धाराशिव - राज्यात मराठा समाज आरक्षण मागत आहे. त्यांना सरकारने स्वतंत्र आरक्षण द्यावे. या आरक्षणाला ओबीसी समाजाचा अजिबात विरोध नसून ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणातून देऊ नये. ओबीसी समाजामध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी ओबीसींचा महा एल्गार मेळावा धाराशिव जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.
धाराशिव शहरातील परिमल मंगल कार्यालयात शुक्रवारी (दि. 22) धनंजय शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत मराठा समाजाला सरकारने स्वतंत्र आरक्षण द्यावे, जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये, प्रत्येक तालुक्यात ओबीसी समाजाच्या बैठकी घेण्यासह इतर विविध विषयांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. ओबीसी समाजाचा जिल्ह्यात लवकरच महाएल्गार मेळावा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी धनंजय शिंगाडे, पांडुरंग कुंभार, कैलास शिंदे, डॉ स्नेहलता सोनकाटे, रज्जाक अत्तार, दिपक जाधव, रचि कोरे-आळणीकर, बाळासाहेब शिंदे, आबासाहेब खोत, उमाकांत लकडे, अक्षय माने आदींसह इतरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन लक्ष्मण माने यांनी तर आभार संतोष भोजने यांनी मानले. या बैठकीत धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, वाशी, कळंब, भूम व परंडा या तालुक्यातील ओबीसी समाज बांधव जिल्हाभरातून मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission