महाबळेश्वर आगारातील बसेसच्या दूरवस्थेबाबत ओबीसी संघटना आक्रमक

    महाबळेश्वर येथील आगारातील बसेसच्या दूरवस्थेबाबत ओबीसी संघटना आक्रमक झाली असून आगारात लवकरात लवकर नवीन गाड्या उपलब्ध करुन द्याव्यात अन्याथा महामंडळाच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाबळेश्वर तहसीलदार व जिल्हा विभाग नियंत्रक यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

OBC_organizations_are_aggressive_about_the_bad_condition_buses_in_Mahabaleshwar_Agar     महाबळेश्वर येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात त्यापैकी बरेचशे पर्यटक हे महाबळेश्वरला येण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनच्या एसटीचा पर्याय निवडतात. मात्र, सध्या महाबळेश्वर आगारामध्ये एकही नवीन बस नसून ज्या काही गाड्या आहेत त्या जुन्या आणी नादुरुस्त झाल्याने अनेकदा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

    मुंबई, पुणे, नाशिक, पणजी यी गाड्या अनेकदा भर रस्त्यात बंद पडताना दिसत आहेत तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात सुद्धा नेहमी हेच चित्र दिसत असून शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहचू शकत नाहीत. शासकीय तसेच इतर कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी प्रवाशांना व सामान्य नागरिकांमधून दिलासा मिळावा यासाठी येथील महाबळेश्वर तालुका व शहर ओबीसी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

     एसटीच्या दूरवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री तसेच महाबळेश्वरच्या तहसीलदार व जिल्हा विभाग नियंत्रक यांना लेखी निवेदनाद्वारे महाबळेश्वर आगाराला लवकरात लवकर नवीन गाड्या मिळाव्यात अन्यथा महामंडळाच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.

    यावेळी ओबीसी संघटनेचे शहराध्यक्ष अनिल लोहार, महा. सचिव नगरसेवक संदीप साळुंखे, अॅड. संजय जंगम, दिलीप शिपटे, प्रशांत कात्रट, कार्याध्यक्ष संजयकुमार जंगम, मंगेश भिसे, रफिक बडाणे, निसार डोंगरे, सतिष लोखंडे, सुनील यादव, विजय गोरे, काशिनाथ केंडे, अरुण वरगटे, दिनेश लोखंडे, आयुब वारुणकर व संघटनेचे सभासद उपस्थित होते.