चंद्रपूर, ओबीसी, व्हीजे एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी 72 ओबीसी वसतिगृह, आधार योजना, विदेश शिष्यवृत्ती या मागण्यांसाठी दिनांक 21 सप्टेंबरला गांधी चौकात येथे ओबीसी सेवा संघातर्फे मुसळधार पावसात भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
मागील 6 वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या 72 वसतिगृहाचा विषय शासनाने अजूनही सोडवला नाही. राज्य शासनाचा वित्त विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग गंभीर नाही. यामुळे ओबीसी विद्यार्थी वसतिगृहे आणि आधार योजनेपासून वंचित आहेत. अनेक विदयार्थ्यांनी वसतिगृह सुरू होतील, या आशेने जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवेश घेतला आहे. मात्र अजूनही वसतिगृह सुरू झाले नाही. विदयार्थ्यांना मिळेल ते काम करून शिक्षण घ्यावे लागत आहे. अनेक विदयार्थी गरिबीमुळे खचून गेले आहे. शाळा महाविद्यालये सुरू होवून 3 महिने उलटले आहेत. तरी 7200 विद्यार्थ्यासाठी 72 ओबीसी वसतिगृहे, 21600 विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले आधार योजना, 75 विद्यार्थ्यांसाठी विदेश शिष्यवृत्ती योजनेवर निर्णय झालेला असतांना अजूनही वरील योजना शासनाने सुरू केल्या नाहीत. वरील योजना महाराष्ट्र शासनाच्या वित्त व बहुजन कल्याण विभागाने अडवून ठेवल्या आहेत. त्यामुळे या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी भीक मांगो आंदोलनाच्या सरकार साठी भीक मागितली व मिळालेली भीक सरकारला पाठविली. याची दखल घेऊन सरकारने न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके यांनी दिला.