संभाजी ब्रिगेडचे शाळा वाचवा अभियान
कोल्हापूर : संभाजी ब्रिगेडच्या वतीने कोल्हापुरातील सरकारी शाळा वाचवा अभियान राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या मेन राजाराम हायस्कूलला पूर्ववत ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहूंच्या स्मृतीला अभिवादन करून अभियानाला सुरुवात करण्यात आली. शहर आणि उपनगरांमध्ये शाळेच्या वैशिष्ट्यांची माहिती प्रसारित करण्यासाठी वाहनाद्वारे प्रचार व प्रसार सुरू केला आहे.
शतकी परंपरा असणाऱ्या व शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या मेन राजाराम हायस्कूलची जबाबदारी संभाजी ब्रिगेडने घेतल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण यांच्या कार्यालयात शिक्षणाधिकारी, शाळेतील शिक्षक व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी यांची बैठक झाली. बैठकीस संघटनेचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील व त्यांचे सहकारी उपस्थित होते. या बैठकीत सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी मान्य करत मेन राजाराममध्ये गुणवत्ताधारक शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडने घेतली.
प्रत्येक वर्गामध्ये स्मार्ट टीव्ही बसवून ई-लर्निंगसाठी शाळा सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गरजू विद्यार्थ्यांनागणवेशापासून सर्वशैक्षणिक साहित्य संभाजी ब्रिगेडच्या वतीने मोफत येण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवासाची योजना राबविण्याचे देखील प्रयत्न सुरू असल्याचे रूपेश पाटील यांनी सांगितले.