अज्ञानाचे बळी
Adnyanache Bali
अज्ञानाचे बळी - लेखक - प्रदीप चंद्रकांता गजानन ढोबळे, B.A., B.E., M.B.A., L.L.B
साळवी : पण ढोबळेसाहेब, हे चांगले शिकलेले, डॉक्टर, इंजीनीयर बाबाबुवा कसे बनतात ?
मी : अशा लोकांचा भुतकाळ बघीतला तर आढळेल, की ते त्यांच्या व्यवसायात फारच सामान्य होते. परंतू मोठा बनण्याचा हव्यास ही पण एक लालसा आहे. आणि त्यासाठी चांगला शिकलेला माणूसही बनवेगीरीचा सहारा घेऊ शकतो. खरं तर डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधनाच्या रचनेतून आमच्यापैकी कुणीही आमदार खासदार, मंत्री, मुख्यमंत्री बनून समाजाची सेवा करू शकतो. आम्ही स्विकारलेल्या लोकशाही पद्धतीनेच सूचविलेला हा मार्ग आहे. परंतू मला आठवते, वयाच्या 26 व्या वर्षी माझ्या वार्डाचा कार्पोरेटर बनायचे मी ठरवीले होते. कार्पोरेटर बनायचे म्हणून माहीती घेतली, तर कळले, की ह्या भागातील लोकांच्या पाण्याची, विजेची, आरोग्याची देखभाल करण्याचे भले काम करावे लागेल. मी तशी तुमची सेवा करील हे लोकांस पटवून दिल्यावर, मग कुठे लोकांना माझ्या म्हणण्यात प्रामाणीकता वाटल्यास, लोक मला निवडून देतील. एक कार्पोरेबटर बनण्यासाठी, एवढी दमछाक करावी लागते, तर आदार, खासदार बनण्यासाठी किती करावी लागत असेल, ह्याचा अंदाजच लावलेला बरा. पण ह्या बाबा बुवांचे असे नाही. ह्यांनी एकदा आपल्याला बाबा घोषित केले. चार भक्त कामाला लावलेत, तर समाजकारण्यांसारखी लोकांची सेवा करणे तर सोडा, लोकच ह्यांच्या सेवेत हजर होतात. महात्मा गांधी आणि आंबेडकरांच्या मृत्यूनंतर तर आमच्या देशातील राजकारणाचा दर्जा एवढा घसरला की, आज हे राजकारणीच बाबाबुवां च्या सेवेत स्वत:स अर्पीत करतात. राज्यकर्तेच ह्या बाबा बुवां पुढे झुकत असतील तर मग हे बाबा बूवा ह्याच राज्यकर्त्यांच्या माध्यमातून समाजात आपली जरब बसविण्याचा प्रयत्न करतात. कारण भारतीय राज्यघटनेच्या मार्फत सत्तेचा अधिकार, हा राज्यकर्त्यांच्या हातात आहे, बाबाबुवांच्या नाही. हे सत्य जेवढे बाबाबुवांना माहीत आहे, तेवढे आमचे राज्यकर्तेही जाणत नाही, ही खेदाची बाब आहे. आणी म्हणूनच मग ह्य बाबा बुवांचे पाठीराखे, धर्मसंसद बाबत बोलतात. धर्मसंसदेचा कायदा हा मनुचा असेल आणि संसदेचा कायदा आहे मनुष्याचा, डॉ. आंबेडकरांचा. आम्हास मनूचा कायदा हवा की आंबेडकरांचा ? हा विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.
साळवी : ह्यातील बरेचसे बाबा बुवा चमत्कार करून दाखवितात, हे चमत्कार दैविक नसतात का ? मी स्वत: असा चमत्कार बघीतला आहे. एकदा एका बाबाने हवेत हात फिरवला, काहीसा मंत्र म्हटला आणि बदाम - खारका त्याच्या मुठीत आल्या. हात फिरवायच्या आधी त्यांनी आपली रिकामी मुठ आम्हास दाखविली होती.
माझ्या लहानपणाची गोष्ट मला आठवते. शाळेत जादूगाराचे प्रयोग होते. जादूगाराने एका दहाच्या नोटेचे रूपांतर, दोन दहाच्या नोटमध्ये केले. प्रयोग झाल्यानंतर मी जादूागाराला भेटलो व म्हटले, ‘जादूगारदादा, मला हा नोटा डबल करण्याचा मंत्र शिकवून दे. शाळा शिकणे सोडून, मी अशाच प्रकारे, पैसे डबल करून खुप पैसे कमविन.’ जादूगार म्हणाला, ‘बेटा तू खप शिक. शिकून मोठा हो. खूप पैसा कमव. मी खुप शिकलो नाही, म्हणून हे जादूचे प्रयोग करून, माझे पोट भरतो. जर मंत्रानी पैसे डबल होत असेल तर मी तेच काम केले असतं. अस तुमच्या शाळेकडून पैसे घेऊन, जादूचे प्रयोग करीत फिरलो नसतो. मी हे सर्व पोट भरण्यासाठी, हालचलाखीने करतो.’ जादूगार मला प्रमाणिक वाटला. मेहनत केल्याशिवाय कुणालाही पोट भरता येत नाही असे साधे जादूई तत्वज्ञान त्यांनी मला दिले. ह्या चमत्कारी बाबापेक्षा हा जादूगार मला आजही श्रेष्ठ वटतो. तो सत्यवादी होता.
सानप : मनुष्यापाशी अजूनही असे बरेच प्रश्न आहेत की ज्याची उत्तरे अजुनही विज्ञानापाशी नाही.
मी : असा एखादा प्रश्न सांगाल.
सानप : जसे की ही सृष्टी केव्हा निर्माण झाली वगैरे, वगैरे ह्याची उत्तरे धर्मापाशी आहे.
मी : धर्मापाशी काय उत्तरे आहे.
सानप : जसे की सृष्टी जेव्हा डुबत होती तेव्हा मनु नावाच्या एका व्यक्तीने भली मोठी नौका बनवून काही लोकांना वाचविले. कित्येक दिवस धो धो पाऊस पडला. पर्वत डोंगरे पाण्याखाली गेली. नंतर पाऊस व वादळ शमले. त्यामुळे मनु नावाचा हा व्यक्ती आपण प्रथम व्यक्ती मानतो.
मी : पण ख्रिश्चन धर्मात आदम आणि इव्ह ह्यांना पहिला पुरूष व स्त्री मानतात. एकुण प्रत्येकानेच आपआपल्या धर्माप्रमाणे सृष्टीची उत्पत्ती प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळी सांगीतली आहे, खरी उत्पत्ती तर एकच असली पाहिजे ना.
साळवी : हो हे ही खरे, म्हणजेच एका धर्माने सांगीतलेली उत्पत्ती खरी मानल्यास, दुसर्या धर्माने सांगतिलेली उत्पत्ती खोटीच ठरते.