2024 ची निवडणुक नुकतीच पार पडली. सदर निवडणुकीत आपल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी चारसो पार चा नारा दिला असला तरी भारतातल्या सुज्ञ मतदारांनी त्यांना बहुमतापासून दूर ठेवले. दुसऱ्या बाजूने काँग्रेसवर विशेषता महाराष्ट्रा मध्ये महाविकास आघाडीवर मतदारांनी आपले प्रेम व्यक्त केले कारण प्रचंड बेरोजगारी, जी एस टी, पेट्रोल- डिझेल दरवाढ आणि महागाईने हा देश होरपळून निघाला.मा. नरेंद्र मोदींच्या सरकारला लोकं त्रासून गेले होते.त्यामुळे ही निवडणूक लोकांनीच डोक्यावर घेतली होती. 
महाविकास आघाडी सहित काँग्रेसला या निवडणुकीत लोकांनी विशेष प्रेम दिले असले तरी काँग्रेसने हुरळून जाऊ नये. काँग्रेसचे प्रस्थापित नेते आजही सरंजामशाही पद्धतीने वागतात. लोकांनी दिलेले प्रेम वाढवायचे असेल आणि पुढे टिकवायचे असेल तर पूर्वीसारखा माज करता येणार नाही. कार्यकर्त्यांशी बोलताना अरे कारे ची भाषा न वापरता कार्यकर्ता वयाने कितीही लहान असो ताई दादांची भाषा वापरावी लागेल. निवडणुकीत मिळालेलं थोडं यश पाहून पक्षश्रेष्ठींना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागत असेल तर हे अत्यंत उथळ वागणं असून याचे परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला भोगावे लागेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने एकत्रितरीत्या विधानसभेच्या निवडणुका लढवल्यास आपसातील मतभेद टाळून लोकांच्या समोर कुठलाही तमाशा न दाखवता लोकांचा विश्वास कायम ठेवल्यास विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे चित्र वेगळं असेल.
सत्तर वर्ष या देशातल्या लोकांनी एक पक्ष डोक्यावर घेतला काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांनी हा देश कसा चालवला असेल? एक अंधभक्त शिक्षक मला म्हणाले की लोक आता सुशिक्षित झालेले आहे मी म्हटलं ही तुम्ही तुमच्या पूर्वजांना अर्थात वाढ वडिलांना दिलेली सर्वात घाणेरडी शिवी आहे. याचा अर्थ तुमचे आई-वडील मूर्ख होते. त्यांना अक्कल नव्हती. मी जेव्हा त्यांना असं म्हटलं तेव्हा त्यांचा चेहरा पाहण्यासारखा होता. गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींची लोकप्रियता जितक्या झपाट्याने वाढली तितक्यात झपाट्याने ती कमी होत आहे. चार लाखाच्या वरून मताधिक्य घेणाऱ्या मोदींचा 2024 च्या निवडणुकीत अवघ्या दीड लाखाने विजय झाला हे त्याचं बटबटीत उदाहरण होय.सत्तर वर्षात काँग्रेसचा एक नेता भारताचा गुरु होऊ शकला नाही. दहा वर्षात नरेंद्र मोदींना त्यांच्या चमच्यांनी (गोदी मीडिया) विश्वगुरू केले. आज पासून पुढे पन्नास वर्ष या देशात भारतीय जनता पक्षाचीच सत्ता असेल. असे म्हणणारे भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन नेते असो की काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना मुख्यमंत्री पदाचे लागलेले डोहाळे असो. हा उथळपणा भारताच्या लोकशाहीला शाप ठरेल का? या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देईल.
निवडणुकीच्या निकालाच्या आधीच पंतप्रधान ठरवणे. चारसो पार चा नारा देणे. इथून पन्नास वर्षे आमची सत्ता राहील असं वक्तव्य करणे. याचा अर्थ जनतेला गृहीत धरणे होय. देव आणि धर्माच्या नावावर या देशात चंद्र सूर्य असेपर्यंत आमची सत्ता राहील हा भाजपचा विश्वास 2024 च्या निवडणुकीत भारताच्या विचारवंत मतदारांनी फोल ठरवला. या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेला विशेष म्हणजे ग्रामीण जनतेला सगळेच मुद्दे पूर्णपणे कळले असेल असे नाही. अर्थात इलेक्टोरल बाँन्ड यातील लोकांना काहीही कळलं नाही. कारण मीडियाने हे मुद्दे पोहोचू दिले नाही. परंतु हिंदीमध्ये एक म्हण आहे. लोग सत्य को सुंग लेते है! त्याचं विश्लेषण कदाचित त्यांना करता येणार नाही. परंतु सर्वसामान्य लोकांना एक गोष्ट लक्षात आली की आपल्या देशामध्ये काहीतरी गडबड होत आहे
त्यामुळे लोकांनी आपलं मत परिवर्तित केलं. आणि म्हणून काँग्रेस असो की बीजेपी सत्ताधारी असो की विरोधी पक्ष जनतेला पन्नास वर्षासाठी तर जाऊ द्या एका मिनिटासाठी सुद्धा गृहीत धरू नका. ये पब्लिक है सब जानती है!
हेमंत टाले - 9975807632