'आंबेडकराइट मुव्हमेंट'तर्फे 'जीवनगौरव' सह साहित्य पुरस्कारांचे वितरण
'आजघडीला मूलतत्त्ववाद्यांनी अनेक संकटे साहित्यिक, विचारवतांच्या रस्त्यावर अंथरली आहेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा केवळ शब्द हे साहित्यिक लिहित नाहीत. तर ते डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातला संविधाननिष्ठ समाज लिहित असतात. सत्ताधाऱ्यांनी निर्माण केलेला हा दडपशाहीचा काळ संपविण्यासाठी बहुजनांनी एकत्र आले पाहिजे आणि निर्भयपणे सद्य परिस्थितीवर मात केली पाहिजे', असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.
डॉ. मनोहर पुढे म्हणाले, ‘संविधानिक मार्गाने आरएसएस, भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोही नव्हे. संविधान विरोधी हेच खरे देशद्रोही आहेत. ' या सोहळ्यात ‘वसंत मून वैचारिक पुरस्कार' मिलिंद किर्ती यांना, 'दया पवार आत्मकथन पुरस्कार' राजू बाविस्कर, ‘बाबुराव बागूल कादंबरी पुरस्कार' उल्हास निकम, 'अश्वघोष नाट्य पुरस्कार' डॉ. प्रतिमा इंगोले, 'नामदेव ढसाळ काव्य पुरस्कार' प्रशांत वंजारे, 'डॉ. भगवानदास हिंदी दलित साहित्य पुरस्कार' कर्मशील भारती यांना प्रदान करण्यात आला. दहा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल आणि स्मृतिचिन्ह असे 'जीवनगौरव पुरस्कारा'चे स्वरूप होते. तर प्रत्येकी पाच हजार रोख शाल, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे इतर वाङ्मय पुरस्कारांचे स्वरूप होते.
डॉ. लेंडे म्हणाले, 'पुढील काळ हा डीजिटल हुकूमशाहीचा कालखंड राहू शकतो. जगातल्या सर्व लोकशाही राष्ट्रांना हुकूमशाही विळखा घालत आहे. म्हणून लोकशाहीवाद्यांनी सजग राहिले पाहिजे.'
प्रास्ताविक ‘आंबेडकराइट मुव्हमेंट ऑफ कल्चर अॅण्ड लिटरेचर'चे दादाकांत धनविजय यांनी, तर सूत्रसंचालन डॉ. मच्छिंद्र चोरमारे यांनी केले. आभार राजन वाघमारे यांनी मानले. मानपत्राचे वाचन डॉ. सविता कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते भूपेश थूलकर, रमेश सोमकुवर, पल्लवी जीवनतारे, सुमेध कांबळे, गौरव थूल आदींसह साहित्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.