नागपूर : देशात मोठ्या संख्येत ओबीसी समाज आहे. मात्र, त्याला त्याचे अपेक्षित हक्क मिळालेले नाहीत. समाजातील नेत्यांच्या कोलांट उड्यामुळे हा समाज आज सैरभैर झाला आहे, अशी खंत राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा तर्फे पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली.
प्रत्येक निवडणुकीच्या वेळी ओबीसी समाजाला त्यांचे हक्क आणि न्याय देण्याच्या घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षात मात्र निवडणुका झाल्यानंतर आश्वासनांची पूर्तता होत नाही. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीपूर्वी ओबीसी जनतेच्या काय अपेक्षा आहे, त्याचा जाहीरनामा आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत, असे मत राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ओबीसी समाजाला नोकरीत, शिक्षणात आरक्षण आहे. मात्र, समाजाच्या विकासासाठी आवश्यक राजकीय हक्क अर्थात निवडणुकांमध्ये आरक्षण मिळत नाही, उच्च पदांवरही आरक्षण मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. एकीकडे नेतेमंडळी विकासाचा विश्वगुरू होण्याची भाषा करतात. मात्र समाजाचे मागासलेपण वाढत असताना हे कसे शक्य आहे, असा प्रश्न त्यांनी केला. यावेळी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. पत्रकार परिषदेला गीता महाले, लक्ष्मीकांत मोहोड, भूषण दडवे, असलम खातमी, प्रा. दिवाकर मोहोड आदी उपस्थित होते.
obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan