पवनी - ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसींना त्यांचे हक्क व अधिकार मिळाला पाहिजे यासाठी जनजागृती करावी या एकमेव उद्देशाने मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे असे मत मंडल यात्रेचे प्रमुख आयोजक उमेश कोर्राम यांनी व्यक्त केले.
७ ऑगस्ट मंडल दिनाचे औचित्य साधून मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले असून जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी घोषित केल्यानुसार ७२ वसतीगृहे व २१६०० विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना लागू झाली पाहिजे, सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना १०० टक्के फी माफी योजना लागू करावी, महाज्योती संस्थेस १००० कोटी रुपये निधी उपलब्ध करून द्यावे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे सर्व जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय, अधिकारी व ओबीसी भवन झाले पाहिजे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाला ३०,००० करोड रुपये निधी मिळाला पाहिजे, शिक्षकांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू झाली पाहिजे, शेतकऱ्यांचे उत्पादनाला हम भाव मिळाला पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या या व इतर मागण्यांसाठी जनजागृ करण्यासाठी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे असे विचार प्रमुख अतिथींनी व्यक्त केले. कार्यक्रमाला धर्मेंद्र नंदरधने, डॉ. विक्रम राखडे, राम भेंडारकर, अरविंद काकडे, शंकरराव तेलमासरे, रामचंद्र पाटील, मनोहर मेश्राम, रमेश लोणारे, माटे, ओंकार माटे, मार्तंड गजघाटे, राकेश पाखमोडे, मनोहर बावनकर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक पारधी, संचालन प्रकाश पचारे व आभार प्रदर्शन उमाजी देशमुख यांनी केले.