धक्कादायक! ओबीसी समाजातील माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिरात प्रवेश नाकारला, ओबीसी समाजात संतापाची लाट

     वर्धा: देश अंतराळात महासत्ता बनण्याचे आणि मंगळावर स्थानक उभारण्याचे स्वप्न सांगतो, पण दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलेली अस्पृश्यता आजही कायम आहे, अशी हादरवून सोडणारी घटना राम नवमीच्या (६ एप्रिल २०२५) दिवशी समोर आली. ही घटना वर्धा जिल्ह्यातील देवळीतील प्राचीन राम मंदिरात घडली, जिथे भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांना मंदिरात प्रवेशापासून रोखण्यात आले. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. रामदास तडस, त्यांच्या पत्नी शोभा तडस आणि काही भाजप पदाधिकारी दर्शनासाठी मंदिरात पोहोचले, जेव्हा पूजा सुरू होती. तडस गर्भगृहात मूर्तीची पूजा करण्यासाठी गेले, पण पुजाऱ्याने त्यांना अडवले आणि म्हणाले, "तुम्ही मूर्तीची पूजा करू शकत नाही, लांब राहा." हे ऐकून तडस हतबल झाले आणि त्यांनी विचारले, "मला आत का जाऊ दिले नाही?"

Untouchability_in_Modern_India_OBC_MP_Ramdas_Tadas_Barred_from_Ram_Temple

     पुजाऱ्याने स्पष्ट केले, "तुमच्याकडे सोवळे किंवा जानवे नाही, साध्या कपड्यांत दर्शन शक्य नाही, बाहेर जा." हे शब्द ऐकून तडसांना धक्का बसला. वाद टाळण्यासाठी ते बाहेर परतले आणि कठड्याबाहेर उभे राहून दर्शन घेतले. हातात पूजेचे ताट होते, पण मूर्तीवर फुले अर्पण करता आली नाहीत. तडस यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले, "मला खूप दुखापत झाली. मी आणि गावकऱ्यांनी या मंदिराच्या सुधारणेसाठी नेहमीच मदत केली, पण पुजारी कुटुंब पिढीजात असून फक्त राम नवमीस येऊन नियम लादते. मी शांत राहिलो, पण हे अन्यायकारक आहे." या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला, आणि काहींना आठवले की कधीकाळी या मंदिरात दलितांना प्रवेश नव्हता, ज्यावेळी महात्मा गांधींनी सर्वांसाठी ते उघडले होते. आज माजी खासदाराला प्रवेश नाकारल्याने समाजात संतापाचे वातावरण आहे.

     ही घटना ब्राह्मणेतर, स्त्री-शूद्र-आतिशूद्रांसाठी एक अपमानजनक संदेश आहे. भटपुरोहितांच्या सोवळे-जानवे आणि बाटविटाळाच्या हिंदुराष्ट्रात तुमचा स्थान मर्यादित आहे, असे दर्शवले जात आहे. जर मानवतेच्या मार्गावर चालायचे असेल, तर विषमतावादी वर्णश्रेष्ठत्वाच्या वैदिक हिंदुराष्ट्राच्या विचाराला सोडून द्यावे, अशी भावना व्यक्त होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा

     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात अस्पृश्यतेच्या विरोधात लढा दिला आणि समाजातील विषमता दूर करण्यासाठी कार्य केले. त्यांनी भारतीय संविधान लिहून सर्वांना समान हक्क दिले आणि जातीभेद संपवण्याचा प्रयत्न केला. ही घटना त्यांच्या विचारांना आव्हान देणारी आहे, कारण आजही मंदिरात प्रवेशावरून अस्पृश्यतेचे छाये दिसत आहेत. बाबासाहेबांचा वारसा जपणाऱ्या ओबीसी आणि दलित समाजाला ही घटना खूपच ठेच पोहोचवणारी आहे, आणि त्यांच्या समानतेच्या स्वप्नाला धक्का आहे.

ओबीसी समाजाची तीव्र नाराजी

     या घटनेने ओबीसी समाजात संतापाची लाट उसळली आहे, कारण रामदास तडस हे ओबीसी तेली समाजाचे प्रतिनिधी आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी संघटनांनी या अन्यायाचा तीव्र निषेध नोंदवला आहे. ओबीसी सेवा संघ, ओबीसी महासंघ, समता परिषदे, महाराष्ट्र ओबीसी संघर्ष मोर्चा, महाराष्ट्र राज्य ओबीसी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी एकता मंच – महाराष्ट्र, ओबीसी युवक-युवती संघटना, महाराष्ट्र, आणि ओबीसी समाज संघटना, नागपूर/विदर्भ विभाग यांनी एकत्रितपणे या घटनेच्या विरोधात आवाज उठवला आहे. ओबीसी समाजाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत आंदोलनाची तयारी दर्शवली आहे.