बहुजन नायक कांशीराम
Bahujan Nayak Kanshiram
बहुजन नायक कांशीराम - बापू राऊत
देशात राजकीय सत्तांतर व व्यवस्था परिवर्तन घडवून आणणे या प्रकल्प सिध्दीसाठी वैचारिक अधिष्ठान असणे आवश्यक आहे.कांशीरामजीच्या वैचारीक अधिष्ठेचे परिमाण हे त्यांच्या भाषणात व त्यांनी लिहिलेल्या बामसेफ : एक परिचय या पुस्तकात आढळून येतात.त्यांनी बसपाची लिखीत विचारसरणी कधी प्रसिध्दी केली नाही परंतू त्यांची राजकीय विचारसरणी हि "फुले आंबेडकरवादी" होती.“चमचा युग" हे पुस्तक कांशीरामजीनी महात्मा ज्योतीबा फुले यांना समर्पित केले होते. शुद्र व अतीशुद्र यांच्या उज्वल यशासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष प्रेरणादायी ठरतो असे त्यांनी अनेकदा म्हटले आहे.
बहुजनवादी राजकारणाची वैचारिक मांडणी करताना, भारतीय समाजात राजकीय सत्तेच्या सहाय्याने व्यापक परिवर्तन घडवून आणता येईल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणीत सामाजीक प्रश्नांना प्राधान्य दिल्याशिवाय बहुजन समाजाचे खरे प्रश्न सुटणार नाहीत असे कांशीरामजीना वाटते. त्यामुळे राजकीय सत्तेला ते साध्य मानत नाहीत तर राजकीय सत्ता हे सामजीक बदलासाठीचे साधन मानतात. कांशीरामजीच्या दृष्टीकोणातून भारतीय व्यवस्थेवरील सवर्णाचे अधिपत्य समाप्त करणे हेच स्वातंत्र आहे. कांशीरामजी संघर्षाची भुमिका टाळताना दिसतात, मग तो गायरान जमिन वाटपाचा पन असो की नामांतराचा वा राखीव जागेचा.संघर्षाने दलित समाजाचे नुकसानच अधिक होते हा अनुभव व निरीक्षण त्यांच्या पाठीशी असावे. म्हणून ते दलित कुटूंबाना उच्च जातीच्या अधिक जमिनी काढून त्या दलिताना वाटण्याच्या कार्यक्रमात सामिल होत नाहीत तर जो जमीन खाली है वो हमारी है असा नारा ते देतात. सत्तेत बहुजन समाज पक्ष आला तर दलितांना त्वरीत खाली जमीनीचे वाटप करण्यात येईल असे ते म्हणत असत याद्वारे ते दलित समाजाचा उच्च वर्णीय जातींशी होणारा संघर्ष टाळू इच्छित होते. कारण अशा संघर्षान दलितांचेच अधिक नुकसान होते असे त्यांचे स्पष्ट मत होते. उत्तर प्रदेशात बसपाचे सरकार येताच अनेक खाली जमीनी दलितांना देण्यात आल्या. महाराष्ट्रात नामांतराच्या चळवळीत त्यांनी सहभाग घेतला नाही. ते म्हणत बहुजन समाज पक्ष सत्तेत आल्यास एक नाही तर अनेक विद्यापीठे बहुजन महापुरुषाच्या नावाने उभारता येईल.महाराष्ट्रातील विद्यापीठ नामांतराच्या चळवळीत दलित नेत्यांच्या आततापाई पणामुळे दलित तरुणांचे अतोनात नुकसान झाले. दलित कुटूंबाना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.लोकांना जिवंत जाळण्यात आले, अनेक कुटूंबे बेचिराख झालीत. अनेक गावावर सामाजीक बहिष्कार टाकण्यात आले.महाराष्ट्रातील सत्ताधारी समाज व त्यांच्या पक्षाने मूक भुमिका घेतल्या त्यामुळेच स्वबळावर सर्वकाही अशी भुमिका कांशीरामजी घेतात व आपल्या भुमिकेशी एकनिष्ठ राहून उत्तर प्रदेश मध्ये सत्तेत आल्याबरोबर तथागत बुध्द, डॉ.बाबासाहेब, शाहू महाराज, म. फुले यांच्या नावे विद्यापीठांची निर्मिती करण्यात आली.