ओबीसी विद्यार्थी वसतिगृहाच्या प्रतीक्षेतच

     चंद्रपूर : राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ३६ जिल्ह्यामध्ये ७२ वसतिगृह सुरु करण्याचा निर्णय सरकारनी घेतला. सत्र २०२३- २०२४ मध्ये वसतिगृह प्रवेशाचे विद्यार्थ्यांकडून अर्ज मागितले. परंतु वसतिगृहात प्रवेश दिला नाही. अजूनही विद्यार्थी वसतिगृहाच्या प्रतीक्षेत आहे. दि. १ जुलै पासून महाविद्यालय सुरु होत आहे, परंतु सरकार, प्रशासनाच्या हालचालींना वेग नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी पार्टटाइम जॉब करून शिक्षण घेत आहे. मागच्या सत्रात ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज भरले होते. त्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात त्वरित प्रवेश देण्यात यावे, सत्र २०२४- २०२५ मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ओबीसी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु करावे, कनिष्ठ महाविद्यालयीन ( वर्ग ११ वी, १२ वी ) ओबीसी, एन. टी., एस.बी.सी., विद्यार्थ्यांना ओबीसी वसतिगृहात प्रवेश देण्यात यावे,

OBC_students_waiting_for_hostel      कनिष्ठ महाविद्यालयीन (वर्ग ११वी, १२वी) ओबीसी, एन.टी. एस. बी. सी., विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु करावी, वसतिगृह प्रवेशासाठी व आधार योजनेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्राचे बंधन वगळण्यात यावे, शासन निर्णय १६ मे २०१२ नुसार एस. सी. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात ओबीसी विद्यार्थ्यांचा कोटा ५ टक्के करण्यात आला आहे. तो रद्द करून पुर्ववत २० टक्के करण्यात यावा, सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रापासून उच्च शिक्षणात ओबीसी विद्यार्थीनींना १००इफी सवलत देण्यात येत आहे. त्याच प्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांनाही १०० टक्के फी सवलत लागू करावी. तसेच फ्री शिप सवलतीसाठी उत्पन्न मर्यादा रद्द करण्यात यावे, प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना २०१९- २०२०या शैक्षणिक वर्षांपासून लागू करण्यात आली. ओबीसी विद्यार्थ्यांना दरवर्षी ५०० रुपये खर्च करून आवेदन पत्र सादर केले. परंतु सन २०१९ते २०२४ या पाच वर्ष्यात त्यांना शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली नाही. सर्व विद्यार्थ्यांना त्वरित शिष्यवृत्ती वितरित करण्यात यावी, मुलींच्या मोफत शिक्षणाचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावा, महाज्योती मार्फत ओबीसी, एन. टी., एस. बी. सी विद्यार्थ्यांना नीट आणि आआआयटी परीक्षा ऑनलाईन प्रशिक्षण व मोफत टॅबलेट योजना अर्ज प्रक्रिया त्वरित सुरु करावे, गुणवंत ओबीसी विद्यार्थ्यांना राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती देण्यात यावी. अशी मागणी ओबीसी सेवा संघानी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री व सहाय्यक आयुक्त इतर मागास बहुजन कल्याण विभाग, चंद्रपूर यांच्या कडे केली. मागण्या त्वरित पूर्ण केल्या नाही तर इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयात मुक्काम आंदोलन व सामूहिक आत्मदहन करू असा इशारा ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके यांनी दिला.

विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेशच नाही ?

     ७२ ओबीसी वसतिगृह सुरु करण्यासंदर्भात सरकारने आदेश काढला. मार्च २०२४मध्ये वसतिगृह प्रवेश अर्ज मागितले. निवड यादी लागली. परंतु प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला नाही. गाव खेड्यातील ओबीसी विद्यार्थी वसतिगृहाच्या प्रतीक्षेत आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या मागण्या दि. १ जुलै २०२४ पर्यंत पूर्ण केल्या नाही तर इतर मागास बहुजन कल्याण विभाग, चंद्रपूर येथील कार्यालयात सर्व विद्यार्थ्यांना घेऊन कार्यलयात मागण्या पूर्ण होतपर्यंत मुक्कामी राहून मुक्काम आंदोलन करणार.

- प्रा. अनिल डहाके, जिल्हाध्यक्ष ओबीसी सेवा संघ, चंद्रपूर