातील अस्पृश्यांच्या नेतृत्वावरून झालेल्या संघर्षाचे काही प्रसंग सांगत त्यांनी उपस्थितांना इतिहासाची आठवण करून दिली.

     या सोहळ्याचे अध्यक्षस्थान समाजकल्याण उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी भूषवले, तर शिक्षणतज्ञ राजाभाऊ टाकसाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष दादाकांत धनविजय यांनी संस्थेच्या ध्येयधोरणांचे प्रास्ताविकात सविस्तर वर्णन केले. कार्यक्रमाचे संचालन सचिव डॉ. मच्छिंद्र चोरमारे यांनी केले. या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात प्रा. प्रवीण बोरकर (वसंत मून वैचारिक पुरस्कार), चंद्रकांत वानखेडे (बाबूराव बागूल कथा पुरस्कार), शेषराव पिराजी धांडे (नामदेव ढसाळ काव्य पुरस्कार), भारत सातपुते (दया पवार आत्मकथन पुरस्कार) आणि वीरेंद्र गणवीर (अश्वघोष नाट्य पुरस्कार) यांना सन्मानित करण्यात आले. सर्व पुरस्कार विजेत्यांनी आपली मनोगते व्यक्त करत सभागृहाला प्रेरणा दिली.

     या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष भूपेश थूलकर, कोषाध्यक्ष सविता कांबळे, सहसचिव सुरेश वर्धे, तसेच महेंद्र गायकवाड, सुदेश भोवते, राजन वाघमारे, पल्लवी जीवनतारे, रमेश सोमकुवर आणि गौरव थूल यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी राजन वाघमारे यांनी आभारप्रदर्शन केले. ताराचंद्र खांडेकर, इ.मो. नारनवरे, लोकनाथ यशवंत, प्रभू राजगडकर, एन.आर. सुटे, संध्या राजुरकर, सुजाता लोखंडे, उज्वला गणवीर, जयश्री गणवीर, पूजा नाखले, विनायकराव जामगडे, जनार्दन मून, राहुल दहीकर, मिलिंद किर्ती, मिलिंद पवनीपगार, प्रवीण कांबळे, छाया खोब्रागडे, सरिता सातारडे, निर्गुणशा ठमके, एम.एस. जांभुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा सोहळा आंबेडकरी चळवळीच्या उद्दिष्टांना नव्याने प्रेरणा देणारा ठरला.

Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209