मंगरुळपीर - स्थानिक विश्रामगृहात ११ फेब्रुवारीला संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक पार पडली. यामध्ये आगामी निवडणूका तयारीनिशी लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानिमित्ताने अनेकांचा संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेशही होत आहे.
या बैठकीला संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, जिल्हा अध्यक्ष गणेश सुर्वे, जिल्हा संघटक गजानन व्यवहारे, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश मुंजे, नितेश पोहकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेक युवकांनी संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश केला. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता जनतेचा आता कोणत्याही पक्षावर विश्वास राहिला नाही. सध्याच्या राजकीय पक्षाने राज्यासह देशात दूषित वातावरण निर्माण केले आहे.देशातील लोकशाही धोक्यात असून अघोषित हुकूमशाहीला सुरुवात झाली आहे. या दूषित वातावरणाला दूर करण्यासाठी व लोकशाही वाचवण्यासाठी संभाजी ब्रिगेड हाच एकमेव पर्याय आहे आणि म्हणून आगामी काळात होणाऱ्या संपूर्ण निवडणूका संभाजी ब्रिगेड पूर्ण तयारीनिशी लढविणार असल्याचे प्रतिपादन गजानन भोयर यांनी केले. सध्या राज्याला प्रबोधनाची गरज आहे. संभाजी ब्रिगेडने संपूर्ण राज्यात महापुरुषांच्या विचारांच्या माध्यमातून प्रबोधन केले आहे. त्यामुळे सर्वांनी संभाजी ब्रिगेडमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे, असे भास्कर जीवने यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले.
स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाच्या फोडाफोडीचे गलिच्छ राजकारण करून सत्तेत बसलेल्या राजकीय नेत्यांनी जनतेच्या समस्या व प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. आजच्या पळवा पळवी जातीवादी घाणेरड्या राजकारणाला पर्याय म्हणजे संभाजी ब्रिगेड आहे. - अजय गवारगुरु, तालुकाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, मंगरुळपीर.