जनसुरक्षा विधेयकाच्या आडून अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावण्याचा प्रयत्न

संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रा. प्रेमकुमार बोके यांचा आरोप

     अंजनगाव सुर्जी: महाराष्ट्र सरकार आणत असलेला जनसुरक्षा कायदा हा समाजात जनजागृती करीत असलेल्या विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, लेखक व सर्वसामान्य नागरिक यांच्या विरोधात आहे. तसेच या कायद्याच्या आडून सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकारच हिरावून घेत आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रेमकुमार बोके यांनी केला आहे. तसेच हा कायदा हाणून पाडण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Jan_Suraksha_Bill_Abhivyakti_Swatantrya_vri_Halla_Sambhaji_Brigade_cha_Stand

     नक्षलवादी संघटनांना पायबंद घालण्याच्या नावाखाली हा कायदा आणला जात असला, तरी केवळ सरकारी धोरणांविरोधात बोलणाऱ्या संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार किंवा जागृत सामान्य नागरिक यांचा आवाज बंद करण्यासाठी हा कायदा आणला जात असल्याचे कायद्याच्या अभ्यासकांचे मत आहे. हा कायदा लागू झाला तर सरकारला अमर्याद अधिकार प्राप्त होणार असून, त्या माध्यमातून कोणत्याही सामाजिक संघटनेला किंवा त्या संघटनेच्या कार्यकर्त्याला केव्हाही अटक करण्याचे अधिकार सरकारला प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे याअंतर्गत दाखल होणारे गुन्हे अजामीनपात्र राहणार आहे. त्यामुळे एकप्रकारे सरकारची हुकूमशाही निर्माण होण्याची भिती प्रेमकुमार बोके यांनी व्यक्त केली आहे.